मधुमेह होऊ नये म्हणून काय करता येईल?
आपण अगोदरच पाहिलं आहे की मधुमेह हा दोन गोष्टींमुळं होतो. दोषी जीन्सना सुपीक वातावरण मिळालं तर रक्तातली ग्लुकोजची मात्रा वाढू लागते. पकी जीन्स बदलणं आपल्या हातात नसतं. ती जन्मासोबत आलेली बाब आहे. मधुमेहासाठी पोषक असलेल्या जीन्सना जर वातावरणाची जोड नाकारली, तर मधुमेह होण्याची शक्यता खूपच कमी होते.
आता वातावरणाची जोड नाकारायची याचा अर्थ स्पष्ट करायला हवा. मुळात मधुमेह हा शरीराच्या बिघडलेल्या रासायनिक जडणघडणीचा एक हिस्सा आहे. मेटाबोंलिक सिंड्रोमचा तो एक भाग आहे हे आपण समजून घेतलंच आहे. म्हणजे मेटाबोलिक सिंड्रोमवर घाला घातला तर मधुमेह न होण्याची शक्यता वाढवता येईलच की!
इथं एक लक्षात घ्यायला हवं की आपण हे सगळं फक्त ‘टाइप टू मधुमेहा’च्या संदर्भात बोलतोय. फक्त इंश्युलीन हाच उपाय असलेल्या ‘टाइप वन मधुमेहा’च्या बाबतीत मात्र काहीच करता येत नाही. कारण त्यात आपल्याच बीटा पेशींवर आपलीच प्रतिकारशक्ती हमला करते. हा केवळ दुर्दैवी प्रकार असल्याने आलेले भोग स्वीकारण्यावाचून पर्याय नसतो.

नेमकं काय करायचं?
hlt02मेटाबोंलिक सिंड्रोममध्ये माणसाचं वजन केंद्रस्थानी असतं. त्यामुळं वजन काबूत राखणं खूप महत्वाचं ठरतं. असं दिसून आलेलं आहे की मधुमेहींनी त्यांचं वजन १० टक्क्यांनी कमी केलं तर त्यांची ग्लुकोज बरीच नियंत्रणात येते. याचाच दुसरा अर्थ वजन आणि मधुमेह यांचा जवळचा संबंध आहे.
साहजिकच तुमचा पुढचा प्रश्न असेल की अनेक सडपातळ माणसाना मधुमेह झालेला दिसतो पण कितीतरी लठ्ठ व्यक्तींची ग्लुकोज नीट असते, त्याचं काय? अनेक शास्त्राज्ञांनाही हा प्रश्न पडला होताच. त्यांनी याचं उत्तर शोधून काढलं. त्यांच्या लक्षात आलं की जरी ही माणसं वरकरणी बारीक दिसत असली तरी त्यांच्या पोटात भरपूर चरबी आहे आणि काही जाडय़ा माणसांच्या शरीरात असलेली चरबी मुख्यत त्वचेखाली आहे, पोटात नाही. या दोन्ही ठिकाणच्या चरबीत मुलभूत फरक आहे. पोटातली चरबी अनेक प्रकारचे हार्मोन बनवते जे मधुमेहाला कारणीभूत ठरतात. आपल्याला अशी अनेक माणसं दिसतील की जी तशी बारीक आहेत, परंतु त्यांचं पोट जरासं पुढं आलेलं आहे.
अगदीच थोडक्यात सांगायचं तर आपलं सुटलेलं पोट काबूत ठेवणं हा सगळ्यात महत्वाचा विषय ठरतो. त्यासाठी योग्य आहार आणि पुरेसा विहार आवश्यक आहे. योग्य आहार म्हणजे कमी खा, वेळेवर खा. तेलकट, तुपकट खाऊ नका. मुख्य म्हणजे शरीराला जितकं आवश्यक आहे, तितकंच खा म्हणजे वजन वाढणार नाही. नियमित व्यायाम करा. साधारण चाळीस पंचेचाळीस मिनिटं चाला. त्याचा नक्कीच फायदा होईल. तरीही वजनाचा प्रश्न असेल तर डॉक्टरना भेटा. आजारी पडल्यावर दवाखाना गाठण्यापेक्षा आजारी पडू नये म्हणून डॉक्टरना दाखवणं चांगलं नाही का?

सुरुवात कधी करावी?
आपल्याकडे मधुमेह फार लवकर म्हणजे वयाच्या तिशीतच दिसू लागला आहे. काही जण विशीत मधुमेही होताहेत. रक्तातली ग्लुकोजची मात्रा वाढायच्या साधारण दहा-बारा वर्ष अगोदर शरीरात मधुमेहाच्या दिशेनं वाटचाल चालू झालेली असते. एकदा ही वाटचाल सुरू झाली म्हणजे ती थांबवता येत नाही, फक्त तिचा वेग कमी करता येतो. या सगळ्याचा धांडोळा घेतला तर एक गोष्ट स्पष्ट होईल. तुम्हाला मधुमेह व्हायला नको असेल तर त्याचा श्रीगणेशा अगदी लहानपणी, शिशुवयात करायला हवा. मुलांना सकस अन्न खायची सवय याच वयात लावावी. ती जन्माला येतात, तेव्हा सवयी घेऊन थोडीच येतात. आपणच त्याना बिघडवतो. पाकीटबंद तेलकट पदार्थ खायला देतो. फळं देण्यापेक्षा फसफसणारी पेयं देतो. त्यांच्यापेक्षा आपणच जास्त दोषी असतो.
थोडासा व्यापक विचार केला तर फार मोठय़ा प्रमाणात मधुमेहाची अटकाव करता येईल. टीव्ही, व्हिडियो गेम यातून बाहेर काढून मुलांनी मदानी खेळ खेळावेत यासाठी त्यांना प्रवृत्त करता येईल. शाळेतल्या उपहारगृहात सामोसे, बटाटेवडे वगरे ठेवण्याऐवजी फळं, भाजीपोळी, फळांचे रस देता येतील. वाढदिवस साजरा करण्याची परिमाणं बदलता येतील. सहज उपलब्ध होणाऱ्या पण आरोग्याचं नुकसान करणाऱ्या पाकीटबंद, बाटलीबंद पदार्थावर कायदेशीर बंधनं आणता येतील. मुलांच्या मनाची काळजी घेणं, स्पध्रेतला जीवघेणा भाग कमी करणं ही तर राष्ट्रीय समस्या मानायला हवी. तसं करण्यासारखं खूप आहे. सगळ्यात महत्वाचं आहे ते आपली मानसिकता बदलण्याची. आपण नशीबावर भरवसा ठेवतो आणि आयुष्यात कधीच आजारी पडणार नाही, असं गृहीत धरून तो होऊ नये यासाठी काहीच करत नाही. हे बदललं तरी खूप झालं.