लोणी आणि तूप हे पदार्थ खावेत की न खावेत याबद्दल कायमच वेगवेगळी मते मांडली जातात. पण या दोन्ही गोष्टी योग्य प्रमाणात खाल्ल्यास आरोग्यासाठी हितकारक आहेत.लोणीदुधाच्या साईचे दही लावून ते घुसळून बनवलेल्या ताकापासून काढलेले लोणी प्रकृतीस हितकर असते. त्यात प्रामुख्याने ‘अ’, ‘ई’ आणि ‘ड’ जीवनस’त्त्वे असतात. इतर अँटिऑक्सिडंटस्देखील लोण्यात असून ते स्निग्ध गुणात्मक आहे. त्यात ‘ग्लुकोज पिंगो लिपिड’ नावाचे तत्त्व असते. हे तत्त्व आपल्या पचन संस्थेचे संरक्षण करते. त्यातील आयोडिनचा थायरॉईड ग्रंथींच्या तक्रारींवर फायदा होतो. त्वचा, डोळे आणि हाडांच्या आरोग्यासाठीही लोणी उपयुक्त आहे. आयुर्वेदात काही औषधे लोण्याबरोबर दिली जातात. सांधेदुखीवरही त्याचा खूप फायदा होतो. * लोणी नेहमी ताजे असताना खावे.* पिवळट पडलेले किंवा वास येणारे लोणी औषधासाठी वापरू नये.* एका वेळी एक मोठा चमचा भरून (१ टेबलस्पून) लोणी खाण्यास हरकत नाही. * सकाळी लोणी व खडीसाखर खाल्ल्यास आरोग्याच्या अनेक तक्रारींवर फायदा होतो.* थालिपीठासारख्या थोडय़ा रुक्ष असलेल्या पदार्थाना लोण्याची जोड द्यावी. * आजार असलेल्या व्यक्तींनी मात्र लोणी खाण्यास सुरुवात करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.* लोणी जास्त खाल्ल्यास मळमळते, अपचनाचाही त्रास होऊ शकतो. तूपलोणी कढवून त्यापासून तूप तयार होते. हे तूप गाळून घेतल्यावर खाली राहिलेला भाग म्हणजे तुपाची बेरी. लोण्यापासून अशा पद्धतीने तयार केलेले साजूक तूप औषधी असते. साजूक तुपातील ओमेगा- ६ व ओमेगा- ३ फॅटी अॅसिडस्चे प्रमाण असे असते की ते योग्य प्रमाणात खाल्ले गेल्यास त्याचा दुष्परिणाम न होता उलट हृदयाचे आरोग्य सांभाळले जाते. तुपातील ‘कोलीन’ हे तत्त्व स्मरणशक्तीसाठी उपयुक्त असते. तूप हे उत्तम पाचक असल्याने जड जेवणात त्याचा वापर सयुक्तिक ठरतो. त्याने पाचकरसांचे उद्दीपन केले जाते. * सकाळी व रात्रीच्या रोजच्या जेवणात २ छोटे चमचे भरून तूप घ्यावे. तूप पातळ असल्यास त्याचे प्रमाण थोडेसे अधिक चालू शकेल. * मसालेभात, पुरणपोळी अशा जड पदार्थाच्या जेवणात थोडे अधिक तूप घेतलेले चालू शकेल. * मुलांना अधूनमधून तूप- मेतकूट भात द्यावा. * काही भाज्यांना तुपाची फोडणीही देता येईल.* तुपातील गोड पदार्थ खाण्यावर मात्र र्निबध हवा.* आजार असलेल्या व्यक्तींनी तूप खाण्यास सुरुवात करताना आपल्या डॉक्टरांशी बोलून घेणे गरजेचे आहे. * तूप योग्य प्रमाणात खाल्ल्यास त्याचा हृदयाला फायदा जरी होत असला तरी आपल्यासाठी ते प्रमाण काय असावे हे ठरवण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला गरजेचा आहे. * तूपही अति खाल्ल्यास मळमळते. - डॉ. संजीवनी राजवाडे -dr.sanjeevani@gmail.com