मधुमेहात औषधं आयुष्यभर घ्यावी लागतात का?
असं समजण्यात काही अर्थ नाही. पण हे म्हणताना काही सत्य गोष्टी तुमच्यासमोर मांडाव्या लागतील. मधुमेहाचं निदान होईपर्यंत तुमच्या शरीरात इंश्युलीन तयार करणाऱ्या साधारण ५० टक्के पेशी निकामी झालेल्या असतात. म्हणजे शरीरात बराच गोंधळ आधीच झालेला असतो. तो निस्तरून तुमच्या शरीराला पूर्ववत आणायला खूपच शिस्तीची गरज लागते. अगदी न चुकता व्यायाम करणं, पथ्य काटेकोरपणे पाळणं अत्यंत आवश्यक आहे. इतकं करून देखील सगळ्याच रुग्णांना औषधमुक्त होता येत नाही, कारण त्यांच्या शरीरातला गोंधळ केवळ व्यायाम आणि आहार याने नियंत्रणात येण्याच्या पलीकडे गेलेला असतो. आमच्या एकंदर रुग्णांपकी जेमतेम ०.३ ते ०.४ टक्के इतकंच हे करू शकतात. यावरून हे किती कठीण आहे याचा अंदाज यावा.
या औषधांचे दुष्परिणाम होतात का?
जगात ज्या गोष्टींचा परिणाम होतो त्याचे काही न काही दुष्परिणाम असतातच. प्रचलित वैद्यक याकडे वेगळ्या दृष्टीनं बघतं. कुठल्याही औषधाचा फायदा आणि तोटा यांचं गणित मांडल्यावर फायद्याची बाजू खूप मजबूत असेल तरच ते औषध बाजारात येतं. म्हणूनच मधुमेहाच्या औषधांचे दुष्परिणाम होत नाहीत असं नक्कीच नाही. परंतु मधुमेहाचा इलाज न केल्यानं होणारं नुकसान प्रचंड आहे हे लक्षात घेतलं की नियमित औषधं घेण्याची गरज पटते.
मधुमेहाच्या औषधांच्या दुष्परिणामांबाबत प्रसारमाध्यमांमधून लेख येतात. ते खरे असतात का?
प्रसारमाध्यमे त्यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे हे लेख देतात. लोकांना सावध करावं, त्यांना न कळलेल्या गोष्टी त्यांच्या लक्षात आणून द्याव्यात, असा चांगला उद्देश त्यामागे असतो. बहुधा हे लेख आमच्याच एखाद्या जर्नलमधल्या आर्टकिलवर बेतलेले असतात. त्यामुळे त्यात सत्यांश नसतोच, असं म्हणता येत नाही. परंतु इथं एक बाब समजून घेतली पाहिजे की कुठलंही शास्त्र प्रवाही असतं. त्यात सतत अभ्यास चालू असतो. अभ्यासात काही वावगं आढळलं तर त्याची नोंद आमची जर्नल घेणारच. बऱ्याचदा काही काळाने दुसऱ्या एखाद्या वेळी तो मुद्दा खोडून काढणारा लेखदेखील जर्नलमध्ये येतो. त्याची दखल प्रसारमाध्यमे घेतातच असं नाही. मध्यंतरी अशाच एका लेखाने लोकांमध्ये घबराट माजली होती. एका औषधामुळे कर्करोग होतो असा दावा त्यात होता. पुढं हे खरं नाही हे कळलं. पण ही बातमी लोकांपर्यंत पोचली नाही. म्हणूनच अशा बातम्यांनी विचलीत होण्यापेक्षा डॉक्टरांसोबत सांगोपांग चर्चा करणं केव्हाही चांगलं.

आयुर्वेदिक पावडरी मिळतात त्यांचं काय?
आयुर्वेदाकडे उत्तम औषधं असावीत. त्यांचं प्रमाणीकरण होणं मात्र गरजेचं आहे. स्वस्त आणि मस्त अशा कुठल्याही गोष्टीनं तुमचा मधुमेह नियंत्रणात राहात असेल तर त्याचं स्वागत केलंच पाहिजे. परंतु कोणीतरी काहीतरी सांगून तुमची फसवणूक करणार नाही याचीही शाश्वती दिली गेली पाहिजे.

या औषधांचे दुष्परिणाम काय असतात?
मधुमेहात अनेक प्रकारची औषधं दिली जातात. पकी मेटफोर्मीन जवळ जवळ सगळ्या रुग्णांना दिलं जातं. यात पोट फुगणं, शौचाला होणं यासोबत ‘ब’ जीवनसत्त्वाची कमतरता येऊ शकते. मूत्रिपडाचा त्रास असलेल्यांमध्ये ते जपून वापरावं लागतं. यापाठोपाठ शरीराला इंश्युलीन बनवायला भाग पाडणारी सल्फोनीलयुरिया गटाची औषधं येतात. त्यांच्यामुळं कधी कधी ग्लुकोज खूपच कमी होऊ शकतं. सल्फाची अ‍ॅलर्जी असणाऱ्या काही लोकांना यांचीही अ‍ॅलर्जी होऊ शकते. अल्फाग्लूकोसायडेज नावाच्या पाचकरसावर काम करणारी औषधं पोटफुगी करतात. इंश्युलीनमुळे ग्लुकोज फारच कमी होण्याचा धोका असतो. इतर नव्या औषधांचे दुष्परिणाम कमी असल्याचा दावा कंपन्या करतात. पण त्यांचे दावे थोडे अतिशयोक्त असू शकतील.
मधुमेहाची औषधं कधी घ्यावीत, जेवणानंतर की आधी?
हे औषधागणित बदलतं. त्याची माहिती तुम्हाला तुमच्या डॉक्टरांकडूनच मिळवावी लागेल. इंश्युलीनचे अनेक प्रकार आहेत. त्यातली काही जेवणाआधी पंधरा वीस मिनिटं घ्यावी लागतात तर काहींचा जेवणाशी कुठलाच संबंध नसतो. अल्फाग्लुकोसायडेज गटातली औषधं जेवणाच्या पहिल्या घासासोबत घ्यायची असतात.
जेनेरिक औषधांबद्दल तुमचं काय मत आहे?
मी जेनेरिक औषधांची मोठय़ा प्रमाणात भलामण करतो. जी औषधं आयुष्यभर घ्यायची असतात त्यांची किंमत कमी असणं अत्यंत गरजेचं आहेच. पण त्या औषधांचा दर्जा मात्र उत्तम असायला हवा. त्यावर प्रशासनाचं जबरदस्त नियंत्रण हवं. आम्ही दिलेल्या औषधांचा उपयोग झाला नाही, तर त्यात रुग्णाचंच नुकसान आहे. डॉक्टर फक्त औषधं लिहून देतात. त्या बनवणाऱ्या कंपनीनं त्यांच्या गोळ्यांमध्ये नेमकं काय घातलेलं आहे याची त्यांना सुतराम कल्पना नसते.