आपल्या अर्हतेनुसार योग्य नोकरी प्राप्त करण्यासाठी प्रत्येक उमेदवाराला आवश्यक ती पूर्वतयारी करणे आवश्यक असते. त्याविषयी..

आज एकीकडे योग्य नोकरीसाठी ताटकळत असलेले अनेक युवक-युवती पाहायला मिळतात, तर दुसरीकडे कौशल्यप्राप्त उमेदवारांचा तुटवडा कंपन्यांना जाणवत असतो.. आपण मनाशी निश्चित केलेल्या क्षेत्रात मनाजोगी नोकरी पटकावण्यासाठी प्रत्येकाने अंगभूत क्षमता जाणून घ्यायला हव्यात तसेच त्या क्षेत्रात कुठल्या प्रकारच्या संधी उपलब्ध आहेत याकडेही लक्ष पुरवायला हवे. नोकरी मिळविण्याची पूर्वतयारी करताना खालील गोष्टी ध्यानात घ्याव्यात

* आपला रेझ्युमे शक्य तितका अद्ययावत असायला हवा. शैक्षणिक, तांत्रिक, संगणकीय अर्हता, कामाचा अनुभव, उल्लेखनीय कामगिरीविषयक यादी यांचा समावेश रेझ्युमेत असायला हवा. योग्य नोकरी मिळवण्यासाठी रेझ्युमे परिपूर्ण असणे आवश्यक आहे.
* जे उमेदवार एखाद्या नोकरीत कार्यरत असून नवीन नोकरीच्या शोधात असतात, त्यांना तुलनेने नोकरीच्या संधी लवकर आणि जास्त प्रमाणात उपलब्ध होतात, हे खरे आहे. मात्र, वर्तमानपत्रांतील जाहिरातींच्या रकान्यांकडे बारकाईने लक्ष पुरवल्यास त्यात ‘पाहिजेत’ या सदराखाली प्रकाशित होणाऱ्या अनेक जाहिरातींत ‘अननुभवी/फ्रेशर्स’ साठीही नोकरीच्या संधी उपलब्ध असल्याचे आढळून येईल.
* नोकरीविषयक संकेतस्थळांना भेट द्या. इंटरनेटवर नोकरीच्या संधींची माहिती देणारी अनेक संकेतस्थळे सापडतील. त्यातील काही निवडक स्थळांवर संपर्क साधून, आपल्या अटी, अपेक्षा यांची माहिती देऊन, आपला ‘रेझ्युमे’ त्या संकेतस्थळावर नोंदवता येईल.
* वृत्तपत्रांमध्ये, साप्ताहिकांमध्ये तसेच मासिकांमध्ये आठवडय़ातील काही विशिष्ट दिवशी नोकरीविषयक जाहिराती नियमितपणे प्रसिद्ध होतात. त्यातून नोकरीच्या संधींची माहिती मिळते किंवा अशा जाहिरातींतून आपल्याला विविध उद्योग समूहांचे संपर्क क्रमांक अथवा पत्ता मिळू शकतो. कोणत्या उद्योग क्षेत्रात कोणत्या विद्याशाखेतील उमेदवारांना मागणी आहे, हेही यानिमित्ताने कळते.
* शक्य झाल्यास नावाजलेल्या एखाद्-दुसऱ्या एम्प्लॉयमेंट एजन्सीजमध्ये नोकरीसंबंधित अपेक्षा आणि अटी यांसह आपल्या रेझ्युमेची नोंदणी करावी. यामुळे तुमचा रेझ्युमे अधिकाधिक उद्योग कार्यालयांपर्यंत पोहोचण्यास
मदत होते.
* जितका जनसंपर्क अधिक तितकी नोकरी मिळण्याची शक्यता अधिक असते. हा जनसंपर्क विविध माध्यमांतील असू शकतो. आपले शालेय, महाविद्यालयीन मित्रमंडळी, शिक्षक, सहकारी, शेजारी, नातेवाईक अशा सर्वाना तसेच सोशल नेटवìकग साइट्सद्वारे तुम्हाला कशा प्रकारच्या नोकरीची गरज आहे याची माहिती दिल्यास योग्य संधी सापडण्यास नक्की मदत होऊ शकेल. नोकरीसाठी विचारणा करणे हा कमीपणा नसून त्याला स्वत:च्या प्रगतीसाठी केलेला प्रयत्न म्हणता येईल. खासगी उद्योगक्षेत्रातील बहुतेक कंपन्यांतून होणारी नोकरभरती आपापसातील ओळखीतूनच होत असते.
* आपण निवडलेल्या कार्यक्षेत्राशी संबंधित काही लहान-मोठय़ा उद्योगांच्या कार्यालयातील जनसंपर्क विभाग तसेच मनुष्यबळ विकास विभागांचे दूरध्वनी क्रमांक/ई-मेल शोधा. त्यासाठी इंटरनेटचीही मदत घेता येईल. याद्वारे संबंधितांशी थेट संपर्क साधता येईल. निदान त्या कार्यालयात आपल्यायोग्य नोकरी आहे का, आपल्याला अपेक्षित असलेल्या पदांसाठी कोणती शैक्षणिक अर्हता, अनुभव आवश्यक असतो, ही माहिती नक्कीच मिळू शकेल. ई-मेल किंवा कुरिअरद्वारा तुमचा रेझ्युमे तिथपर्यंत पोहोचवता येईल.
* जवळपासच्या शहरांतील किंवा उपनगरांतील औद्योगिक वसाहतींना भेट देऊन तिथल्या कार्यालयांमधील नोकरीच्या संधी शोधता येतील.
* नोकरीची संधी उपलब्ध असलेल्या ठिकाणी फोनवरून किंवा प्रत्यक्ष संपर्क साधल्यानंतर ‘नोकरी आहे का?’अशी विचारणा करण्यापेक्षा ‘मी आपल्या संस्थेत किंवा कंपनीत हे विशिष्ट काम करू शकतो/ शकते,’ असे सांगितल्यास सकारात्मक परिणाम होऊ शकतो.
* केंद्र सरकार आणि राज्य सरकारची खातेनिहाय विभाग कार्यालये, रेल्वे, महानगरपालिका, महामंडळे, केंद्र व राज्य सरकारच्या अखत्यारीतील संस्था, आस्थापने, सरकारी बँका यांतील नोकरभरती कर्मचारी निवड परीक्षा, यूपीएससी, एमपीएससी, बीएसआरबी, आरएसआरबी यांसारख्या स्पर्धापरीक्षांद्वारे केली जाते. त्याकरता ‘एम्प्लॉयमेंट न्यूजलेटर’सारखी वृत्तपत्रे, दैनिके यांतून प्रसिद्ध होणाऱ्या जाहिरातींवर लक्ष ठेवावे.
* नोकरीसाठी ठिकठिकाणी पाठवलेल्या अर्जाची नोंद ठेवणे आवश्यक असते. उद्योगाचे नाव, संपर्क साधलेल्या व्यक्तीचे नाव आणि दूरध्वनी क्रमांक यांची यादी करावी. ठराविक मुदतीने पाठवलेल्या प्रत्येक अर्जाची कुठवर प्रगती झाली, याचा पाठपुरावा करावा. हे सर्व करतानाच प्रत्यक्ष मुलाखतीला वेळच्या वेळी हजर राहणे, लेखी परीक्षा, समूह चर्चा, मुलाखत याची पद्धतशीर पूर्वतयारी करणे गरजेचे असते.