बंद पडलेल्या किंवा वाया गेलेल्या लॅपटॉपच्या बॅटरींच्या माध्यमातून भारतासारख्या विकसनशील देशातील झोपडपट्टय़ा प्रकाशित करता येऊ शकतात असे एका नवीन अभ्यासात म्हटले आहे. अमेरिकेतील सॅनजोस येथे सादर करण्यात आलेल्या संशोधनात म्हटले आहे की, अमेरिकेने वाया गेलेल्या बॅटऱ्यांच्या काही नमुन्यांची तपासणी केली असता त्यात एलइडी लाईट दिवसाला चार तास चालू ठेवता येईल इतकी म्हणजे सत्तर टक्के ऊर्जा होती.आयबीएम इंडिया येथील संशोधकांनी म्हटले आहे की, दरवर्षी पाच कोटी लिथियम-आयन बॅटरीज फेकून दिल्या जातात, त्यात असलेल्या उर्वरित ऊर्जेतून विकसनशील देशातील झोपडपट्टय़ा प्रकाशित होऊ शकतील. त्यातील ऊर्जा एलइडी किंवा सोलर पॅनल्स किंवा रिचार्जेबल बॅटरीजसाठी वापरता येते. त्यामुळे विकसनशील देशात स्वस्तात दिवे प्रकाशित करता येतील असे एमआयटी टेक्नॉलॉजी रिव्ह्य़ूने म्हटले आहे. लॅपटॉपसारख्या यंत्रात बॅटरी हा सर्वात महाग भाग असतो, त्यामुळे आपण कचऱ्यातून ऊर्जा समस्येवर उपाय शोधून काढत आहोत, असे संशोधक वैज्ञानिक विकास चंदन यांनी सांगितले. स्मार्टर एनर्जी ग्रुपचे ते प्रमुख आहे. आयबीएम समूहाने वाया गेलेल्या बॅटरी काढून त्यांची तपासणी केली, त्यातील चांगल्या बॅटरींचा वापर केला. चार्जिग डोंगल्स व काही मंडले (सर्किटरी) यांचा वापर केला. नंतर त्यांनी या सुधारित बॅटऱ्या बंगळुरू येथील झोपडपट्टीवासियांना तसेच रस्त्याच्या कडेला असलेल्या व्यावसायिक विक्रेत्यांना वापरायला दिल्या. ज्यांनी या बॅटरीज वापरल्या त्यांनी तीन महिन्यांनंतर त्यांच्या मदतीने दिवे व्यवस्थित चालल्याचा अभिप्राय दिला.

जैविक घटकांशिवाय रासायनिक उत्क्रांती
कृत्रिम जीवनाच्या निर्मितीच्या शक्यतेबाबत एक पाऊल पुढे टाकताना डीएनए शिवाय एक रासायनिक संच तयार केला आहे. ग्लासगो विद्यापीठाच्या संशोधकांनी यंत्रमानवांच्या मदतीने रासायनिक प्रणाली प्रथमच तयार केली असून त्यातून नवीन रसायने निर्माण केली जात आहेत याचाच अर्थ हा रासायनिक उत्क्रांतीचा प्रकार आहे. संशोधकांनी यात ओपन सोर्सचा वापर करून बनवलेला यंत्रमानव वापरला असून स्वस्तातील त्रिमिती प्रिंटरही वापरला आहे या प्रिंटरच्या मदतीने पाण्याच्या पेट्रीडिशमध्ये पडणाऱ्या तेलाच्या थेंबांवर नियंत्रण ठेवले जात आहे.
एकेक थेंब हा चार रासायनिक संयुगांचा बनवलेला असून तेलाचे थेंब पाण्यात फिरतात व ते प्राथमिक रासायनिक यंत्रे म्हणून काम करतात व त्यांचे काम रासायनिक ऊर्जेचे रूपांतर गतीज ऊ र्जेत करणे हे आहे. २२० वेगवेगळ्या पद्धतींनी तयार केलेल्या थेंबांवर लक्ष ठेवण्यासाठी यंत्रमानवाने व्हिडिओ कॅमेरा वापरला व त्यांचे विश्लेषण केले. स्पंदन व इतर अवस्थेत त्यांचे गुणधर्म टिपले. तीन प्रकारच्या गुणधर्माचे अवलोकन करण्यात आले. त्यात हालचाली व गती यांचा समावेश होता. नंतर या थेंबांची दुसरी पिढी तयार झाली व यात रोबोटिक सिलेक्शन पद्धतीचा वापर करण्यात आला. वीस वेळा ही प्रक्रिया वापरल्याने थेंब स्थिरावले व उत्क्रांतीचे नैसर्गिक निवडीचे तत्त्व त्यांनी अवलंबले.