अलीकडे फेसबुक व अन्य माध्यमांवर एका बातमीने सर्वाचेच लक्ष वेधून घेतले आहे, ते म्हणजे भारतीय वैज्ञानिकांनी कोय नसलेला आंबा तयार केला आहे. बिहार कृषी विद्यापीठाने केलेल्या संशोधनाला हे गोड फळ आले असून हा आंबा गोड तर आहेच पण रसाळही आहे. यात कोय मात्र नाही. या आंब्याच्या प्रजातीचे नाव ‘सिंधू’ असे ठेवण्यात आले असून तो एक आंबा २०० ग्रॅमचा आहे. इतर आंब्यांपेक्षा त्यात तंतूमय पदार्थ मात्र कमी आहे, म्हणजे तो आरोग्याच्या दृष्टीने फार चांगला म्हणता येणार नाही. इतर आंब्यांमध्ये १५ ते ३० टक्के तंतूमय पदार्थ असतो. हा काही शोध नाही तर फळाची एक नवीन प्रजात तयार करण्यात आलेले आहे. विद्यापीठाच्या फलोद्यान विभागाचे अध्यक्ष व्ही.बी.पटेल यांनी सांगितले की, आम्ही आंबा तयार केला नाही. आम्ही केवळ त्याची चव घेतली आहे. त्यांनी प्रामाणिकपणे सांगून टाकले की, या आंब्याच्या प्रजातीविषयी आम्ही आशावादी आहोत, त्यात आणखी प्रगती होईल. पण सिंधू ही आंब्याची प्रजात महाराष्ट्रातील दापोली कृषी विद्यापीठाने तयार केली आहे. बिहार कृषी विद्यापीठाने या आंब्यांची लागवड २०११ मध्ये केली होती व आता पहिल्या वर्षी त्याला चांगली फळे आली असून हा आंबा उत्पादकांना प्रायोगिक तत्त्वावर उपलब्ध करून देण्यात आला, त्याची विक्रीही करण्यात आली. बिहार कृषी विद्यापीठाचे कुलगुरू एम.एल. चौधरी यांनी सांगितले की, राष्ट्रीय फलोद्यान कायक्र्रमांतर्गत गेल्यावर्षी असे १५लाख टन आंबे उत्पादित करण्यात आले होते.