चौदाव्या गिरिमित्र संमेलनाचे यंदा ११ व १२ जुलै रोजी महाराष्ट्र सेवा संघ, मुलुंड येथे आयोजन केले आहे. यंदा ‘दुर्गसंवर्धन’ ही संमेलनाची मध्यवर्ती संकल्पना आहे. अनेक संस्था दुर्ग संवर्धनाचे कार्य गेली ३०-४० वर्षे करत आहेत. त्यांच्या कामाची दखल घेतली जावी, त्यांना एकत्रित आणावं आणि त्यांना मार्गदर्शन मिळावे यासाठी उद्देशाने या संकल्पना राहणार आहे. महाराष्ट्र राज्याच्या पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालय संचालनालयाचे माजी संचालक डॉ. अरविंद जामखेडकर हे संमेलनाचे अध्यक्षपद भूषविणार आहेत, तर महाराष्ट्राचे शालेय शिक्षण, क्रीडा व सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे हे संमलेनास प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. डेक्कन कॉलेजचे कुलपती डॉ. गोरक्षनाथ देगलूरकर हे विशेष अतिथी असतील. मध्यवर्ती संकल्पनेला अनुसरून संमेलनात अनेक व्याख्याने, परिसंवाद, खुला संवाद, प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यात आले आहे. संमेलनात सहभागासाठी पूर्वनोंदणी आवश्यक असून अधिक माहीतीसाठी ६६६.ॠ्र१्र्रे३१ं.१ॠ ही वेबसाईट पाहावी, प्रवेशिकांसाठी ०२२-२५६८१६३१ या क्रमांकावर संपर्क साधावा. गिरिमित्र सन्मान जाहीर गिर्यारोहण क्षेत्रात विशेष उल्लेखनीय कार्य करणाऱ्या गिर्यारोहकांचा दरवर्षी संमेलनात सन्मान करण्यात येतो. गडकिल्ले हा तमाम डोंगरभटक्यांच्या भटकंतीचा अविभाज्य भाग असतो. मात्र गरज असते ती गडकिल्ल्यांमागचा इतिहास उलगडून दाखविण्याची. इतिहास आणि भूगोलाची सांगड घालून हजारो डोंगरभटक्यांना गडकिल्ल्यांच्या इतिहासाची जाणीव निर्माण करणारे ज्येष्ठ इतिहास अभ्यासक आप्पा परब आणि निनाद बेडेकर यांना यंदाचा गिरिमित्र जीवनगौरव सन्मान जाहीर करण्यात आला आहे. निनाद बेडेकर यांना हा सन्मान मरणोत्तर देण्यात येत आहे. याशिवाय यशवंत साधले, दत्ता फोपे (गिरिमित्र गिर्यारोहक सन्मान), विनय हिंगोणीकर, मुकेश मैसेरी, डॉ. राहुल वारंगे (गिरिमित्र गिर्यारोहक संस्थात्मक कार्य सन्मान), निसर्ग वेध, कोल्हापूर, यूथ होस्टेल महाराष्ट्र राज्य शाखा ( गिरिमित्र गिर्यारोहण संस्था सन्मान), शरद ओवळेकर यांचा विशेष सन्मान करण्यात येणार आहे. ‘नलिनी’चा वेध.. ‘गिरिप्रेमी’ संस्थेने या हंगामात काढलेल्या ‘इंद्रासन’ आणि ‘५२६०’ नामक अनामिक शिखरांच्या मोहिमांपैकी ‘त्या’ अनामिक शिखराच्या माथ्यावर पहिले पाऊल टाकण्यात संस्थेला यश आले आहे. या यशाबरोबरच संस्थेतर्फे या अनामिक हिमशिखराचे ‘नलिनी’ असे नामकरण करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. ‘गिरिप्रेमी’च्या आनंद माळी यांच्या नेतृत्वाखाली गेलेल्या या मोहिमेमध्ये किरण साळस्तेकर, भूषण शेट, संकेत धोत्रे, अनिकेत कुलकर्णी, पवन हाडोळे आणि दिनेश कोतकर या गिर्यारोहकांनी सहभाग घेतला होता. ५२६० मीटर उंचीच्या या अनामिक शिखरावर २८ जून रोजी पहाटे ३ वाजता या गिर्यारोहकांनी अंतिम चढाई सुरू केली आणि सकाळी ८ वाजता त्यांनी माथ्याला स्पर्श केला. खडी चढाई, बर्फ आणि खडक मिश्रित भूस्तर यामुळे या शिखरावरील चढाई ही तांत्रिकदृष्टय़ा अतिशय कठीण समजली जाते. यामुळे या शिखरावर कुठल्याही संस्थेने आजवर चढाई केलेली नव्हती. ‘गिरिप्रेमी’ने केलेली ही पहिली यशस्वी मोहीम आहे. या यशानंतर संस्थेने या शिखराला ‘नलिनी पर्वत’ असे नाव देण्याचे ठरवले असून त्या दृष्टीने हालचाली सुरू केल्या आहेत.