आम्ही कात्राबाईच्या दिशेने निघालो. प्रवरेच्या काठाने पुढे जाऊ लागलो. पात्र हळूहळू निमुळते होत होते. पुढे गेल्यावर उजव्या हाताला रतनगडाची वाट होती, तर डाव्या बाजूला कात्राबाईच्या खिंडीकडे वाट जाते. कात्राबाईचे संपूर्ण जंगल पार करून खिंड ओलांडून मंगळगंगेच्या काठाने पाचनई म्हणजे किमान आठ नऊ तासांचा प्रवास होता. सर्व सहकारी दमले-भागले होते. अखेर कात्राबाईच्या जंगलामध्ये एक योग्य जागा बघून राहण्याचा निर्णय घेतला. वाहते पाणी बाजूलाच होते. पूर्ण अंधार पडायला अजून किमान दीड तास होता. आमची राहायची जागा त्रिकोणी आकाराची होती. शिवाय जागेला पुढच्या बाजूला उतार होता. एका बाजूने खळखळाट करत ओहोळ वाहत होता. सुरक्षेच्या दृष्टीने तिन्ही टोकाला एक-एक 'फायर प्लेस' बनवली. डाव्या हाताला चूल आणि समोर एक मोठी शेकोटी, तर उजव्या हाताला छोटी शेकोटी. जेवणं उरकून खालच्या शेकोटीजवळ सगळेच गप्पा टाकत बसलो होतो. आज झोपणे शक्य नव्हते, यामुळे मग खऱ्या अर्थाने सुरू झाली 'ती जंगलातली रात्र'.रात्र चढू लागली तशी थंडीसुद्धा वाढू लागली. गप्पा ऐन रंगात आल्या, दिवसभर दुरून सुंदर दिसणारे जंगल आता उगाचच भयाण वाटू लागले. अंधारात झाडाच्या आकारांनी लहान मोठय़ा प्राण्यांचे आकार घेतले होते, तर त्यामधून फिरणारे काजवे प्राण्यांचे डोळे बनवत होते. जंगलात असे उघडय़ावर रहायचा, आमचा सर्वाचाच पहिला प्रसंग. बाहेरून सर्व धीट दिसत असले तरी आतून प्रत्येकजण कमी-अधिक घाबरलेला होताच. किमान धाकधुक तरी होतीच. त्यामुळे झोपायचे सोडून सर्व जण एकत्र शेकोटी जवळ बसले होते. इतक्यात एक सहकारी म्हणाली, ‘तुम्हाला कुणाला कुत्रे भुंकायचे आवाज येत आहेत का?’ आता हे काय नवीन? तिच्या मागोमाग अजून कुणाला तरी असेच आवाज ऐकू यायला लागले. तर कोणाला थोडे दूर पाण्यावर त्यांचे डोळे दिसायला लागले. ‘रात्री इकडे ते पाणी प्यायला येत असतील रे. आपण त्यांच्या जागेवर येऊन तर नाही ना राहिलो?’ असे एक ना दोन अनेक प्रश्न. पहाटेचे किती वाजले होते कोणास ठावूक. हळूहळू काही सहकाऱ्यांना थंडी भरू लागली. मग पुन्हा शेकोटी, चहा, गरण पाणी, इलेक्ट्रॉल असे सुरू झाले. रात्र उतरत गेली तशी झोप डोळ्यावर चढत गेली. पहाटे बऱ्याच उशिराने आम्ही बसलो तेथेच कधी झोपलो ते कळले नाही. भल्या पहाटे चारच्या आसपास सर्वाना हाकाटी दिली गेली. इतक्या लवकर कोण उठले माहिती नाही. अंग झटकले (अंघोळी करायच्या नव्हत्याच ना, मग अंग झटकले फक्त) आवराआवरी केली. जागा ठिकठाक केली, आगी पूर्णपणे विझल्याची आणि कचरा नसल्याची खात्री केली आणि पाचनईसाठी पुढे निघालो. आज कात्राबाई पार करत मंगळगंगेच्या काठावर आलो. दोन पावले चालून मागे वळून पाहिले तर ती कालची रात्र चमकून गेली.संपूर्ण ब्लॉग पोस्ट वाचण्यासाठी - blogspot.in/ 2010