वर्षां ऋतूचे आगमन झाले, की काही दिवसांतच साऱ्या डोंगरदऱ्या हिरवाईने नटून जातात. हिरवाईने नटलेल्या या गिरिशिखरांवरून असंख्य जलधारा वाहू लागतात. पश्चिम घाटात तर जागोजागी या अशा जलधारांमधूनच पाऊस दिसू लागतो. या अशाच काही महत्त्वाच्या जलधारांची ही भटकंती. कावळेसाद धबधबाआंबोलीपासून ८ किलोमीटरवर ही एक प्रसिद्ध जलधारा आहे. विस्तीर्ण पठारावर एकत्र झालेले पाणी समोरच्या खोल दरीत या धबधब्याद्वारे कोसळते. या धबधब्याच्या अध्र्या किलोमीटपर्यंत रस्ता आहे. हा धबधबा नेहमी धुक्यात दडलेला असतो. ढगांपाठी पाऊस सुरू झाल्यावर तो दिसू लागतो. दोन टप्प्यांमध्ये हा धबधबा कोसळतो. आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे दरीतून सोसाटय़ाचा वारा वाहू लागला तर हा भलामोठा धबधबा उलटा फिरू लागतो. हे दृश्य पाहणे खूपच मनोहारी असते. आंबोली मुख्य धबधबाआंबोलीहून सावंतवाडीकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर डाव्या बाजूस बा धबधबा आहे. असंख्य जलधारांतून हा धबधबा ३०० फूट खाली कोसळतो. वाहता धबधबा आणि सोबतीला वाहता रस्ता यामुळे या स्थळावर पर्यटकांची कायम गर्दी असते. यामुळे शांतताप्रिय लोकांना हे स्थळ फारसे रुचणार नाही. नांगरतास धबधबाआंबोली ते बेळगाव रस्त्यावर आंबोली या थंड हवेच्या स्थळापासून ११ किलोमीटरवर हा धबधबा आहे. नांगराच्या आकारावरून या धबधब्यास नांगरतास असे नाव पडले. अतिशय चिंचोळय़ा घळीमध्ये हा धबधबा तब्बल ३०० फूट उंचीवरून पडतो. या धबधब्याच्या समोरील बाजूस छोटा पूल आणि गॅलरी उभी केलेली आहे. या गॅलरीमध्ये उभे राहात हा धबधबा पाहू लागलो, की त्याच्या तुषारांमध्ये आपण सहज भिजून जातो. सावडाव धबधबाकणकवली शहरापासून ११ किलोमीटरवर हा धबधबा आहे. कणकवलीजवळच्या बेळणे फाटय़ापासून आत या धबधब्यासाठी जावे लागते. वळणावळणाचा, चढउताराचा आणि हिरव्यागर्द गालिचांमधून जाणारा हा रस्ता फारच मोहक आहे. हा धबधबा पाण्यात उतरण्यासाठी सुरक्षित मानला जातो. या धबधब्याच्या वर एक छोटीशी गुहादेखील आहे. मणचे धबधबामुंबई ते गोवा महामार्गावर तळेरे गाव लागते. येथून विजयदुर्गकडे जाणाऱ्या रस्त्यावर उजव्या बाजूला खाडीपर्यंत डोंगर उतरून गेल्यावर मणचे गाव लागते. या गावाच्या पुढे ३ किलोमीटरवर हा धबधबा आहे. हाच रस्ता पुढे खारेपाटणला जोडलेला आहे. हा धबधबा २०० फूट खोल कोसळतो. याच्या पुढील भागात काही रांजणखळगेदेखील आहेत.