कन्हैयाच्या लोकप्रियतेचे गुणोत्तर हे त्यास होणाऱ्या विरोधाशी निगडित आहे. जेवढा त्यास विरोध अधिक तेवढे त्याचे वृत्तमूल्य आणि उपद्रवशक्ती अधिक..

नरेंद्र मोदी हे गुजरातच्या मुख्यमंत्रिपदी असताना काँग्रेसने त्यांना असाच टोकाचा विरोध केला आणि त्यांना अडवण्याची एकही संधी सोडली नाही. त्याचा परिणाम काय झाला हे देशासमोर आहेच. तेव्हा कन्हैयाला असाच टोकाचा विरोध होत राहिला तर परिणाम यापेक्षा काही वेगळा निश्चितच नसेल.

आपल्या वयास..आणि वकुबासही..न शोभणारी बडबड करीत िहडणाऱ्या कन्हैयाकुमार नामक व्यक्तीस विरोध करणे हा कोणत्याही राजकीय पक्षाचा वा संघटनेचा कार्यक्रम कसा काय असू शकतो? तसा तो असेल तर कन्हैयाप्रमाणेच त्या राजकीय पक्षाच्याही अकलेचे दिवाळे निघाले असे म्हणावयास हवे. जेएनयू प्रकरणात बोलबाला झाल्यानंतर आपणास जणू देशभर राजकीय शहाणपण सांगत बरळण्याचा परवानाच मिळाला असे या कन्हैयास वाटू लागले. अर्थात कोणास काय वाटावे यावर अन्य कोणाचे नियंत्रण असावयाचे कारण नाही. त्यामुळे या कन्हैयास आपण राजकारणपंडित झाल्याचा आभास होत असेल तर त्याचा आनंद हिरावून घेण्याचा अधिकार आपणास निश्चितच नाही. तेव्हा प्रश्न कन्हैयाची स्वत:विषयी समजूत काय आहे हा नाही. परंतु तो जे काही बरळत िहडू लागला आहे आणि त्याला विरोध करणे म्हणजे थोर देशसेवा आहे, असे ज्यांना वाटू लागले आहे त्यांची राजकीय कुवत हा आताचा प्रश्न आहे. त्यामुळेच त्याच्या दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यात जे काही घडले ते दखलपात्र ठरते.

कन्हैया महाराष्ट्रात येणार म्हणजे काही कोणी क्रांतिवीर येणार असे मुदलात वाटून घेण्याचे कारण नव्हते. तसे वातावरण उगाचच निर्माण केले गेले. कन्हैयाच्या रूपाने भारतीय राजकारणास आतापर्यंत ज्याचे गुण हेरण्यात अपयश आले आहे असा कोणी लखलखता तारा मिळाला आहे वा मिळणार आहे, असे अजिबातच नाही. ज्या गावच्या बोरी असतात त्याच गावच्या बाभळीही असतील तर त्या दोघांत काही फार मोठी फारकत असेल असे नव्हे. तेव्हा कन्हैया ज्या अपरिपक्व राजकारण्यांच्या प्रदेशातून उगवलेला आहे त्या राजकारण्यांच्या अपरिपक्वतेचा स्पर्श त्यास झाला नसेल असे मानणे शुद्ध दुधखुळेपणाचे. तरीही काहींना तसा दुधखुळेपणा करण्यात आनंद वाटतो. तेव्हा त्याच्या येण्याने कोणाच्या मनात हर्षोल्हास मावेनासा होत असेल तर त्याबद्दल आक्षेप घेण्याचे काहीही कारण नाही. परंतु त्यांच्या मुंबई आणि पुणे दौऱ्याचा कार्यक्रम जाहीर झाल्या झाल्या तो हाणून पाडण्यात धन्यता मानणाऱ्यांबाबत मात्र आक्षेप घ्यायला हवा, हे निश्चित. याचे कारण असे की या आक्षेपशूरांच्या कृत्यांमुळे कन्हैयाच्या मूळ दौऱ्याचे महत्त्व वाढते याचे भानच त्यांना नाही. कन्हैयाच्या कार्यक्रमाची पत्रके फाडणे, त्याची कार्यक्रम स्थळे बदलण्यास भाग पाडणे, त्याच्या भाषणांमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असे वातावरण तयार करणे आदी सगळे उद्योग शुद्ध शब्दांत सांगावयाचे तर बालबुद्धीचे द्योतक आहेत. याचे साधे कारण हे करणाऱ्यांना राजकारणाचे किमान ज्ञानदेखील नाही. राजकारणात दोन पद्धतीने आपल्या स्पर्धकास नामोहरम करता येते. एक म्हणजे त्याकडे इतके लक्ष द्यावयाचे की त्याचे जगणे हराम व्हावे. आणि दुसरा मार्ग म्हणजे त्यास पूर्णपणे अनुल्लेखाने मारावयाचे. कन्हैयाची हाताळणी दुसऱ्या पद्धतीने होणे गरजेचे आहे. कारण ज्याच्या हाती काहीही राजकीय भांडवल नाही त्याच्याकडे अतिरिक्त लक्ष दिले गेल्यास त्या प्रसिद्धीचा उलटा परिणाम होतो आणि एरवी दुर्लक्ष करावयाच्या योग्यतेच्या व्यक्तीस अकारण मोठेपणा मिळू लागतो. कन्हैयाबाबत उजव्या परिवारातील अतिउत्साहींकडून ही चूक होत आहे. जेएनयूतील आगलावे आणि बिनबुडाचे भाषण सोडले तर कन्हैयाहाती कोणतेही राजकीय भांडवल नाही. महाविद्यालयीन तरुणाची जी काही राजकीय समज असते वा असावयास हवी त्यापेक्षा कन्हैयाची राजकारणातील गती काहीशी अधिक आहे, हे मान्य. परंतु त्यात विशेष असे काही नाही. विद्यापीठीय जीवनात कोणाचा गणित हा हातखंडा विषय असतो तर कोणाचा भाषा वा इतिहास. तसा कन्हैयाचा राजकारण हा विषय चांगला आहे असे म्हणता येईल. परंतु म्हणून तो इतकाही चांगला नाही की तो देशातील सर्वच प्रचलित राजकारणी आणि राजकीय पक्षांचे राजकारण बदलवू शकेल. राजकारणाच्या जोडीला त्याचे वक्तृत्वही बरे. विशेषत: उजव्या गटांतील कंटाळवाण्या बौद्धिकी व्याख्यानांच्या तुलनेत कन्हैयाची बिहारी शैली जिवंत वाटते. परंतु यापलीकडे त्याच्याकडे काही नाही. ते असण्यासाठी जे राजकारण करावे लागते त्यास त्याने अजून सुरुवातही केलेली नाही. त्यामुळे त्याचे तूर्त जे काही सुरू आहे त्याचे वर्णन पोपटपंची यापेक्षा वेगळे काही करता येणे अशक्य आहे. परंतु त्यास ही पोपटपंचीही करू देण्यास विरोध करणे पोपटपंची करणाऱ्याइतकेच बालिश आहे. जेएनयू प्रकरणानंतर या कन्हैयाने आपल्या कथित भाषणांत एकही नवीन मुद्दा मांडलेला नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नावे बोटे मोडणे, नरेंद्र मोदी यांचे सरकार हे भाजपचे कसे नाही आणि संघाचे कसे आहे, त्याची चावून चावून चोथा झालेली टेप वाजवणे आणि मोदी आणि सरकार हे कसे भांडवलशहाधार्जणिे आहेत हे सांगणे या तीनपेक्षा एकही मुद्दा त्याच्याकडे नवीन नाही. मध्ये मध्ये तोंडी लावण्यापुरते जातविषयक भाष्य तो करतो. पण ते तेवढेच. कन्हैया मांडतो त्या मुद्दय़ांत तथ्य असेलही. परंतु ते सिद्ध करावयाचे तर रास्व संघाच्या विचारधारेविरोधात यशस्वी राजकारण आणि समाजकारण करावयाचे. तसे करण्यास कन्हैयास कोणी मज्जाव केलेला नाही. पण ते करावयाचे तर त्यात श्रम फार. आणि वेळही अधिक लागतो. त्यापेक्षा अद्वातद्वा बोलून प्रसिद्धी मिळवणे अधिक सोपे. ही बाब कन्हैयाला जशी लागू पडते तशीच आणि तितकीच त्याच्या विरोधकांनाही लागू पडते. त्यामुळे कन्हैया जे आरोप करतो ते खोटे ठरवण्यासाठी दीर्घकालीन राजकारण करण्यापेक्षा कन्हैयास शारीर विरोध करून प्रसिद्धी पदरात पाडून घेणे अधिक सोपे, हा त्याच्या विरोधकांचा विचार.

अशा तऱ्हेने कन्हैया आणि त्यास विरोध करणारे हे दोघेही एकाच लायकीचे आणि एकाच पातळीवरील असल्याने आपल्यासमोर त्याच यशस्वी खेळाचे तेच तेच प्रयोग होताना दिसतात. रविवारीही कन्हैयावर विमानात झालेला कथित हल्ल्याचा प्रयत्न म्हणजे त्याच नाटकाचा पुढचा अंक. त्यात आनंद मानणाऱ्यांना इतकेही भान नाही की कन्हैयाच्या लोकप्रियतेचे गुणोत्तर हे त्यास होणाऱ्या विरोधाशी निगडित आहे. जेवढा त्यास विरोध अधिक तेवढे त्याचे वृत्तमूल्य आणि उपद्रवशक्ती अधिक. ही एका अर्थाने इतिहासाची पुनरावृत्तीच म्हणावयास हवी. नरेंद्र मोदी हे गुजरातच्या मुख्यमंत्रिपदी असताना काँग्रेसने त्यांना असाच टोकाचा विरोध केला आणि त्यांना अडवण्याची एकही संधी सोडली नाही. त्याचा परिणाम काय झाला हे देशासमोर आहेच. तेव्हा कन्हैयाला असाच टोकाचा विरोध होत राहिला तर परिणाम यापेक्षा काही वेगळा निश्चितच नसेल. कन्हैयाच्या विरोधकांनी ही बाब लक्षात घेतलेली बरी.

मराठी नाटय़संगीताच्या क्षेत्रात काही वर्षांपूर्वी आनंद भाटे नावाचा एक बालक ज्येष्ठांच्या शैलीत हुबेहुब नाटय़गीते सादर करीत असे. त्याच्या गानपाठांतराचे कौतुक म्हणून समाजाने त्यास आनंद गंधर्व अशी उपाधीही दिली. परंतु म्हणून त्या वेळी त्यास काही कोणी पट्टीचा गवई मानले नाही. पुढे भाटे यांच्याप्रमाणे कन्हैयादेखील  गवई होईल कदाचित. पण तूर्त तरी तो राजकारणातील ‘आनंद गंधर्व’च आहे. त्यास उगाच गवयाचा दर्जा देण्याचे कारण नाही.