.. बळींची संख्या वाढतच राहाते.. एखादा जीवनदाताच मॅनहोलमध्ये संपतो.. माणसाच्या आयुष्याला काहीच किंमत नाही?

डॉक्टर दीपक अमरापूरकर, तुम्ही आमच्यासोबत नाही हे वास्तव पचविणे आज अवघड होत आहे. वेदनांनी ग्रासलेल्या असंख्य पीडितांचे आजार दूर करून त्यांच्याही चेहऱ्यावर हसू फुलविणाऱ्या तुमच्या नसण्याची किंमत आम्हाला कधी कळणार हा उद्विग्न सवाल आता आमच्या समाजातील सामान्यांना छळतो आहे. भावनाशील मन असलेल्या प्रत्येकाला छळत राहील असे एक मोठ्ठे प्रश्नचिन्ह मागे ठेवून अनपेक्षिताच्या वाटेवर दबा धरून बसलेल्या मृत्यूच्या जबडय़ात अचानक तुम्ही सापडलात. संवेदना असलेल्या प्रत्येक मनात उचंबळून येणाऱ्या भावना आता तुमच्यापर्यंत पोहोचणारदेखील नाहीत, हे आम्हाला ठाऊक आहे. ज्या वैद्यक क्षेत्रात तुम्ही तुमच्या ज्ञानाच्या जोरावर एक अफाट उंची गाठली होती, त्या क्षेत्राने आधुनिक तंत्रज्ञानाची सारी क्षेत्रे पादाक्रांत केली होती, त्याच्या साह्य़ाने आणि आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर तुम्ही तुमच्या उण्यापुऱ्या आयुष्यात अनेक जीव वाचविले असतील आणि त्या जगलेल्या जीवांचा दुवाही घेतला असेल. ती पुण्याई सोबत घेऊन तुम्ही या जगातून निघून गेला आहात. तसे तर, जन्माला आलेल्या प्रत्येकालाच कधी ना कधी जावे लागतेच. इथे कुणीही – अगदी सत्ताधीशही – अमरपट्टा घेऊन जन्माला आलेले नसतातच. काहींना तर उन्मत्त आयुष्यात भोगलेल्या उन्मादाची फळे जिवंतपणातच भोगावी लागतात असेही म्हणतात. पण तशी फळे भोगावी लागतील असे काहीही ज्यांनी आपल्या उभ्या आयुष्यात केलेले नाही, त्यांना तर अनेकदा त्यापेक्षाही अगोदर, अनपेक्षितपणे जगाचा निरोप घ्यावा लागतो. हे सारे अनाकलनीय आहे. एखाद्याच्या तशा अनाकलनीय जाण्याने काही प्रश्न नेहमीच उभे राहात असतात. तुमच्या जाण्याने असेच असंख्य प्रश्न अधोरेखित केलेले असतानाच, मुंबईच्याच भेंडीबाजार परिसरातील एका इमारतीच्या दुर्घटनेत अनेक हसतेखेळते जीव एका क्षणात मातीमोल होऊन निपचित झाले. तुमच्या मृत्यूने अधोरेखित केलेला प्रश्नच या दुर्घटनेने आणखी गडद केला.

‘मरण खरंच एवढं स्वस्त झालं आहे का?’.. हाच तो प्रश्न! पण हा प्रश्न एवढा छोटा नाही. केवळ सात शब्दांचा एक पुंजका आणि एक प्रश्नचिन्ह एकत्र जोडून तो संपत नाही. अशा असंख्य दुर्घटना आपल्या डोळ्यादेखत घडत असल्याने आणि अशा दुर्घटनांमध्ये हकनाक जाणारे बळी हतबलपणे पाहात बसण्यापलीकडे काहीच करू शकत नसल्याने, मरणालाही काही सामाजिक स्तर असतो की काय अशी शंकाही येऊ  लागते. डॉक्टर, तुमच्या क्षेत्रात तंत्रज्ञानाच्या साह्य़ाने तुम्ही अनेक जीव वाचविले असले, तरी जीवघेण्या संकटांपासून वाचविण्याचे आमचे तंत्रज्ञान मात्र, अजूनही ‘गावठी जुगाड’ म्हणता येईल इतपतच पोहोचले आहे. त्याच जुगाडी तंत्रज्ञानाने काल तुमचा बळी घेतला. त्याआधी किती तरी जणांना याच मार्गाने मृत्यूने आपल्या जबडय़ात खेचले होते. तब्बल १२ वर्षांपूर्वी, जेव्हा मुंबईत जलप्रलय झाला, तेव्हा अनेक जीव मुंबईच्या ‘मॅनहोल’मधूनच बेपत्ता झाले. याच मार्गाने मृत्यूने अनेक जीव बघताबघता गिळले. त्यापैकी अनेकांचे मृतदेह शोधणेही अशक्य झाले. एक लहानसा मृत्युमार्ग अशा प्रकारे कुणाचाही घास घेऊ  शकतो हे तेव्हाही आणि त्याआधीही किती तरी वेळा स्पष्ट झाल्यानंतरही, उघडय़ा मॅनहोलच्या तोंडाशी बांबू लावण्यापलीकडे कोणतेही नवे तंत्रज्ञान आम्ही अजूनही विकसित करू शकलो नाही, याची आम्हाला खरे म्हणजे लाज वाटावयास हवी. पण राजकारणापायी अंगी भिनलेल्या निगरगट्टपणामुळे ती लाज उघडय़ावर आणणे आम्हाला शक्य नाही. अशा वेळी, कुठे तरी बोटे दाखवून आपल्या लाजेवर पांघरूण घालण्याचा निर्लज्जपणाही करावा लागतो. तुम्ही आमच्यासोबत होता तेव्हा तुम्हीही ते पाहिलेच असेल. अशा किती तरी पिढय़ा ते पाहातच मोठय़ा झाल्या, त्यापैकी काही जण ते पाहातच संपले.

‘जगणे झाले महाग आणि मरण झाले स्वस्त’, ही वेदना याआधीच्या पिढय़ांनाही चिकटलीच होती. अशा किती पिढय़ा अशा वेदना कवटाळून जगत राहाणार, ही नवी जखम आता या वेदनेच्या साथीने माणसाच्या मनात चिघळत चालली आहे. एखादा जीव जन्माला येतो आणि जगाचे आनंददायी रंग अनुभवण्याआधीच जगाचा निरोप घेतो, तर कुणाला जिवंतपणीही जगण्याचा आनंद अनुभवण्याचेही नशिबी नसल्याने तो सहजपणे मरणाला कवटाळून जगणेच संपवून टाकतो. अशा किती तरी जीवांनी आपले जगणे संपवून जगाचा निरोप घेतल्याच्या बातम्या रोजच कानावर पडतात. असे काही झाले, की लाज गुंडाळून ठेवलेल्यांना सांत्वनासाठी पुढे सरसावावेच लागते.  पण, पुढे सरकणाऱ्या काळाशी जुळवून घेण्याची कसरत करताना, जगणाऱ्या प्रत्येक जीवाला डोळ्यात सततचे अश्रू ठेवून चालत नाही. काळाच्या पावलावर पाऊल ठेवून पुढे सरकण्यासाठी डोळ्यातले अश्रू पुसावेच लागतात आणि नव्याने उजाडणाऱ्या प्रत्येक दिवसाने समोर जे काही वाढून ठेवलेले असेल, त्याचा सामनाही करावाच लागतो. त्यामुळे, आपल्या वेदना आणि पालनकर्त्यांच्या घोषणाही विसराव्याच लागतात. कालांतराने अशीच एखादी नवी वेदना समोर उभी ठाकते, पुन्हा जुन्या घोषणांची मलमपट्टी होते आणि पुन्हा काळ पुढे सरकू लागतो.

वर्षांनुवर्षे आम्ही हेच अनुभवतो आहोत. एकीकडे  अन्नधान्याच्या विक्रमी उत्पादनाचा डांगोरा पिटला जात आहे, तरी येथील भुकेची समस्या एखाद्या ठरावीक वर्गाला विळखा घालून बसलेलीच आहे. हजारो भुकेले जीव अन्नाचा एखादा कण पोटात पडावा यासाठी तडफडत आहेत, नवप्रसूत माता आणि नवजात बालके तग धरण्याआधीच कुपोषणाच्या समस्येशी झगडतच अखेरचा श्वास घेत आहेत. दु:ख, दैन्य, दारिद्रय़ाचे जन्मजात अनुभव घेत जगण्याचा संघर्ष करणाऱ्या पिढय़ांच्या पोटी नव्याने जन्मला येणाऱ्या पिढय़ांनाही या विधिलिखितातून सुटका मिळालेली नाही, तेही त्याच स्थितीत जन्म घेतात आणि अखेर समस्यांशी झगडताना शरणागती पत्करून मरणाला कवटाळतात. अगदी कालपरवा, उत्तर प्रदेशातील गोरखपूरच्या इस्पितळात अनेक निष्पाप बालकांनी उपचाराच्या दिरंगाईमुळे तडफडून प्राण सोडले. या मुलांचा काहीही दोष नसताना, केवळ यंत्रणेच्या हलगर्जीपणाचा फटका साठहून अधिक बालकांना बसला आणि त्यांची आयुष्ये फुलण्याआधीच कोमेजून गेली. सामान्य माणसांचे जग या दुर्घटनेच्या दु:खाचे ओझे घेऊन अश्रू ढाळत असतानाच, ऑगस्टमध्ये असे मृत्यू होतातच असा बेमुर्वतखोर दावा करणारा माणुसकीचा काळिमाही आम्ही अनुभवला. मनुष्यपणाच्या पातळीखालचे जिणे जगणारे असंख्य जीव आसपास जिवंतपणीही मरणयातना भोगत आला क्षण मागे ढकलताना पाहूनही आम्ही कुठल्या तरी स्वप्नांची गाठोडी डोक्यावर वागवत उज्ज्वल उद्याच्या आशेने अश्रू पुसतच राहतो..

काही भावना डोळ्यांना दिसत नाहीत. कारण भावना ही काही भौतिक स्थिती नाही. तरीही गरिबी, उपेक्षा, शोषण हीच दु:खाची मुळे आहेत आणि दु:ख हे शोषणातूनच निर्माण होते. अशा शोषितांना जगण्याचा आनंद देण्यासाठी केवळ कोरडय़ा सहानुभूतीच्या शब्दांची फुंकर पुरेशी नाही. ट्विटरसारख्या समाजमाध्यमावरून सहानुभूती दाखविल्याने, केवळ चिंता व्यक्त करणाऱ्या शब्दांची फुंकर मारल्याने किंवा यंत्रणांशी संपर्कात असल्याची ग्वाही देण्याने या समस्या संपत नाहीत आणि शोषणाने कुपोषित झालेल्यांचे अश्रूही पुसले जात नाहीत. शोषित समाजाला आणि संकटग्रस्तांना मदतीचे प्रत्यक्ष हात देण्याची गरज असते. काहीच दोष नसताना एखादा जीव अनपेक्षितपणे जगाच्या अस्तित्वावरून पुसला जाण्याआधी त्याच्या सुरक्षेची हमी देण्याची गरज असते, ही जाणीव केव्हा जागी होणार, हा प्रश्नदेखील त्या सात अक्षरी प्रश्नाला आता जोडला गेला आहे. याआधी इमारती कोसळून अनेक निष्पाप जीवांचा मृत्यूने घास घेतला. अपघातांसारख्या दुर्घटना तर पावलोपावली दबा धरूनच राहिलेल्या आहेत. डॉक्टर, तुमच्या जाण्याने अधोरेखित केलेल्या त्या प्रश्नचिन्हाआधी असे अनेक प्रश्न दिवसागणिक जोडले जाणार आहेत. त्यातून समाज नैराश्यग्रस्त होण्याआधीच संबंधितांनी एक विचार करावयास हवा. तो म्हणजे, ‘एखाद्याला आनंददायी जगणे आपण देऊ  शकत नसू तर निदान मरण तरी असे दुर्दैवी असणार नाही एवढे तरी पाहायला हवे’.. डॉक्टर, तुम्ही हा विचार अधोरेखित करून गेला आहात!

  • एखाद्याला आनंददायी जगणे आपण देऊ शकत नसू तर निदान मरण तरी असे दुर्दैवी असणार नाही एवढे तरी पाहायला हवे’.. डॉक्टर दीपक अमरापूरकर ,तुम्ही हा विचार अधोरेखित करून गेला आहात!