विकसित देशांतही आफ्रिकींना अकारण अपमानास्पद वागणूक मिळते. परंतु आपण आणि हे विकसित देश यांतील फरक म्हणजे ते जे काही होते ते मान्य करतात..

भारत सुसंस्कृततेच्या आघाडीवरही तिसऱ्या जगातच मोडतो. आपले मागासलेपण हा मुद्दा नाही. तर ते घालवण्यासाठी आपण प्रयत्न सुरू केले आहेत की नाही, हा मुद्दा आहे. या प्रश्नाचे प्रामाणिक उत्तर नाही असेच द्यावे लागेल..

ज्या देशात गोरेपणा हा विशेष गुण मानला जातो त्या देशात आफ्रिकी नागरिकांवर केवळ त्यांच्या कातडीच्या रंगामुळे जीवघेणे हल्ले होत असतील तर त्याचे अजिबात आश्चर्य वाटायचे कारण नाही. आपल्या चोविसाव्या वाढदिवसासाठी अवघ्या काही पळांचा अवकाश असताना मासोंदा ओलिव्हिए या आफ्रिकी तरुणाची नवी दिल्लीत जमावाकडून हत्या झाली. रिक्षात आधी कोणी बसावयाचे यावरून मासोंदा आणि त्याच्या मित्राचे स्थानिकाशी मतभेद झाले आणि तिचे मारामारीत पर्यवसान होऊन त्यात मासोंदा मारला गेला. नेहमीप्रमाणे त्यानंतरच्या तपासात हा वर्णभेदाचा प्रकार नाही, वगैरे सारवासारव होत असली तरी मासोंदा याच्या त्वचेचा रंग काळा होता हे कारण त्याला झालेल्या मारहाणीमागे आहे हे निश्चित. मासोंदा पाश्चात्त्य वा युरोपियनांप्रमाणे गोरापिट्ट असता तर त्यास विरोध करणाऱ्या भारतीयांनी कमरेत लवत त्या गौरवर्णीयास स्वत:हून आधी रिक्षात बसू दिले असते. इतके आपण गोऱ्यापुढे विरघळणारे आहोत. त्यामुळे चेहरा उजळवून देणारे मलम आपल्याकडे उत्तम गल्ला कमावते आणि एखाद्या टिनपाट घराच्या जाहिरातीत गोरी युवती दाखवली गेली तर घराची मागणी कित्येक पटींनी वाढते. आपली गोरेपणाची असोशी इतकी की आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या तोंडीही ‘अशीच अमुची आई असती’ अशा ओळी घातल्या. परंतु अनेक पाश्चात्त्य देशांप्रमाणे आपण केवळ कातडीच्या रंगावरच भेदभाव करतो असे नाही. आपणास त्यासाठी मुबलक कारणे उपलब्ध आहेत. धर्म, जात, गोत्र, भाषा अशा अनेक कारणांधारे भेदभाव करण्याची संधी भारतीयांना उपलब्ध असून आपण ती कधीही वाया घालवीत नाही. तेव्हा दिल्लीत जे काही झाले ते आगळे नाही. पण त्यामुळे आपले मागासपण त्यामुळे नव्याने अधोरेखित होण्यास मदत झाली. याचे कारण मासोंदा हा काही आपल्या वांशिक वा जातीय मानसिकतेचा पहिला बळी नव्हे. सध्याचे वातावरण लक्षात घेता तो शेवटचाही ठरेल याची खात्री बाळगता येईल अशी परिस्थिती नाही. असे प्रकार आपल्याकडे नित्यनेमाने घडतात. मध्यंतरी बंगळुरूत तर जमावाने एका महिलेची अशीच हत्या केली. ती टांझानियाची होती. तिचा गुन्हा काय? तर तशाच आफ्रिकी वंशाच्या अन्य एका व्यक्तीच्या मोटारीने दुसऱ्याच स्वतंत्र घटनेत एका स्थानिकास जखमी केले. ज्याच्यामुळे तो जखमी झाला ती व्यक्ती टांझानियन होती तर महिला होती सुदान या अन्य आफ्रिकी देशाची. या दोन्हींत समान धागा एकच. तो म्हणजे वर्ण. या अशा घटना आणि त्यामागची मानसिकता आपल्याकडे इतकी सार्वत्रिक तसेच मुरलेली आहे की देशाच्या राजधानीतील एका मंत्र्याने आफ्रिकी महिलांना वेश्या ठरवीत सरकारी लवाजमा घेऊन त्यांच्यावर एकतर्फी कारवाई करण्याचा प्रयत्न केला होता. यातील निर्लज्ज बाब म्हणजे पुढे याच मंत्र्याच्या पत्नीने नवऱ्याविरोधात गंभीर आरोप केले. दोन वर्षांपूर्वी दिल्ली मेट्रो स्थानकात जमावाने राष्ट्रप्रेमाच्या घोषणा देत तीन आफ्रिकी तरुणांवर प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली होती. या सगळ्याचे तात्पर्य हेच की भारत सुसंस्कृततेच्या आघाडीवरही तिसऱ्या जगातच मोडतो. प्राचीन संस्कृतीची उदात्त परंपरा मिरवणाऱ्या आपल्या देशात अर्वाचीन काळात सभ्यतेचे साधे संकेतदेखील सांभाळणे जड जात असेल तर ही बाब निश्चितच काळजी वाढवणारी. या आघाडीवर आपली चीनशी बरोबरी होऊ शकते. जगाच्या अर्थकारणात निर्णायक वाटा उचलू पाहणारे हे देश वंशवादाच्या मुद्दय़ावर किती समान विचार करतात याचे प्रत्ययही याच वेळेस आले. दिल्लीत आफ्रिकी तरुणाची हत्या होत असताना चीनमध्ये साबणाच्या जाहिरातीवरून वादळ उठले आहे. या जाहिरातीत चिनी तरुणी तिच्याशी लगट करू पाहणाऱ्या आफ्रिकी तरुणाच्या तोंडात ते साबण भरून त्यास धुण्याच्या यंत्रात कोंबते. लगेचच त्या आफ्रिकी तरुणाचे रूपांतर गोऱ्या तरुणात होते, अशी ही जाहिरात. ती प्रसृत झाल्यापासून संबंधित चिनी कंपनीविरोधात टीकेची झोड उठू लागली असून ही वादग्रस्त जाहिरात अखेर मागे घेतली जाईल. परंतु म्हणून तीमागील प्रवृत्ती मागे हटेल असे नाही. तेव्हा या सर्व घटना आपली आणि आपल्यासारख्यांची मानसिकता दर्शवितात.

हा वर्णवर्चस्ववाद आपल्याकडेच होतो असे नाही. अगदी विकसित देशांतही आफ्रिकींना अकारण अपमानास्पद वागणूक मिळते. परंतु आपण आणि हे विकसित देश यांतील फरक म्हणजे ते जे काही होते ते मान्य करतात आणि आपण त्यास तात्त्विक मुलामा देऊ पाहतो. दिल्लीतील प्रकरणातही तेच घडले. अनेक आफ्रिकी देशांनी भारतातील या वर्णभेदी घटनेवर टीका केली आणि पुढे जाऊन भारत सरकारने आयोजित केलेल्या आफ्रिका दिन सोहळ्यावरच बहिष्कार टाकण्याची भाषा केली. त्यानंतर आपण हडबडलो आणि ही वर्णभेदाची आग विझवण्याचे प्रयत्न सुरू झाले. जे काही झाले त्याचे परिणाम आंतरराष्ट्रीय पातळीवर होण्याची शक्यता असल्याने परराष्ट्र खात्यास याचे गांभीर्य अधिक लक्षात आले आणि त्याप्रमाणे परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांचे वर्तन राहिले. त्यांच्या दबावामुळे या हत्येत सहभागी असणाऱ्यांवर कारवाई सुरू तरी झाली. परंतु स्वराज यांच्याच खात्याचे राज्यमंत्री निवृत्त लष्करप्रमुख जनरल व्ही के सिंग यांना हे शहाणपण पाहवले नाही. त्यांनी सदर घटना म्हणजे किरकोळ चकमक असल्याचे विधान केले आणि तीमागे वर्णभेद नसल्याचा दावा केला. या घटनेला माध्यमांनी अकारण प्रमाणाबाहेर जाऊन प्रसिद्धी दिली, असे सिंग यांचे मत आहे. आता आपल्या मंत्री या प्रकरणात लक्ष घालत असताना आपण तोंड उचकटण्याची काहीही गरज नाही, इतके किमान भान तरी या निवृत्त लष्करप्रमुखास असावयास हरकत नाही. पण ते नव्हते. त्यामुळे अव्यापारेषु व्यापार करीत हा गंभीर प्रकार एक किरकोळ घटना ठरवण्याचा प्रयत्न केला. हे टाळता आले असते. पण न टाळले गेल्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर पुन्हा आपली छी-थूच होणार.

याचे कारण विकसित देशांत वर्णभेदाचा मुद्दा अत्यंत गांभीर्याने घेतला जातो आणि तसे कोणी करताना आढळले तर त्यावर कारवाई केली जाते. अब्राहम लिंकन याच्यासारख्या द्रष्टय़ाने वर्णभेदाविरोधात लढाई पुकारली त्यास अडीचशे वर्षे उलटून गेली तरी अमेरिकेतून हा मुद्दा पूर्णपणे निकालात निघालेला नाही. अमेरिकेसारख्या मुक्त देशांत ही परिस्थिती असेल तर भारताच्या मागासपणाचे इतके अप्रूप वाटावयास नको. तेव्हा आपले मागासलेपण हा मुद्दा नाही. तर ते घालवण्यासाठी आपण प्रयत्न सुरू केले आहेत की नाही, हा मुद्दा आहे. या प्रश्नाचे प्रामाणिक उत्तर नाही असेच द्यावे लागेल. मानवी प्रतिष्ठेस तिसऱ्या जगात किंमत नसते. किंबहुना तशी ती नसते म्हणूनच हे जग तिसरेच राहते. तेव्हा हे आपले तिसरेपण सोडावे अशी भारताची इच्छा असेल तर या असल्या प्रवृत्तींविरोधात कठोर कारवाई व्हायला हवी आणि तीत सातत्य हवे. याचे कारण हे असले बदल एका रात्रीत होत नाहीत. त्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागते. ती करण्याची गरज आहे. नपेक्षा आपले हे ‘काळे’ वास्तव बदलणार नाही.