महिन्यातून एकदा प्रसिद्ध होणाऱ्या या सदरातून कुटुंबाच्या अर्थ नियोजनासंबंधाने प्रत्येक मुद्दय़ाचे सखोल चिंतन केले जाणार आहे.

स काळची घाई गडबडीची वेळ. सवयीप्रमाणे कल्याण – छ.शि.ट. लेडीज स्पेशल सगळ्या उद्योगी व नोकरदार लेकींना आणि सुनांना कुशीत घेऊन ठरलेल्या स्थानकांवर पोहोचत होती. अनेक दिवस, महिने, वर्ष धावताना या प्रवासात खूप मैत्रिणी बनतात. प्रवासाच्या वेळेत मजा करणे, एकमेकीच्या छोटय़ा-मोठय़ा समस्या सोडवणे, डब्बापार्टी करत आयुष्याचा ताण कमी करणे हीच या ‘ट्रेन मैत्री’कडून अपेक्षा असते.

hotel Solapur district
सोलापूर : हॉटेल व्यवस्थापनाच्या नावाखाली मित्राला ६८ लाखांचा गंडा, अक्कलकोटमध्ये दागिने लंपास
mumbai ban on slum demolition marathi news, slums mumbai marathi news
झोपडपट्टी पुनर्विकासात परवानगीविना अतिरिक्त झोपड्या तोडण्यावर बंदी, नव्या परिपत्रकामुळे झोपडीवासीयांना दिलासा
jewellery police pune
पुणे : रिक्षा प्रवासी महिलेचे सात तोळ्यांचे दागिने गहाळ; पाेलिसांच्या प्रयत्नांमुळे दागिन्यांचा शोध
traffic congestion will affect industries in metros in future says union minister rajeev chandrasekhar
पुण्यासह इतर महानगरांसाठी धोक्याची घंटा! केंद्रीय राज्यमंत्री चंद्रशेखर यांचा इशारा

arth02अशाच भावनेतून एकत्र आलेल्या या सहा जणी – मीनाक्षी नायर, जिग्ना विसारिया, तिलोत्तमा बॅनर्जी, सिल्वी डिसूझा, यास्मिन अख्तर आणि सुगंधा शेलार. यांची मैत्री जरा वेगळीच म्हणावी लागेल. सगळ्यांचे वय, भाषा, नोकरी, कुटुंब आणि गाडीतून चढायचे—उतरायचे स्थानकसुद्धा एक नाही. एकच तार जी यांना जोडते ती आहे नवीन शिकून आपली परिस्थिती अजून चांगली करायची जिद्द. तर, या वर्षी या सर्वानी ठरवले की गुंतवणुकीचे नवीन मार्ग अवलंबायचे. नुसते वर्तमानपत्र वाचून आणि निरनिराळे गुंतवणूकपर कार्यक्रम ऐकून काही होत नाही याची जाणीव त्यांना सर्वाना झाली होती. पण गुंतवणूकविश्वाच्या या मोठय़ा आणि खोल समुद्रात उडी मारण्याआधी जरा कोणी मार्गदर्शन केले तर चांगले, असे सर्वाच्याच मनात होते. सर्वात ज्येष्ठ आणि अनुभवी सुगंधाताई यांनी सर्वाना ‘सरप्राईझ’ द्यायचे ठरवले.

त्यांच्या मुलीच्या कार्यालयामध्ये गुंतवणूक सल्लागार म्हणून गेली १५ वर्ष कार्यरत असलेल्या सोनल अगरवाल यांना त्या सोबत घेऊन आल्या. जशी गाडी ठाणे स्थानकावर थांबली, बाकी ५ जणी आतूर होवून गर्दीतून पुढे येणाऱ्या बायकांमध्ये सुगंधाताईचा चेहरा शोधू लागल्या. थोडय़ाच वेळात सुतारफेणी केसांच्या सुगंधाताई हुश्श करत हसऱ्या चेहऱ्याने आपल्या मागे एका स्मार्ट मध्यमवयीन तरुणीला घेऊन आल्या. तिचा सगळा पोशाख आणि व्यक्तिमत्व पाहूनच सगळ्या खुश झाल्या. आल्याबरोबर सुगंधाताई म्हणाल्या, ‘या सोनल अगरवाल. आपल्याला गुंतवणूक मार्गदर्शन करणार आहेत.’ सगळ्यांनी सोनलचे स्वागत करत स्वत:ची ओळख करून दिली आणि या वर्षीचे धोरण सांगितले.

arth03सोनल सर्वाचे कौतुक करत म्हणाली ‘छान छान! तुमच्या या नवीन धोरणाचे काही तरी नाव ठेवूया आणि आजपासूनच श्रीगणेशा करूया.’ यावर जरा जास्तच पुढे पुढे करणारी आणि धारदार नाक असलेली जिग्ना म्हणाली, ‘आम्ही ६ जणी आहोत आणि आम्हाला काहीही माहिती नाही. आजवर वडील, नवरा, नातेवाईक, मित्र-मंडळी किंवा स्वघोषित सल्लागार यांच्यावर विश्वास ठेवून आम्ही पैसे गुंतवत आलो. म्हणून आम्ही कच्चे लिंबू. तर आमच्या या धोरणाला अर्धा डझन कच्चे लिंबू म्हटल्यास काही वावगे नाही. सरस छे के नई?’ तिने पटकन सुचवलेल्या या नावावरून छान हशा पिकला आणि सर्वानी एकमताने हे नाव उचलून धरले. मग सोनल म्हणाली, ‘तर अर्धा डझन कच्च्या लिंबांनो! आधी करू या पूर्वतयारी. गुंतवणूक हे एक ध्येय नसून तो एक निरंतर प्रवास आहे. तयारी चांगली असली की प्रवास सुखकर होतो. कुठे आहोत, कुठे जायचे आणि काय सामान बरोबर घ्यायचे हे माहीत असल्याशिवाय कुणी प्रवास सुरू करतो का? म्हणून ही मेहनत आत्ताच करायची..’असं सांगत तिने तिच्याकडील ‘फोल्डर’मधून तीन कागद काढले आणि म्हणाली, ‘आता तुम्हा सर्वाना सुरुवात करायचीय ती या तीन याद्यांनी. पहिली — तुम्हाला पुढच्या १, ३, ५, १०, १५, २० वर्ष कशासाठी आणि किती पैसे लागतील याची. दुसरी – तुमच्याकडे आजच्या घडीला कोणती गुंतवणूक कशात आणि किती आहे आणि तिसरी म्हणजे तुमची वार्षिक मिळकत/उत्पन्न आणि त्यातून होणारे खर्च कोणते व किती. आणि हे काम करताना आपल्या जोडीदाराला बरोबर घ्या.’ असे म्हणत तिने सोबतच्या चौकटीतील नमुने सर्वाना दाखवले.

या तिन्ही नमुन्यांची छाचाय्चित्रे सगळ्या जणींनी पटापट मोबाईलमध्ये काढून घेतले. सोनलने ते सर्वाना व्यवस्थित वाचायला सांगितले. तिने स्वत:चा फोन नंबरही दिला आणि म्हणाली, ‘काही विचारावसे वाटले तर बिनधास्त फोन करा.’ सर्वानी अगदी छान लक्ष देऊन सोनलचे म्हणणे ऐकले आणि मान डोलावली.

arth04तोवर दादर स्टेशन आले. सोनल पुढे परळला उतरणार होती. म्हणून लवकरच भेटायचे वचन देऊन सगळ्यांना टाटा करत ती उतरणाऱ्या गर्दीत गुडूप झाली. मग सगळ्या जणी एकमेकीकडे बघून हसल्या. रेखीव डोळ्यांची तिलोत्तमा म्हणाली, ‘आज अगदी शाळेत गेल्यासारखे वाटले’. त्यावर मीनाक्षी पटकन म्हणाली, ‘अय्यो! आणि होमवर्क पण मिळाला. अप्पांना कसे समजवायचे हा एक मोठा प्रश्न आहे.’ यावर खोडकर यास्मिन म्हणाली, ‘और नहीं तो क्या! जावेद—अमरीनच्या अब्बांना हे सगळे सांगायचे आणि त्यांचा होकार येईल, अशी अपेक्षा करायची म्हणजे ईदचा चांद बघण्यासारखे आहे. त्यापेक्षा त्यांना न सांगता थोडसे काहीतरी गुपचूप केले तर?’ सुगंधाताई धीर देत म्हणाल्या, ‘हो बाई! भरपूर काम आहे. पण नीट केले तर आपल्याच फायद्याचे. कोणापासून काहीही लपवायचे नाही. सर्व उघडपणे सांगून मगच पाऊल पुढे टाकायचे. हे सगळे आपण आपल्या कुटुंबासाठी करतोय, एकटीसाठी नाही.’

या सर्व चर्चेत सिल्वी मात्र शांत होती. तिला शेवटी जिग्नाने चिमटा काढून जागे केले तशी म्हणाली, ‘माझे तर काही हिशेबच नीट नाहीत. सगळी माहिती गोळा करायची म्हटले तर मला सुट्टी काढावी लागेल. आईच्या आजारपणामुळे वेळच मिळत नाही.’ मीनाक्षी लगेच तिला सावरत म्हणाली, ‘डोंट वरी आक्का! अगं, मी येईन तुझ्या मदतीला. मला तसाही शनिवार—रविवार भरपूर वेळ असतो. आपण दोघी मिळून करू. नाही तरी घरी दिसले तर आई जेवण शिकवायला घेईल. सारखी म्हणत राहते की लग्नानंतर नवऱ्याला काय खायला घालणार. बचत खाते उघडायचे फॉर्म!’ सगळ्या अगदी खळखळून हसल्या. मीनाक्षीच्या आश्वासनाने सिल्वी थोडी निश्चिंत झाली.

आता एकेकीची उतरायची वेळ झाली होती. मनाशी नवी जिद्द बांधून प्रत्येक लिंबू गर्दीतून बाहेर पडले. बघूया पुढच्या सदरात कोण किती मेहनत घेतात ते.

आजची टीप : आर्थिक नियोजनामध्ये सर्व माहिती गोळा करणं हे एक महत्वाचे काम आहे. आपल्या सर्व गुंतवणुकीची माहिती एका ठिकाणी आणि पध्दतशीर ठेवली की पुढचे काम सोपे होते. एखादी मोठी बॉक्स फाईल घेवून त्यात डिव्हायडर लावून आपले सर्व महत्वाचे कागद लावता येतात. या फाइलची माहिती आपल्या जोडीदाराला तर हवीच. शिवाय एखाद्य विश्वासू पण त्रयस्थ व्यक्तीला पण सांगितलेले बरे. देव न करो पण जर एखादी दु:खद घटना नवरा आणि बायको दोघांबरोबर एकाच वेळी घडली तर या फाईलमुळे इतर कुटुंबाला खूप मदत होऊ  शकते. ही फाईल नियमित पणे अपडेट करणे हेसुद्धा महत्वाचे आहे. प्रत्येक महिन्यातला एक दिवस ठरवून या कामासाठी चिकाटीने वेळ द्यावा.

नोट : वरील नमूद नावांचा कुणाही व्यक्तीशी – जीवित अथवा मृत, संबंध नाही. या व्यक्ती पूर्णपणे काल्पनिक आहेत आणि आर्थिक नियोजनाच्या कथेत फक्त वेगवेगळ्या व्यक्तिरेखा म्हणून भूमिका साकारत आहेत.

तृप्ती राणे  trupti_vrane @yahoo.com