जागतिक अर्थव्यवस्थेतील सुधार आणि भारतात परतून आलेल्या वित्तीय सुधारणा यांच्या आशेच्या हिंदूोळ्यावर माहिती तंत्रज्ञान क्षेत्रासारख्या व्यवसायातील २०१३ मधील वाढ उत्तुंग असून अधिकाधिक रोजगारनिर्मितीचे हे वर्ष ठरणार असल्याचा किरण दर्शविण्यात आला आहे.भारतातील दुसऱ्या क्रमांकाच्या इन्फोसिस या आयटी कंपनीचे सह संस्थापक आणि कार्यकारी सह अध्यक्ष एस. गोपालकृष्णन यांनी वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत हा आशावाद निर्माण केला आहे. याबाबत त्यांनी म्हटले आहे की, २०१२ हे वर्ष या क्षेत्रासाठी जागतिक स्तरावर खूपच अस्थिर राहिले आहे. तुलनेत २०१३ अधिक चांगले असेल, असा विश्वास वाटतो.
आपल्या सकारात्मक दृष्टिकोनाला गोपालकृष्णन यांनी अमेरिकेच्या अध्यक्षपदाची निर्विघ्नपणे पार पडलेली निवडणूक आणि विभाजन न झालेल्या युरोपीय देशांचा आधार घेतला आहे. २०१३ हे वर्ष चांगले असेल याचा अर्थ भारतीय माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील संधींमध्ये वाढ होईल आणि तशी शक्यताही मला अधिक आहे, असेही ते म्हणाले.
सध्या या क्षेत्रात २५ लाख रोजगार असून वार्षिक १० टक्के वाढ जरी गृहित धरली तरी दोन ते अडिच लाख रोजगारनिर्मिती अशक्य नाही, असे नमूद करून त्यांनी भारतात गेल्या काही महिन्यांपासून राबविले जाणाऱ्या आर्थिक सुधारणांमुळेही २०१३ मध्ये अर्थव्यवस्थेचा वेग ७ टक्क्यांवर पोहोचेल, असेही म्हटले आहे. आर्थिक वाढीवर आपण देत असलेला भर हा निश्चितच गुंतवणूक करणाऱ्यांसाठी सकारात्मक दिशादर्शक आहे; एवढेच नव्हे नजीकच्या दिवसांमध्ये सरकारद्वारे अधिक प्रोत्साहनपूर्वक उपाययोजनांची घोषणा होण्याची शक्यताही त्यांनी वर्तविली.

भारतीय माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात २५ लाख रोजगार आहेत. वार्षिक १० टक्के वाढ जरी याबाबत गृहित धरली तरी कमी कालावधीत किमान दोन ते अडिच लाख रोजगारनिर्मिती मुळीच अशक्य नाही. भारतात गेल्या काही महिन्यांपासून केंद्र सरकारमार्फत राबविले जाणाऱ्या सलग आर्थिक सुधारणांमुळेही २०१३ मध्ये अर्थव्यवस्थेचा वेग ७ टक्क्यांवर निश्चितच पोहोचेल, असा विश्वास वाटतो. शिवाय जागतिक आर्थिक परिस्थितीही आता सुधारत आहे.
-एस. गोपालकृष्णन.

मारुती झेप!
कामगार-व्यवस्थापन संघर्ष आणि त्यातून काही कालावधीसाठी प्रकल्प बंद ठेवावे लागणाऱ्या मारुती सुझुकी कंपनीने तिसऱ्या तिमाहीत तब्बल दुपटीहून अधिक नफ्यातील वाढ कमाविली आहे. यामुळेच भांडवली बाजारात प्रवासी वाहन निर्मितीतील या कंपनीचा समभाग ४ टक्क्यांनी उंचावला. नेमक्या बिकट कालावधीतील कंपनीच्या वाहन विक्रीवरही विपरित परिणाम कंपनीला भोगावा लागला होता. मात्र ऑक्टोबर ते डिसेंबर दरम्यान कंपनीने ५०१.२९ कोटींचा नफा राखला. वर्षभरापूर्वी हाच नफा निम्मा, २०५.६२ कोटी रुपये होता. मुंबईच्या शेअर बाजारातही यामुळे कंपनीचा समभाग ४.१५ टक्क्यांनी झेप घेत १,६००.२४ वर स्थिरावला. १,६०७.६५ या दिवसाच्या वरच्या टप्प्यावर पोहोचताना समभागाने वर्षभराचे उच्चांकी मूल्यही राखले होते. सत्राअखेर मारुती समभाग सेन्सेक्समध्ये वरच्या स्थानावर होता.