येत्या ३१ मार्च २०१७ रोजी संपणाऱ्या चालू वित्त वर्षांत सार्वजनिक हवाई प्रवासी वाहतूक क्षेत्रातील एअर इंडियाला ३०० कोटी रुपयांचा परिचलित नफा होईल, असा सरकारतर्फे विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.

गेल्या काही वर्षांमध्ये कंपनीचा परिचलित तोटा सातत्याने कमी होत असून त्याचा परिणाम आता कंपनीच्या परिचलित नफ्यामध्ये रूपांतरित होईल, असा विश्वास केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री जयंत सिन्हा यांनी राज्यसभेत व्यक्त केला. एका लेखी प्रश्नाच्या उत्तरात सिन्हा यांनी सांगितले की, कंपनी परिचलन आणि वित्तीय धर्तीवर सुधार नोंदवीत असून त्यामुळेच यंदा ३०० कोटी रुपयांचा परिचलित नफा होण्याची शक्यता आहे. तर करोत्तर तोटा ३,६४३ कोटी रुपयांचे असेल, असेही ते म्हणाले.

गेल्या आर्थिक वर्षांत एअर इंडियाला १०५ कोटी रुपयांचा परिचलित नफा झाला होता. तर करोत्तर नुकसान ३,८३६.७७ कोटी रुपयांचे होते. एअर इंडियातील सरकारी हिस्सा विकण्याबाबत अथवा त्याच्या खासगीकरणाबाबत कोणताही प्रस्ताव नसल्याचे राज्यमंत्री सिन्हा यांनी स्पष्ट केले. कंपनीच्या महसूलवाढीसाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात असल्याचेही ते म्हणाले.

सरकारी हवाई प्रवासी सेवा कंपनी एअर इंडियामध्ये २०२१ पर्यंत ३०,२३१ कोटी रुपयांचे भाग भांडवल ओतण्याचा सरकारचा आराखडा आहे.