‘मुरगाव बंदरा’ला केंद्राकडून दोन पुरस्कार
नवी दिल्ली: नौकानयन मंत्रालयाकडून २०१६-१७ सालासह पुढील पाच वर्षांसाठी लक्ष्य निर्धारीत करण्यासाठी बोलाविलेल्या देशातील बंदर प्रवर्तकांच्या बोलावलेल्या बैठकीत, मुरगांव पोर्ट ट्रस्टला दोन प्रतिष्ठेच्या पुरस्कारांनी गौरवण्यात आले. २०१५-१६ सालात सर्वाधिक रहदारी राहिलेले बंदर म्हणून मुरगांवने बहुमान मिळविला. तसेच ‘आरएफडी’ निकषावरही मुरगांवने सर्वाधिक गुण मिळवून प्रथम पुरस्कार पटकावला. केंद्रीय जहाज बांधणी, भूषृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते मुरगांव पोर्ट ट्रस्टचे अध्यक्ष आय. जेयकुमार यांनी पुरस्कार स्वीकारले. या प्रसंगी नौकावहन सचिव राजीव कुमार, या विभागाचे उपसचिव बरुण मित्रा, बंदर विभागाचे उपसचिव प्रबीर कृष्णा, सागरमाला प्रकल्पाचे उपसचिव आर. के. अगरवाल, उपाध्यक्ष गुरुप्रसाद राय यांचीही उपस्थिती होती.

‘एमटीएनएल’ची नवीन ‘डेटा सेंटर’
मुंबई: अति उच्च तिसऱ्या श्रेणी सेवा गुणवत्ता प्रमाणन असलेली वरळी आणि बेलापूर येथील महानगर टेलिफोन निगमच्या नवीन डेटा सेंटरचे लोकार्पण केंद्रीय दूरसंचार आणि माहिती-तंत्रज्ञानमंत्री रवी शंकर प्रसाद यांच्या हस्ते झाले. केंद्रातील सरकारने दोन वर्षे पूर्ण केल्यानिमित्त ‘विकास पर्व’ या मोहिमेअंतर्गत हा कार्यक्रम योजण्यात आला होता. या निमित्ताने एमटीएनएलने ‘११३०’ हा नवीन सामाईक सेवा क्रमांकही सुरू करीत असल्याचीही घोषणा केली. कॉल बुकिंग, नवीन जोडणीसाठी अर्ज, स्थानांतर वगैरे सेवा या क्रमांकावर संपर्क केला असता ग्राहकांना मिळविता येतील.