चढ्या व्याजदरांसह अर्थकारणातील सगळ्याच चुकांसाठी रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांना दोषी ठरवता येणार नाही, असे मत केंद्रीय नेते अरूण शौरी व्यक्त केले आहे. ते बुधवारी बंगळुरू येथील कार्यक्रमात बोलत होते. सर्व दोष राजन यांना देता येणार नसला तरी महागाई आटोक्यात ठेवण्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून पतधोरणाची आखणी करण्याचा त्यांचा दृष्टीकोन आपल्याला मान्य नसल्याचे यावेळी शौरी यांनी म्हटले.
महागाई आटोक्यात ठेवणे हेच पतधोरणाचे उद्दिष्ट असण्याला माझा विरोध होता. आपण खूप वैविध्यपूर्ण आहोत, भारतातील घटनांचा वेग खूपच जास्त आहे. हेच आपल्या समस्येचे खरे मूळ आहे, रघुराम राजन नव्हे, असे शौरी यांनी म्हटले. राजन व्याजदर चढे ठेवतात, असे सर्वजण म्हणतात. मग महागाईला आटोक्यात ठेवणे हेच पतधोरणाचे ध्येय असले पाहिजे, असा कायदा मंजूर करणाऱ्या संसदेचे काय? तेच समस्येचे खरे मूळ आहे, असे शौरी यांनी सांगितले. तुम्ही एखाद्या व्यक्तीवर महागाईशी लढण्याची जबाबदारी सोपवलीत आणि महागाईशी लढण्यासाठी मोजकेच पर्याय दिले तर तो उपलब्ध साधनांचा वापर करणार, असे सांगत शौरी यांनी सरकारच्या आर्थिक धोरणांविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित केले.