कोळशावर चालणाऱ्या विजेच्या प्रकल्पांकडे उपलब्ध इंधन साठा आक्रसत चालला असून, केवळ सात दिवस वीजनिर्मितीसाठी पुरेल अशा औष्णिक ऊर्जा प्रकल्पांची संख्या ५६ वर गेले असल्याचे बुधवारी सायंकाळी अधिकृतरीत्या सांगण्यात आले. गेल्या आठवडय़ात ही संख्या ५२ इतकी होती. औष्णिक ऊर्जा क्षेत्रातील देशातील सर्वात मोठी कंपनी एनटीपीसीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अपुरा कोळसा साठा असलेल्या तिच्या २३ पैकी सहा प्रकल्पांमधील स्थिती अत्यंत नाजूक बनली आहे. दिल्ली आणि राष्ट्रीय राजधानी क्षेत्राला वीजपुरवठा करणाऱ्या बदरपूर, दादरी आणि झज्जर या वीजप्रकल्पांकडे तर दिवसभरासाठी पुरेल इतकाच कोळसा असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले. कोळशाबाबत स्थिती इतकी भयानक आहे की, एनटीपीसीचे बहुतांश प्रकल्प हे सरासरीच्या तुलनेत २५ ते ३० टक्के कमी क्षमतेने चालविले जात आहेत. या प्रकल्पांना ८० टक्के पुरवठा हा कोल इंडियाकडून होत असतो, पण तिच्याकडून अपेक्षित पुरवठा होत नसल्याने हे संकट उभे राहिले असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.