केंद्रातील मोदी सरकारकडे देशातील जनतेने गेल्या वर्षभरात अवास्तव ठेवल्या असल्याचे विधान भारतीय रिझर्व्ह बँकेचे गर्व्हनर रघुराम राजन यांनी केले आहे. लोकांच्या आशा अपेक्षांचे ओझे घेऊन मोदी सरकार सत्तेत आले. मात्र, कोणत्याही व्यक्तीकडून अशा अवास्तव अपेक्षा ठेवणे चुकीचे असल्याचे सांगत रघुराम राजन यांनी मोदी सरकारची पाठराखण केली आहे. इकोनॉमिक क्लब ऑफ न्यूयॉर्कच्या एका कार्यक्रमात ते बोलत होते. जनतेच्या नजरेत नरेंद्र मोदींची प्रतिमा ‘रोनाल्ड रिगन ऑन व्हाईट हॉर्स’सारखी होती. मोदी सत्तेत आल्यानंतर देशाच्या विकासाला खिळ बसणारे सर्व मुद्दे बाजूला सारून देशाला विकासाची सुसाट गती प्राप्त होईल असे त्यांना वाटत होते. मात्र, अशी अवास्तव आशा ठेवणे योग्य नसल्याचे राजन यावेळी म्हणाले. तसेच गुंतवणुकवाढीच्या दृष्टीने सरकार संवेदनशील असून गुंतवणुकप्रधान वातावरण निर्माण करण्याच्या दृष्टीने सरकारने काही पावले उचलली असल्याचेही राजन पुढे म्हणाले.