वाढती आयात आणि घसरती निर्यात कायम राहिल्याने गेल्या महिन्यातील देशाची व्यापार तूट १३.३५ अब्ज डॉलपर्यंत गेली आहे. तूट आधीच्या महिन्यातील १४.२४ अब्ज डॉलरच्या तुलनेत यंदा कमी असली तरी वर्षभरापूर्वीच्या, ऑक्टोबर २०१३ मधील १०.५९ अब्ज डॉलरपेक्षा ती विस्तारली आहे.
ऑक्टोबरमध्ये ५.०४ टक्के घसरण नोंदविताना देशाची निर्यात गेल्या सहा महिन्यांनंतर प्रथमच नकारात्मक स्थितीत येऊन ठेपली आहे. अभियांत्रिकी, औषधनिर्माण, रत्ने व दागिने या क्षेत्रांत भारताकडून मागणी राहिलेली नाही. ही तिन्ही क्षेत्रे यंदा उणे स्थितीत आली आहेत. मार्चमध्ये यापूर्वी निर्यात नकारात्मक स्थितीत होती. त्या वेळी निर्यात ३.१५ टक्क्यांनी कमी झाली होती. यंदा अमेरिका तसेच युरोपीय राष्ट्रांमधून मागणी कमी असल्याने निर्यात घसरली आहे.
24यंदाच्या ऑक्टोबरमध्ये सोने आयात तब्बल २८०.३९ टक्क्यांनी वाढल्याने तुटीवर दबाव वाढला आहे. वर्षभरापूर्वी याच कालावधीत तूट १०.५९ अब्ज डॉलर होती. ती यंदा १३.३५ अब्ज डॉलर झाली आहे. आयातीमध्ये गेल्या महिन्यात सोने आयात ४.१७ अब्ज डॉलर झाली. आधीच्या वर्षांतील ऑक्टोबरमध्ये ती १.०९ अब्ज होती. दसरा-दिवाळीसारखा सण यंदा या महिन्यात होता. त्यामुळे मौल्यवान धातूची आयात वाढली आहे, मात्र त्याचा परिणाम देशाची व्यापार तूट वाढण्यावर झाला आहे.
सोन्याबरोबच तेल आयातही यंदा १९.२ टक्क्यांनी घसरली असून ती १२.३६ अब्ज डॉलर झाली आहे.
एप्रिल ते ऑक्टोबर या चालू आर्थिक वर्षांतील पहिल्या सात महिन्यांत निर्यात ४.७२ टक्क्यांनी वाढून १८९.७९ अब्ज डॉलर झाली आहे, तर याच कालावधीत आयात १.८६ टक्क्यांनी वाढून २७३.५५ अब्ज डॉलर झाली आहे. यामुळे या सात महिन्यांतील व्यापार तूट मात्र आधीच्या कालावधीतील ८७.३१ अब्ज डॉलरवरून यंदा ८३.७५ अब्ज डॉलपर्यंत घसरली आहे.

सरकारी साहाय्याची मागणी
भारतीय मालाला कमी मागणी असल्याने केंद्र सरकारकडून साहाय्याची मागणी उद्योगांमधून येऊ लागली आहे. ‘फेडरेशन ऑफ इंडियन एक्स्पोर्ट ऑर्गनायजेशन’चे अध्यक्ष रफिक अहमद यांनी सरकारने वित्त तसेच प्रोत्साहन साहाय्याची अपेक्षा केली आहे. तर भारतीय उद्योग महासंघाच्या (सीआयआय) निर्यात-आयात समितीचे अध्यक्ष संजय बुधिया यांनी सरकारने आता त्वरित नवे विदेशी व्यापार धोरण जाहीर करण्याची गरज असल्याचे मत मांडले आहे.