‘लोकसत्ता अर्थब्रह्म’ मंचावर तज्ज्ञांचा गुंतवणूकदारांना सल्ला गुंतवणुकीत सातत्य हवेच. मात्र उपलब्ध आर्थिक स्रोतामधून संपत्ती निर्मिती करताना गुंतवणुकीत सातत्य तसेच संयम आवश्यक आहे. आपण करत असलेल्या गुंतवणुकीतील पद्धती समजून घ्या. ऐकीव माहितीपेक्षा सर्व जाणून घेऊन गुंतवणुकीकरिता पाऊल उचला आणि असे करताना कर चुकवेगिरीसारखा मार्ग जोपासू नका, असा सल्ला अर्थतज्ज्ञांनी मंगळवारी ‘लोकसत्ता-अर्थब्रह्म’च्या मंचावर दिला. डोंबिवली (पूर्व) येथील आगरी समाज सभागृहात आयोजित गुंतवणूक मार्गदर्शन कार्यक्रमात ‘अर्थ वृत्तांत’चे स्तंभलेखक व शेअर बाजार विश्लेषक अजय वाळिंबे, ज्येष्ठ सनदी लेखाकार चंद्रशेखर वझे, अर्थनियोजनकार भक्ती रसाळ उपस्थित होते. ‘रिजन्सी ग्रुप’ प्रस्तुत या कार्यक्रमाचे सहप्रायोजक बीएनपी पारिबा म्युच्युअल फंड तर हा कार्यक्रम बँक ऑफ महाराष्ट्र, केसरी, नातू परांजपे यांनीही पुरस्कृत केला होता. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ‘बीएनबी पारिबास’चे ब्रिजेश कोट्टारापट, नातू परांजपेचे बाळकृष्ण नातू, ‘इंडियन एक्स्प्रेस’चे महाव्यवस्थापक केदार वाळिंबे यांनी उपस्थित वक्त्यांचे स्वागत केले. गुंतवणूकदारांनी विचारलेल्या शंकांचे समाधानही याप्रसंगी अर्थतज्ज्ञांनी केले. शेअर बाजार आणि म्युच्युअल फंड या विषयावर अजय वाळिंबे म्हणाले की, शेअर बाजारातील गुंतवणूक हा काही वर्षांपूर्वी सट्टा समजला जात होता. विशिष्ट समाजातील वर्ग या व्यवसायाकडे आकर्षित होत होता. अलीकडे शेअर बाजाराविषयीची माहिती विविध खासगी शिकवणी, माध्यमे, संकेतस्थळांच्या माध्यमातून मिळत आहे. त्यामुळे शेअर बाजाराकडे गुंतवणूक म्हणून येणाऱ्या वर्गात वाढ झाली आहे. शेअरमध्ये केलेली गुंतवणूक प्रत्येक वेळी दुप्पट होतेच, असे नाही. अनेक वेळा तोटा सहन करावा लागतो. संपत्ती दुप्पट होण्याचे स्वप्न पूर्ण करायचे असेल तर आपण ज्या प्रकारात गुंतवणूक करणार आहोत त्या व्यवस्थेचा आधी अभ्यास करा. गुंतवणुकीची पद्धत समजून घ्या. अशी विचारपूर्वक केलेली गुंतवणूक चांगला परतावा आपणास योग्य वेळी देते. शेअर बाजारात गुंतवणूक करताना जोखीम असल्याने मनात भीती असते, पण विचारपूर्वक केलेली गुंतवणूक उत्तम परतावा देते. अर्थनियोजनकार भक्ती रसाळ म्हणाल्या की, बाजारात साधी वस्तू खरेदी करताना आपण भाव करतो. मग गुंतवणूक करताना प्रत्येकाने तसेच का करू नये? आपण गुंतवणूक करताना कोणती काळजी घेतली पाहिजे. आपले गुंतवणुकीचे मुख्य लक्ष्य काय आहे याच सर्वागीण विचार करून, तर्कसंगत, अभ्यासपूर्वक गुंतवणूक केली तर निश्चित चांगला परतावा मिळतो. पहिल्या पगारापासून आपण गुंतवणुकीचे नियोजन केले तर उतारवयात आपल्या हातात चांगली संपत्ती राहू शकते. गुंतवणूक करताना उत्पन्नाचा स्रोत, कृती, निर्णय आणि अंमलबजावणी हे सूत्र खूप महत्त्वाचे आहे. कर नियोजनातून संपत्ती निर्मितीचा मार्ग विशद करताना सनदी लेखाकार चंद्रशेखर वझे यांनी सांगितले की, कर चुकवून संपत्ती निर्माण करण्यापेक्षा कर भरणा करून निर्माण केलेली संपत्ती आपणास दीर्घकालीन सुखसमाधान देत असते. आपल्या करातून देशाच्या संपत्तीत वाढ होते. त्यामधून देश विकासाची वाटचाल होत असते. ही साखळी आपल्याला विकासाच्या वाटेवर नेत असते, हा विचार प्रत्येक करदाता, गुंतवणूकदाराने करणे आवश्यक आहे. उत्पन्नाचा स्रोत सुरू झाल्यावर प्रथम त्याचे कर नियोजन करा. कर सल्लागाराचा सल्ला घ्या. आरोग्य, ज्ञान आणि मित्र म्हणून आपण संपत्ती जमा केली आहे, याचे भान ठेवा. ही गुंतवणूक खूप समाधान देणारी असते. विचारपूर्वक केलेल्या गुंतवणुकीत संधी आणि सुरक्षितता असते. या संपत्तीचा आपण दीर्घकालीन लाभ घेऊ शकतो.