सार्वजनिक क्षेत्रातील पोलाद निर्मिती कंपनी ‘राष्ट्रीय इस्पात निगम लिमिटेड’चा ‘नवरत्न’ दर्जा आणखी वर्षभरासाठी वाढविण्यात आला आहे. हा विशेष दर्जा असल्याने कंपनीला आणखी वित्तीय लाभ घेता यावेत यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. कंपनीचा ‘नवरत्न’ दर्जा आता नोव्हेंबर २०१३ पर्यंत विस्तारण्यात आला आहे. दोन वर्षांत कंपनी आपले समभाग भांडवली बाजारात सूचिबद्ध करेल, या अटीवर केंद्र सरकारने १६ नोव्हेबर २०१० रोजी राष्ट्रीय इस्पातला सर्वप्रथम ‘नवरत्न’ हा मान बहाल केला होता. भांडवली बाजारातील अस्थिर वातावरणामुळे कंपनी अद्यापही भांडवली बाजारात उतरू शकलेली नाही. परंतु हिंद कॉपर या सरकारी कंपनीची आजचीच सफल भागविक्री पाहता, राष्ट्रीय इस्पातची भागविक्रीही येत्या मार्चपर्यंत होणे अपेक्षित आहे.