रुपयाचे अवमूल्यन आणि त्यावरील उपाययोजना याबाबत सामान्य माणूस काय करू शकतो, असा प्रश्न ठाणे येथून अरुंधती खंडकर यांनी विचारला आहे. तसे पाहिले तर सामान्य माणूसदेखील बरेच काही करू शकतो. आयात आणि निर्यात यातील तूट म्हणजेच आयात जास्ती असल्याने आपले परकीय चलन मोठय़ा प्रमाणात बाहेर जात आहे ते थांबले तर खूपच सुकर परिस्थिती येईल. सोने आणि डिझेल/ पेट्रोल यांवरील खर्च कमी झाला तर प्रचंड प्रमाणात परकीय चलन वाचेल. आपण एक निश्चय केला की परदेशी वस्तू विकत घेऊन वापरण्याचा अट्टहास मी करणार नाही तर? आज अनेक नामांकित कंपनींची उत्पादने आपल्या देशात तयार होतात पण सौंदर्य प्रसाधनासारख्या गोष्टीही ‘इम्पोर्टेड’ हव्यात असा आग्रह का धरावा? ते तर आपण थांबवू शकतो. सोने म्हणजे काही जीवनावश्यक बाब नाही, ते नाही खरेदी केले तर काय बिघडणार आहे? शेवटी ते दागिन्यांच्या स्वरूपात कपाटात बंद होऊन राहणार आहेत. ‘वेळेला उपयोगी पडते’ हे विधान धाडसाचे आहे, कारण घरातील सोने विकणे ही मानसिकता आपल्या देशात नाही. ऑफिसने गाडी दिली आहे म्हणून त्याचा वारेमाप वापर करून इंधनाचा धूर उडवणारे अनेक महाभाग आहेत. सरकारीच नव्हे तर खासगी कंपनीतदेखील ही उधळपट्टी चालते. एक सत्य पण प्रातिनिधिक उदाहरण देतो. मुंबईस्थित एका कंपनीचा कार्यकारी संचालक. स्वत:च्या मालकीची एक गाडी आहे, शिवाय कार्यकारी संचालक या पदावर असल्याने ऑफिसने गाडी वापरायला दिली आहे. त्यामुळे मालकीची असलेली गाडी वापरलीच जात नाही. गंमत म्हणजे कार्यकारी संचालक या पदावर असल्याने आणखी एक गाडी कौटुंबिक वापरासाठी देण्याची कंपनीकडे तरतूद आहे. वस्तुत: जरी तशी तरतूद असली तरी ही अतिरिक्त गाडी सदर कार्यकारी संचालक नाकारू शकला असता. पण फुकट उडवायला मिळते आहे तर का नाही घ्यायची? ही वृत्तीच देशाला खड्डय़ात नेत आहे. बरे हे महाशय इतके उन्मत्त की एकदा लोणावळ्यातील स्वत:च्या बंगल्यावर शनिवार-रविवारी गेले होते. सोबत त्यांचा मुलगा आणि त्या मुलाचा एक मित्र असे तिघे गेले होते. रविवारी येतेवेळी त्या ऑफिसच्या गाडीतून एक व्यक्ती पुढील सीटवर आणि कार्यकारी संचालक आणि त्यांचा मुलगा मागील सीटवर असे आरामात येऊ शकले असते. पण हे महाशय इतके बडेजावी की त्यांना आपल्या गाडीतून मुलाचा मित्र प्रवास करतोय म्हणजे जणू काही आपल्याला तो कमीपणा आहे या भावनेने ड्रायव्हरसह एकटेच लोणावळ्याहून मुंबईला परतले. ती गाडी परत लोणावळ्याला पाठवली ज्यातून मुलगा आणि त्याचा मित्र आले. एका खेपेत जे काम झाले असते त्याऐवजी दोन खेपा. किती चुराडा झाला इंधनाचा. ही मस्ती, हा माज आणि हा चंगळवाद अर्थव्यवस्थेचे मातेरे करतो आहे. हे एक उदाहरण म्हणून सांगितले. मध्यमवर्गीय कुटुंबे कुठे अपवाद आहेत. एका घरातील ४० वष्रे वयाच्या मुलाने एका ‘स्कीम’च्या अंतर्गत ३५ हजार रुपये किमतीच्या वस्तू २८ हजार रुपयांना मिळतात म्हणून त्या ‘पॅकेज’चा लाभ घेतला!  Money saved is money gained काहीतरी बी.कॉम.च्या वर्षांत शिकलेले होते म्हणून असेल! बरे ते पॅकेज पाठवणाऱ्या कंपनीने त्यात काय काय वस्तू असणार आहेत ते सांगितले नाही व या तरुणानेही विचारण्याची तसदी घेतली नाही. पसे भरून पार्सल सोडवून घेतले तर त्यात मिक्सर होता, विजेवर चालणारी शेगडी होती, मिल्टनची भांडी होती, इस्त्री होती, टॅबलेट होता, तीन मनगटी घडय़ाळे होती. आता विचार करा की घरात अगोदरच मिक्सर आहे मग हा घेण्याची काय गरज होती? मनगटी घडय़ाळे दोन असताना ही आणखी तीन कुणाच्या मनगटावर बांधायची होती? घरात २४ तास गॅस आहे त्यामुळे विजेच्या शेगडीची गरज नव्हती. संसाराला आवश्यक भांडी सर्व घरात असताना नवीन भांडय़ांची काही एक गरज नव्हती. राहता राहिली एक वस्तू म्हणजे इस्त्री! तीच जर घ्यायची होती तर ८००-९०० रुपयांना विकत घेता आली असती! मूर्खपणाचा हा कळस नाही का?  
दर दोन वर्षांला महागडा मोबाइल विकत घ्यायचा हा एक प्रकारचा चंगळवादच जो आता छोटय़ा कुटुंबातही फोफावलाय. एका कुटुंबातील तरुणाने वडिलांच्या एका मित्राकडून पाच लाख रुपये कर्ज बिनव्याजी म्हणून घेतले. काही घरगुती अडचणी होत्या म्हणून. खरे तर या गृहस्थांनी मनाचा मोठेपणा दाखवून इतकी मोठी रक्कम बिनव्याजी दिली तेव्हा ती लवकरात लवकर फेडून त्यातून मोकळे व्हावे असा विचार कुणीही जबाबदार माणूस करील. पण उपरोक्त तरुण या स्थितीतही मोटारसायकल विकत घेऊन ती (अर्थात हप्त्याने) उडवत आहे! अगदी गरज आणि आजच्या काळात आवश्यक आहे म्हणून साधा तीन हजार रुपयंचा मोबाइल घेता आला असता, पण सदर तरुणाने १३ हजार रुपयांचा मोबाइल घेतला आहे. ऋण काढून सण साजरा करायचा म्हणतात तो हा असा!! आपल्या देशात तरुण वयोगटातील व्यक्तींची संख्या खूप मोठी आहे आणि तीच आपली जमेची बाजू आहे असे तज्ज्ञ भले म्हणोत पण त्या तरुण व्यक्ती इतक्या बेजबाबदार असतील तर काय डोंबल या देशाचे ते कल्याण करणार?

RRB Recruitment 2024
RRB Recruitment 2024: रेल्वे विभागात काम करण्याची सुवर्णसंधी; ८ हजारांवर टीटीई पदांसाठी बंपर भरती; ‘या’ तारखेपासून अर्ज प्रक्रिया सुरु
toll plaza
विश्लेषण : भविष्यात टोलनाके बंद होणार? कशी असेल GPS आधारित नवी यंत्रणा?
Transfer of a railway official for answering RTI queries Mumbai
माहिती अधिकाराचे उत्तर दिल्याने, रेल्वे अधिकाऱ्याची बदली
Like daughter even daughter in law can get job on compassionate basis
मुलीप्रमाणेच सुनेलासुद्धा अनुकंपा तत्त्वावर नोकरी मिळू शकते…