रिझर्व्ह बँकेने २० फेब्रुवारीपासून बँक खात्यातून पैसे काढण्याची मर्यादा वाढवल्यानंतर केवळ दोन दिवसांतच देशात पुन्हा चलनटंचाई जाणवण्यास सुरूवात झाली आहे.  या पार्श्वभूमीवर बुधवारी केंद्रीय अर्थसचिव शक्तिकांत दास यांनी लोकांना बँक किंवा एटीएममधून गरजेपुरतेच पैसे काढण्याचे आवाहन केले आहे. सध्या देशातील अनेक भागांतून एटीएम केंद्रातील पैसे संपल्याची तक्रार येत आहे. ही स्थिती लक्षात घेऊन लोकांनी त्यांना हवे तेवढचे पैसे काढावेत, गरजेपेक्षा जास्त पैसे काढल्याने इतरांना पैसे मिळत नसल्याचे शक्तिकांत दास यांनी सांगितले. तर दुसरीकडे दास यांनी १००० रूपयांची नवी नोट चलनात येणार असल्याची शक्यताही यावेळी फेटाळून लावली. आम्ही सध्या पाचशे आणि त्यापेक्षा कमी मुल्याच्या नोटा छापण्यावर भर देत आहोत, असे दास यांनी ट्विटर अकाऊंटवरून सांगितले.

केंद्र सरकारने काही दिवसांपूर्वी बँक खात्यातून पैसे काढण्यावर घालण्यात आलेले सर्व निर्बंध उठविण्याची घोषणा केली होती. येत्या १३ मार्चपासून लोकांना त्यांच्या बँक खात्यामधून कितीही रक्कम काढता येईल. बँक खात्यामधून पैसे काढण्यावरील निर्बंध दोन टप्प्यांमध्ये उठविण्यात येणार आहेत. यापूर्वी बँक खात्यामधून दिवसाला २४ हजार इतकी रक्कम काढता येत होती. मात्र, २० फेब्रुवारीपासून ही मर्यादा ५० हजारापर्यंत वाढविण्यात आली होती. २० फेब्रुवारी ते १३ मार्च या काळात ही मर्यादा कायम राहील. त्यानंतर १३ मार्च रोजी बँक खात्यातून रक्कम काढण्यावरील सर्व निर्बंध उठविण्यात येणार असून ग्राहकांना दिवसाकाठी पूर्वीप्रमाणे हवी तेवढी रक्कम काढता येणार आहे.

८ नोव्हेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निश्चलनीकरणाचा निर्णय जाहीर केल्यानंतर देशात अभूतपूर्व चलनटंचाई निर्माण झाली होती. त्यामुळे सुरुवातीचे काही दिवस सामान्य जनतेला दैनंदिन व्यवहारात मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला होता. चलनटंचाईमुळे बँक आणि एटीएम केंद्रातून रक्कम काढण्यावरही रिझर्व्ह बँकेकडून अनेक निर्बंध लादण्यात आले होते. गेल्या काही काळात हे निर्बंध टप्प्याटप्प्याने शिथील करण्यात आले होते. मात्र, तरीही काही निर्बंध अजूनही कायम होते.

८ नोव्हेंबरला नोटाबंदीचा निर्णय आणि त्याच्या अंमलबजावणीला सुरुवात झाल्यानंतर रिझर्व्ह बँकेने सुरुवातीला २००० आणि त्यानंतर ४००० रुपये दिवसाला काढता येतील, असा नियम जाहीर केला होता. तसेच एका आठवड्यात बँकेतून २४ हजार रुपये काढता येतील, असाही नियम लागू केला होता. गेल्या महिन्यात रिझर्व्ह बँकेने पैसे काढण्यावरील मर्यादेत वाढ करून दिवसाला १० हजार रुपये काढण्याची सूट दिली होती. मात्र, आठवड्याला फक्त २४ हजार रुपयेच काढता येतील, हा नियम कायम ठेवला होता.