मावळत्या संवत २०६८ ने मुंबई शेअर बाजाराची अखेर घसरणीने झाली केली असली तरी या कालावधीत गुंतवणूकदारांच्या ‘लक्ष्मी’त मात्र ५ लाख कोटी रुपयांची भर पडली आहे. शेअर बाजाराचा प्रमुख निर्देशांक ‘सेन्सेक्स’मधील १,४०० अंशांची वाढ ही सरलेल्या सवंताची मोठी कमाई ठरली आहे.
गेल्या वर्षी दिवाळीतील लक्ष्मीपूजनानंतर सुरू झालेल्या संवत २०६८ च्या व्यवहारातून आजपर्यंत सेन्सेक्स ८.२ टक्क्यांनी वधारला आहे. या दरम्यान बाजारात सूचिबद्ध असलेल्या कंपन्यांचे बाजारमूल्य ५ लाख कोटी रुपयांनी फुगले असून ते ६६ लाख कोटी रुपयांपल्याड गेले आहे. ‘सेन्सेक्स’मधील ३० कंपन्यांचे बाजारमूल्यही २ लाख कोटी रुपयांनी वधारून ते ३०.५ लाख कोटी रुपयांपर्यंत गेले आहे.
२०६८ चा प्रारंभ करताना मुंबई शेअर बाजार २६ ऑक्टोबर २०११ रोजी १७,२८८.८३ वर होता. तो आता १२ नोव्हेंबर २०१२ रोजी १८,६८३.६८ वर आला आहे. उद्या मुहूर्ताचे सौदे असल्याने अनेक गुंतवणूकदार त्यांच्या ‘पोर्टफोलियो’ला यानिमित्ताने फेरबदलासह नवे रूप देतात. बाजारात उद्या नियमित व्यवहार होणार नसले तरी नव्या सवंत २०६९चे स्वागत म्हणून ‘सेन्सेक्स’ १८,७०० च्या वर राहण्याची बाजार वर्तुळात अटकळ आहे.
मुंबई शेअर बाजाराचा प्रमुख निर्देशांक अद्यापही त्याच्या ऐतिहासिक उच्चांकापासून २,५०० अंशांनी लांब आहे. १० जानेवारी २००८ रोजी मुंबई निर्देशांकाने २१,२०६.७७ हा सर्वोच्च बिंदू यावेळी व्यवहारात गाठला होता. तर दोन वर्षांपूर्वी दिवाळीतच, ५ नोव्हेंबर २०१० रोजी ‘सेन्सेक्स’ २१,००४.९६ या सर्वोच्च स्थानावर होता.     
धनत्रयोदशीला उलाढाल
रु. १,३३७ कोटी – एनएसई
रु. ६३६ कोटी  -बीएसई
रु. ३२,०३५/ १० ग्रॅम सोमवारी सोन्याचा भाव