जागतिक अर्थव्यवस्थेमुळे एकूणच या अंतर्गत बाजारपेठेलाही जागतिक असे स्वरूप प्राप्त झाले असून त्यात देश व विदेशी उद्योगांनी सातत्याने आपली कामगिरी स्पर्धात्मक दृष्टीने केली आहे. उत्पादन उद्योगांमध्ये जागतिक स्तरावर अलीकडेच चाललेल्या आर्थिक मंदीचा परिणामही झाला आहे. त्यामुळे एकंदर उद्योगामध्ये त्या त्या उद्योगांना प्रभावीपणे काम करणे, दर्जा वाढविणे आणि कार्यात्मक स्तरावरही अतिशय उत्कृष्ट असे काम करणे गरजेजे झाले आहे. स्पर्धात्मक अशी स्थिती असल्याने कंपन्यांना विविध स्वयंचलित अशा पर्यायांना उत्पादनांमध्ये स्वीकारावे लागत असल्याचे दिसत आहे. दीर्घकाळासाठी ही बाब यशाचा मार्ग असल्याने औद्योगिक स्तरावर ऑटोमेशन (स्वयंचलन) गरजेचे बनले आहे. या दृष्टीने विविध उद्योगांमधील या स्वयंचलनाला चालना देण्यासाठी गोरेगावच्या मुंबई प्रदर्शन केंद्रात भारतीय स्वयंचलन तंत्रज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.
सुमारे ३० कंपन्यांनी या प्रदर्शनात आपले तंत्र, उत्पादनातील स्वयंचलनाची यंत्रणा, माहिती, सादर केली. विविध उद्योगांमध्ये ऑटोमेशन म्हणजे स्वयंचलीत अशा तंत्राची व तंत्रज्ञानाची अंमलबजावणी करण्याची ही वेळ असल्याचा हेतू या प्रदर्शनामागे होता. वाहन उद्योगांमधील रोबोचा वापर, माहिती तंत्रज्ञान क्षेत्रामधील आणखी आधुनिक बाबी, औद्योगिक क्षेत्रामधील वायरलेस दळणवळणासाठी असणाऱ्या सुविधा, अशा अनेकविध बाबी या प्रदर्शनात मांडल्या होत्या. विविध उद्योगांच्या दिग्गजांनी या प्रदर्शनात उपस्थिती लावली.
उद्योगांपुढे असणाऱ्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी ऑटोमेशनची गरज कशी आहे, ही बाब प्रकर्षांने मांडण्यासाठी या निमित्ताने आयोजित चर्चासत्रांमध्येही तज्ज्ञांनी आपली मते मांडली. भारतात अशा प्रकारचे प्रदर्शन व संलग्न देवाणघेवाणींचे हे सूत्रच या प्रदर्शनातून स्पष्ट करण्यात आले. जागतिक स्तरावरील स्पर्धेत उतरण्यासाठी भारतीय उद्योगांना ऑटोमेशनची असणारी गरज असल्याने हे प्रदर्शन म्हणजे एक पुढचे पाऊल होते.