अनुत्पादित मालमत्तेचे कमी झालेले प्रमाण, व्याजातून होणारे भरीव उत्पन्न तसेच कर्ज मागणीत झालेली भरघोस वाढ या जोरावर देशातील सर्वात मोठय़ा स्टेट बँकेने तिमाही नफ्यातील थेट २५.१२ टक्के वाढ नोंदविली आहे. जुलै ते सप्टेंबर या चालू आर्थिक वर्षांच्या दुसऱ्या तिमाहीत सार्वजनिक बँकेने ३,८७९ कोटी रुपये रुपये नफा कमावला आहे.
बँकेच्या अध्यक्षा अरुंधती भट्टाचार्य यांनी दुसऱ्या तिमाहीचे वित्तीय निष्कर्ष शुक्रवारी येथे जाहीर केले. अनुत्पादित मालमत्तेचे प्रमाण (एनपीए) लवकरच संपुष्टात येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
ऊर्जा वितरण कंपन्यांच्या कर्ज पुनर्बाधणीसाठी सरकारने सादर केलेल्या ‘उदय’ योजनेमुळे वित्तीय क्षेत्रात शिस्त येईल, असा विश्वास त्यांनी या वेळी व्यक्त केला.