ग्राहक समाधानासाठी टाटा एआयए लाइफ या खासगी आयुर्विमा कंपनीने चालविलेल्या प्रयत्नांचे फलित प्रत्यक्ष दिसून येत आहे. ग्राहकानुभव अधिक दर्जेदार बनवण्यासाठी कंपनीने सादर केलेल्या वेगवेगळ्या उपक्रमांमध्ये ग्राहकांना वक्तशीर सेवेची हमी देणाऱ्या करारालाही सुरुवात केली आहे. ग्राहकांना प्रस्तावाची प्रक्रिया, सेवा विनंती, पेआऊट प्रक्रिया, दाव्यावरची प्रक्रिया आणि तक्रार निवारण आदी कामांसाठी पूर्वनिर्धारित वेळ त्यातून आखण्यात आली असून, त्या वेळेत ही कामे पूर्ण करण्याची हमी देण्यात आली आहे. विशेषत: दावे पूर्तता (क्लेम सेटलमेण्ट) विभागात टाटा एआयए लाइफने उचललेच्या या पावलांची फलश्रुती म्हणून लक्षणीय परिणाम दिसून आले आहेत. कंपनीने २०१५-१६ या आर्थिक वर्षांसाठी वैयक्तिक क्लेम सेटलमेण्टचे ९६.८ टक्के एवढे गुणोत्तर नोंदवले आहे. भारतात विमा क्षेत्रातील सर्वोत्तम गुणोत्तरांपैकी हे एक असून, गेल्या वर्षीच्या ९४.५ टक्के या गुणोत्तराच्या तुलनेतही ही भरीव वाढ आहे. गेल्या तीन वर्षांपासून सर्व पॉलिसींवरील मृत्युपश्चात दाव्यांची पूर्तता दाव्याची सर्व कागदपत्रं मिळाल्यानंतर आठ दिवसांत कंपनी पूर्ण करीत आहे. काही कारणास्तव दाव्यांची पूर्तता करण्यास विलंब झाला तर कंपनी दाव्याच्या रकमेवर सहा टक्के वार्षिक व्याज भरपाईची हमी दिली आहे.