निश्चलनीकरणाच्या निर्णयामुळे आगामी काळात तीव्र चढउतार पाहायला मिळणार असून त्यामुळे प्रगतीचा आलेख काही काळासाठी खालावेल, असे मत रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल यांनी व्यक्त केले. ते एका इंग्रजी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते. यावेळी त्यांनी निश्चलनीकरणाला १०० दिवस उलटल्याच्या पार्श्वभूमीवर सद्यस्थितीचा आढावा घेतला. सध्या चलनीकरणाची प्रक्रिया अत्यंत वेगाने सुरू आहे. याशिवाय, नोटाबंदीनंतर अनेक स्तरावर निर्माण झालेली परिस्थिती सामान्य पातळीवर आणण्यात रिझर्व्ह बँकेने यश मिळवले आहे. नोटाबंदीच्या निर्णयानंतर परिस्थिती पुन्हा पूर्ववत करण्यासाठी पहिल्या दिवसापासूनच पूर्ण क्षमतेने नोटांची छपाई करण्याचे नियोजन करण्यात आले होते, असे पटेल यांनी सांगितले. RBI ने गेल्या काही महिन्यात आपलं काम सुरू ठेवत काही मोठ्या आव्हानांचा मुकाबला केलाय. केवळ रिझर्व्ह बँकच नव्हे तर संपूर्ण बँकिंग व्यवस्थेनेचे खूप महाकाय कामगिरी पार पडली आहे. आव्हानांच्या व्याप्तीचा विचार करता लोक कुठपर्यंत त्यावर मात करतात, हे ध्यानात घेणेदेखील गरजेचे असल्याचे त्यांनी या मुलाखतीत सांगितले.

यापूर्वी रिझर्व्ह बँकेकडून जाहीर करण्यात आलेल्या द्वैमासिक पतधोरणात यंदाच्या आर्थिक वर्षात अर्थव्यवस्थेचा विकासदर ६.९ टक्के राहण्याचा अंदाज वर्तविण्यात आला होता. या पतधोरणात रेपो दरांमध्ये कोणतेही बदल करण्यात आले नव्हते. याशिवाय,  येत्या १३ मार्चपासून बँक खात्यातून पैसे काढण्यावर घालण्यात आलेले सर्व निर्बंध उठविण्याची घोषणाही यावेळी करण्यात आली होती. त्यामुळे बँक ग्राहकांना त्यांच्या खात्यामधून कितीही रक्कम काढता येईल. बँक खात्यामधून पैसे काढण्यावरील निर्बंध दोन टप्प्यांमध्ये उठविण्यात येणार आहेत. सध्या बँक खात्यामधून दिवसाला २४ हजार इतकी रक्कम काढता येऊ शकते. येत्या २० फेब्रुवारीपासून ही मर्यादा काहीप्रमाणात वाढविण्यात येणार आहे. त्यामुळे ग्राहकांना २० फेब्रुवारीपासून त्यांच्या बँक खात्यांमधून ५०,००० रूपये काढता येतील. २० फेब्रुवारी ते १३ मार्च या काळात ही मर्यादा कायम राहिल. त्यानंतर १३ मार्च रोजी बँक खात्यातून रक्कम काढण्यावरील सर्व निर्बंध उठविण्यात येणार असून ग्राहकांना दिवसाकाठी पूर्वीप्रमाणे हवी तेवढी रक्कम काढता येणार आहे.