२०१२ अखेरीस देशांतर्गत प्रवासी वाहन विक्री वार्षिक तुलनेत १२.५ टक्क्यांनी रोडावल्याने संपूर्ण चालू आर्थिक वर्षांतील भारतीय वाहन व्यवसायावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. इंधनाचे चढे दर, वाढते वाहन कर्ज व्याजदर या साऱ्यांमुळेच यंदाच्या डिसेंबरमध्ये सलग तिसऱ्या महिन्यातील घसरण आणि चार महिन्यातील सर्वात मोठी घट नोंदविली आहे.
एकूणच २०१२-१३ हे आर्थिक वर्ष भारतीय कंपन्यांना वाहन विक्रीबाबत कमालीचे त्रस्त ठरेल या शक्यतेला सध्याचे वातावरण पुष्ठी देत आहे. सरकारकडून वस्तू व सेवा कराची (जीएसटी) अंमलबजावणी, उत्पादन शुल्कातील कपात यासारख्या उपाययोजनाच आता वाहन क्षेत्राला तारू शकतील, अशी आशा ‘सियाम’ या वाहन उत्पादकांच्या संघटनेनेही व्यक्त केली आहे.
२०१३ च्या सुरुवातीलाच वाहनांच्या किंमती ८ टक्क्यांपर्यंत वाढविण्यात आल्याने मार्चअखेपर्यंत वाहन विक्री आणखी खाल्यावण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. तसे झाल्यास गेल्या नऊ वर्षांतील ही सर्वात कमी विक्रीतील वाढीला दर असेल. संघटनेनेही याबाबतचा अंदाज या आधीच्या १० ते १२ टक्क्यांच्या सरासरीच्या तुलनेत जेमतेम एक टक्का इतका खाली खेचला आहे.