किरकोळ विक्री दालन क्षेत्रात थेट विदेशी गुंतवणूक मर्यादा वाढीच्या चर्चे दरम्यान विस्तार थोपवून ठेवणाऱ्या अमेरिकेच्या वॉलमार्ट कंपनीने पुन्हा एकदा भारतीय व्यवसाय विस्तारावर लक्ष केंद्रीत केले आहे. कंपनी आग्रा येथे आपले नवे दालन सुरू करण्याच्या निर्णयाप्रत आली आहे.
आग्रा येथे नवे दालन सुरू करण्याबाबत आम्हाला नुकतीच अंतर्गत परवानगी मिळाली असून शहरातील कंपनीचे दुसरे दालन लवकरच सुरू होईल, अशी माहिती कंपनीच्या प्रवक्तयाने वृत्तसंस्थेला दिली. कंपनी नव्या वर्षांत ऑनलाईन व्यासपीठाचाही विस्तार करणार आहे.
कंपनीने यापूर्वी २०१२ च्या अखेरिस भोपाळ येथे आपले शेवटचे दालन सुरू केले होते. यानंतर किरकोळ विक्री क्षेत्रात थेट विदेशी गुंतवणूक वाढविण्याबाबत जोरदार राजकीय चर्चा झाली. काँग्रेसप्रणीत संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारने याबाबत निश्चितच कोणताच निर्णय घेतला नाही. तर निर्विवाद बहुमतासह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपाप्रणीत लोकशाही आघाडी सरकारने या क्षेत्रातील गुंतवणूक मर्यादा न विस्तारण्याची भूमिका स्पष्ट केली. ऑक्टोबर २०१३ मध्ये भारती एन्टरप्राईजेससहची भागीदारी संपुष्टात आणत वॉलमार्टने स्वतंत्र्यरित्या व्यवसाय करण्याचा इरादाही जाहीर केला. ‘बेस्ट प्राईस’ नाममुद्रेंतर्गत वॉलमार्टची सध्या देशभरातील नऊ राज्यांमध्ये २० दालने आहेत. येत्या चार ते पाच वर्षांत ५० दालने सुरू करण्याचा मनोदय कंपनीने वर्षांच्या सुरुवातीला व्यक्त केला होता. लखनऊ, हैदराबाद, गुंटूर आणि विजयवाडा या चार शहरांमध्ये कंपनी तूर्त ई-कॉमर्सवर व्यवसाय करते.

बॉश आणि सिमेन्सची दालने दुप्पट होणार
विद्युत उपकरण निर्मिती क्षेत्रातील आघाडीच्या बॉश आणि सिमेन्सने येत्या वर्षभरात आपल्या भारतातील दालनांची संख्या दुप्पट करण्याचा मनोदय जारी केला आहे. यानुसार २०१५ पर्यंत कंपनीच्या दालनांची संख्या ६० होईल. पुढील पाच वर्षांत विद्युत उपकरण निर्मिती क्षेत्रातील भारताची आघाडीची कंपनी बनण्याचाही कंपनीने ठरविले आहे. कंपनीच्या उत्पादनांचे अस्तित्व सध्या १,२०० व्यासपीठांवर उपलब्ध आहे. ते ५० टक्क्य़ांनी वाढवून १,४०० करण्याचे सिमेन्स होम अप्लायन्सेसचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी गुंजन श्रीवास्तव यांनी सांगितले. देशभरात सध्या सिमेन्सची २० तर बॉशची १२ दालने आहेत. कंपनीने गेलल्या काही महिन्यांमध्ये ३५ टक्के वाढ राखली आहे. कंपनीचा चेन्नई येथील प्रकल्प यंदाच्या जुलैमध्येच सुरू झाला.