*  प्रश्न:  मी २००७ साली मुंबईत माटुंगा परिसरात २५० चौरस फुटांचे दुकान ७.५० लाख रुपयांना विकत घेतले होते. हे दुकान मी या वर्षी २५ लाख रुपयांना विकले आहे. त्यातून मिळालेल्या रक्कमेवर किती कर लागेल? तसेच या रकमेतून मी निवासी घर विकत घेऊन कर वाचवू शकतो का? तुम्ही मागील लेखात सांगितल्याप्रमाणे कलम ५४ ईसीमध्ये गूंतवणूक करावी म्हणजे नेमकी कोठे करावी? त्या रोख्याची मुदत किती असते व मुदतीनंतर त्यावर पुन्हा कर आकारला जातो का?

– सतीश सावंत, ईमेलद्वारे

Loksatta anvyarth Naxalites killed in Kanker district of Chhattisgad
अन्वयार्थ: आता दीर्घकालीन उपायच गरजेचा..
Retail inflation hit a five month low of 4.85 percent in March
किरकोळ महागाई दर ४.८५ टक्के; पाच महिन्यांच्या नीचांकी घसरण
Mukesh Ambani
जागतिक महाश्रीमंतांमध्ये मुकेश अंबानी नवव्या स्थानी; देशातील धनाढ्याच्या संपत्तीत वर्षभरात ४१ टक्क्यांची वाढ
A decrease in the supply of new houses was recorded in eight metros of the country print news
नवीन घरांच्या पुरवठ्यात घट, यंदा पहिल्या तिमाहीत ६९ हजारांवर; गेल्या वर्षीच्या तुलनेत १५ टक्के कमी

उत्तर : आपल्याला झालेला भांडवली नफा हा दीर्घ मुदतीचा असेल. त्यामुळे महागाई निर्देशांकांचा (इंडेक्सेशनचा) लाभ मिळेल. दीर्घ मुदतीचा नफा खालीलप्रमाणे :

दुकानाची विक्री किंमत    :      २५,००,००० रुपये

दुकानाची खरेदी किंमत :  ७,५०,००० रुपये

महागाई निर्देशांकानुसार खरेदी मूल्य :

२००७-०८ सालचा महागाई निर्देशांक ५५१

२०१६-१७ सालचा महागाई निर्देशांक ११२५

महागाई निर्देशकानुसार खरेदी मूल्य : ७,५०,००० गुणिले ११२५ भागिले ५५१   = १५,३१,३०७ रुपये

दीर्घ मुदतीचा भांडवली नफा = ९,६८,६९३ रु.

या दीर्घ मुदतीच्या भांडवली नफ्यावर २०.६% (शैक्षणिक कर धरून) दराने कर भरावा लागेल. परंतु आपल्याला मुद्रांक शुल्कासाठी बाजारभाव मूल्य किती आहे हेसुद्धा विचारात घ्यावे लागेल. या रकमेतून कलम ५४ एफनुसार घरामध्ये गुंतवणूक करता येईल. याशिवाय रुरल इलेक्ट्रिफिकेशन कॉर्पोरेशन लिमिटेड किंवा नॅशनल हायवे अथॉरिटी यांनी जारी केलेले भांडवली रोखे कलम ५४ ईसीनुसार गुंतवणुकीस पात्र आहेत. या रोख्यांमध्ये ५० लाख रुपये मर्यादेपर्यंत गुंतवणूक करता येते. ही गुंतवणूक तीन वर्षांसाठी आहे. रोख्यातील गुंतवणुकीच्या तारखेपासून तीन वर्षांच्या आत रोख रकमेत बदलून घेतल्यास (एन्कॅश केल्यास) ही गुंतवणूक त्या वर्षीचा भांडवली नफा म्हणून गणली जाईल आणि त्यावर कर भरावा लागतो. रोख्यांवर ६% दरसाल व्याज मिळते. हे व्याज करपात्र आहे. तीन वर्षांच्या मुदतपूर्तीनंतर रोख्यांतून झालेल्या लाभावर कर भरावा लागत नाही.

*  प्रश्न: मला वारसा हक्काने माझ्या वडिलांकडून एक भाडे तत्त्वावरील (टेनन्सी राइट) व्यावसायिक जागा ४५ वर्षांपूर्वी मिळाली. मी ही जागा विकू शकतो का? यावर होणाऱ्या भांडवली नफ्यावर कर भरावा लागेल का? कर वाचविण्यासाठी काही पर्याय उपलब्ध आहेत का?

– आनंद लेले, ईमेलद्वारे

उत्तर : भाडेपट्टीवर जागेच्या – टेनन्सी राइटच्या करपात्रतेच्या संदर्भात विविध न्यायालयांनी वेगवेगळे निर्णय दिले होते. काही न्यायालयांनी टेनन्सी राइट परत केल्यानंतर मिळालेले पैसे करपात्र आहेत असा निर्णय दिला होता. न्यायालयाने असा निर्णय दिला कारण, त्याचा संपादनखर्च शून्य आहे. १९९४ नंतर प्राप्तिकर कायद्यात सुधारणा करण्यात आली. त्यानुसार टेनन्सी राइटचा संपादनखर्च नसेल तर तो शून्य समजण्यात येईल. प्राप्तिकर कायद्यानुसार टेनन्सी राइट हीसुद्धा भांडवली संपत्ती आहे. त्यामुळे त्यावर होणारा नफादेखील अल्प किंवा दीर्घ मुदतीचा असू शकतो. जर हा टेनन्सी राइट तीन वर्षांपेक्षा जास्त काळानंतर सोडला तर त्यावर होणारा नफा हा दीर्घ मुदतीचा असतो. हा टेनन्सी राइट मिळविण्यासाठी खर्च केला नसल्यास संपादन खर्च हा शून्य समजला जातो. त्यामुळे महागाई निर्देशांकाचा फायदादेखील मिळत नाही. जे पैसे आपल्याला विक्रीतून मिळाले (विक्रीखर्च वजा जाता) ते संपूर्ण दीर्घ मुदतीचा नफा म्हणून गणले जातात. हा कर वाचविण्यासाठी कलम ५४ ईसीनुसार रोख्यांमध्ये (५० लाख रुपयांच्या मर्यादेपर्यंत) किंवा कलम ५४ एफ नुसार नवीन घरात गुंतवणूक करण्याचे पर्याय उपलब्ध आहेत.

*  प्रश्न: माझा मुलगा अनिवासी भारतीय आहे. त्याच्या नावाने एक मुंबईत आणि एक पुण्यामध्ये अशी दोन घरे आहेत. एका घरात आम्ही राहतो आणि एक घर रिकामे आहे. दोन घरांपैकी एका घराचे घरभाडे उत्पन्न तो विवरणपत्रात दाखवतो. त्याचे बँकेत एनआरओ आणि एनआरई खाते आहेत. याशिवाय त्याची १,५०,००० रुपयांची मुदत ठेव आहे. त्यावर १४,००० रुपये इतके व्याज मिळते आणि त्यावर उद्गम कर कापला जातो. या उत्पन्नाशिवाय त्याचे भारतात कोणतेही उत्पन्न नाही. त्याने त्याची मुदत ठेव मोडली तर त्यावर व्याज मिळणार नाही आणि त्यावर उद्गम कर कापला जाणार नाही. या परिस्थितीत त्याला विवरणपत्र भरावे लागेल का? तो त्याच्या आईच्या खात्यात घरखर्चासाठी परदेशातून काही पैसे पाठवतो. या पैशांवर त्याच्या आईला कर आणि विवरणपत्र भरावे लागेल का?

– एक वाचक, ईमेलद्वारे

उत्तर : एकूण उत्पन्न (कलम ८० च्या वजावटीपूर्वी) किमान करपात्र उत्पन्नाच्या मर्यादेपेक्षा कमी असेल तर विवरणपत्र दाखल करणे गरजेचे नाही. उद्गम कर कापला गेला असेल तर विवरणपत्र दाखल करावे लागते. एनआरई खात्यावर मिळणारे व्याज हे करमुक्त आहे. आपले एनआरओ बचत खाते असेल तर त्यावर मिळणाऱ्या व्याजावरसुद्धा उद्गम कर कापला जातो. याला किमान मर्यादादेखील नाही. यावर उद्गम कर कापला गेला असेल तर विवरणपत्र दाखल करावे लागेल. मुलाने आईला परदेशातून पाठवलेल्या पैशांवर आईला कर भरावा लागणार नाही.

*  प्रश्न: माझी पत्नी गृहिणी आहे. तिला प्राप्तिकर खात्याकडून आर्थिक वर्ष २०१२-१३ (कर निर्धारण वर्ष २०१३-१४) साठी सूचना आली आहे. यामध्ये तिला १,०३,६२८ रुपये व्याज मिळाले आहे आणि विवरणपत्र दाखल केले नाही हे नमूद करण्यात आले आहे आणि हे उत्पन्न ज्या मुदत ठेवींवर मिळाले आहे त्याचा स्रोत काय याबद्दल विचारणा करण्यात आली आहे. हे पैसे तिला तिच्या सासऱ्यांकडून त्यांच्या मृत्यूनंतर मिळाले आहेत. तिला आता आर्थिक वर्ष २०१२-१३ चे विवरणपत्र दाखल करता येईल का? या सूचनेला उत्तर कसे द्यावे?

– विनय भेंडे, ईमेलद्वारे

उत्तर : आपल्याला या पत्राचे उत्तर प्राप्तिकर अधिकाऱ्याला द्यावे लागेल. आपल्या पत्नीचे उत्पन्न १,०३,६२८ रुपये इतकेच असेल तर ते कमाल करमुक्त उत्पन्नाच्या मर्यादेपेक्षा कमी असल्यामुळे विवरणपत्र भरणे गरजेचे नाही हे पत्राद्वारे कळवावे. सासऱ्यांनी सुनेला मोबदल्याशिवाय दिलेल्या भेटींवर मिळालेले उत्पन्न हे सासऱ्यांच्या उत्पन्नात गणले जाते; परंतु त्यांच्या मृत्यूनंतर हे उत्पन्न सुनेचेच उत्पन्न म्हणून गणले जाते. त्यांनी विचारलेली माहिती प्राप्तिकर अधिकाऱ्याला पत्राद्वारे कळवावी आणि त्याची पोचपावती घ्यावी. आपल्याला कर भरावा लागणार नाही.

*  प्रश्न: माझे आर्थिक वर्ष २०१५-१६ सालचे चार लाख रुपये इतके व्याजाचे उत्पन्न आहे. शेअर बाजारात केलेल्या व्यवहारांवर पाच लाख रुपये इतका अल्पमुदतीचा भांडवली तोटा झाला आहे. हा तोटा मी व्याजाच्या उत्पन्नातून वजा करू शकतो का?

– आर. व्ही. केंद्रे, लातूर</strong>

उत्तर : अल्पमुदतीचा भांडवली तोटा हा फक्त भांडवली नफ्यातूनच वजा करता येतो इतर उत्पन्नातून नाही. व्याजाच्या उत्पन्नावर आपल्याला कर भरावा लागेल आणि अल्पमुदतीचा भांडवली नफा हा पुढील आठ वर्षांपर्यंत कॅरी फॉरवर्ड करता येईल. यासाठी विवरणपत्र वेळेत दाखल करणे गरजेचे आहे.

*  प्रश्न: आपल्या मागील लेखामध्ये आपण दीर्घ मुदतीच्या भांडवली नफ्यावर कर वाचवण्यासाठी राणे यांना एकूण विक्री किंमत नवीन घरात गुंतविण्यास सुचविले आहे तर अशोक यांना भांडवली नफ्याएवढी गुंतवणूक नवीन घरात करण्यास सुचविले आहे. मी १९८४ मध्ये दोन लाख रुपयांत बांधलेले घर ५५ लाख रुपयांत विकण्याच्या विचारात असून, नवीन घरात गुंतवणूक करू इच्छित नाही. त्यामुळे नेमकी कोणती रक्कम रोख्यात गुंतवावी लागत असते हे कळू शकले तर निर्णय घेण्यास मला मदत होईल.

– विनोद मुळे, अमरावती   

उत्तर : एक घर विकून झालेल्या दीर्घ मुदतीचा भांडवली नफा कलम ५४ नुसार दुसऱ्या घरात गुंतविला तर कर भरावा लागत नाही. या कलमानुसार फक्त भांडवली नफ्याएवढी रक्कम नवीन घरात गुंतवावी लागते. घराव्यतिरिक्त कोणतीही मालमत्ता (जमीन, सोने, शेअर्स, वगैरे) विक्री केल्यास झालेल्या दीर्घ मुदतीच्या भांडवली नफ्यावरील कर वाचवायचा असेल तर विक्री किमतीएवढी गुंतवणूक कलम ५४ एफनुसार नवीन घरात करावी लागते. आणि कलम ५४ ईसीनुसार रोख्यात भांडवली नफ्याएवढी गुंतवणूक केल्यास भांडवली नफ्यावर कर भरावा लागत नाही. या रोख्यात करावयाच्या गुंतवणुकीची मर्यादा ५० लाख रुपये इतकी आहे.

*  प्रश्न: मी करनिर्धारण वर्ष २००८-०९ करिता १,५८० रुपयांचा परतावा दाखवणारे विवरणपत्र भरले होते. नंतर मला २०१२ साली सीपीसी, बंगळुरूकडून संदेश आला की, प्राप्तिकर अधिकाऱ्यांनी २,६३,५७६ रुपयांची मागणी नोंदवली आहे. मी अधिकाऱ्यांना समक्ष भेटून सर्व कर भरला असल्याची कागदपत्रे दाखवली आणि मागणी अयोग्य आहे, असे सांगितले. आधिकाऱ्यांनी सर्व मूळ कागदपत्रे तपासली. त्यांच्या सांगण्याप्रमाणे मी लगेच पत्र लिहून संपूर्ण विवरणपत्राच्या प्रतीसह कार्यालयात जमा केले. त्यावर मला कोणतेही उत्तर आले नाही. आता संकेतस्थळावर ही मागणी कायम असल्याचे दिसते आहे. मी अनेक वेळा ‘मागणीशी सहमत नाही’ असा प्रतिसाद नोंदवला आहे. तसेच पत्रही पाठवले आहे. अद्याप प्राप्तिकर अधिकाऱ्यांनी काही दखल घेतलेली दिसत नाही. यापुढे मला काय करता येईल? तसेच काय खबरदारी घेता येईल? याबद्दल मार्गदर्शन करावे ही विनंती.

– म. द. फाटक, प्रभादेवी

उत्तर : प्राप्तिकर खात्याच्या संकेतस्थळावर जर कराची मागणी दिसत असेल तर ती मागणी कोणी केली आहे हे तपासावे. यासाठी आपल्या पॅनवर लॉग-इन करून RESPONSE TO OUTSTANDING TAX DEMAND या पर्यायावर जाऊन कोणत्या वर्षांची किती कर थकबाकी आहे ते पाहावे. यामध्ये ही कराची मागणी कोणी केली आहे ते दर्शविले असेल. ही मागणी सीपीसी, बंगळुरूकडून केली जाते किंवा आपल्या प्राप्तिकर अधिकाऱ्याकडून केली जाते. जर सीपीसी, बंगळुरूकडून केली असल्यास त्याला ऑनलाइन उत्तर देता येते. जर प्राप्तिकर अधिकाऱ्याने कराची मागणी अपलोड केली असेल तर प्राप्तिकर अधिकाऱ्याकडूनच आवश्यक ती कागदपत्रे सादर करून ती मागणी रद्द करता येते. आपली मागणी प्राप्तिकर अधिकाऱ्याने नोंदविली असल्यामुळे आपल्याला या अधिकाऱ्याकडे पाठपुरावा करूनच मागणी रद्द करून घेता येईल. यापुढील खबरदारीसंदर्भात आपल्याला फॉर्म २६ एएस हा वेळोवेळी तपासून बघितला पाहिजे. विवरणपत्र दाखल करण्यापूर्वी त्यात दाखविलेला उद्गम कर (टीडीएस) आणि भरलेला कर (अग्रिम कर आणि स्व:निर्धारण कर) हा फॉर्म २६ एएस प्रमाणे जुळतो का ते पाहावे. हा कर जुळल्यास नंतर कर मागणीचा प्रश्न येत नाही आणि कर परतावा (रिफंड) सुद्धा लवकर मिळतो.

*  प्रश्न: मी एक सेवानिवृत्त ज्येष्ठ नागरिक आहे. माझे पुण्यात चौथ्या मजल्यावर घर आहे. माझ्या वयानुसार मला या घरात, पायऱ्या चढण्याच्या त्रासामुळे, राहता येत नाही आणि हे घर रिकामेच आहे. मी दुसऱ्या भाडय़ाच्या घरात राहतो. या घरासाठी मी २०,००० रुपये भाडे भरतो. मला या भाडय़ाची वजावट माझ्या इतर उत्पन्नातून घेता येईल का?

 – एक वाचक, ईमेलद्वारे

उत्तर :  कलम ८० जीजीनुसार ज्यांना घरभाडे भत्ता (एचआरए) मिळत नाही आणि ते भाडय़ाच्या घरात राहतात. अशांसाठी भरलेल्या भाडय़ाच्या वजावटीची तरतूद आहे. परंतु या कलमानुसार एक अट अशी आहे की, आपले त्या भागात स्वत:चे घर नसावे. आपले पुण्यात स्वत:चे घर आहे त्यामुळे आपल्याला या कलमानुसार घरभाडय़ाची वजावट मिळू शकणार नाही.

* लेखक मुंबईस्थित सनदी लेखाकार असून, वाचक त्यांना pravin3966@rediffmail.com या ई-मेलवर आपले प्रश्न पाठवू शकतील.