पंधरवडय़ापूर्वीचा २६,५०० च्याही खालचा स्तर आणि आता २८ हजारानजीकचा टप्पा.. ‘सेन्सेक्स’ची ही अकस्मात तेजीची उसळी सुरू असतानाच विविध दलाल पेढय़ांनी डिसेंबर २०१५ अखेपर्यंतचे या निर्देशांकाच्या उच्चांकाचे अंदाज खुंटविले आहेत.. अर्थव्यस्थेच्या सुधारणेच्या लाटेवर ३३,००० ची अपेक्षा करणाऱ्या निर्देशांकाला जेमतेम ३१,०००ची मजल गाठता येईल, असे हे ताजे अंदाज आहेत. या पाश्र्वभूमीवर रिलायन्स कॅपिटल अॅसेट मॅनेजमेंटचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी हिमांशू व्यापक यांच्याशी झालेल्या बातचीतीत त्यांनी नजीकच्या काळात भांडवली बाजारात मोठय़ा घसरणीची शक्यता वर्तविली आहे. * भांडवली बाजार तेजीसह रुळावर येऊ पाहत असतानाच, निर्देशांकाच्या उच्चांकाबाबत अंदाजाचे सुधारीत आकडे समोर आले आहेत. बाजारात लवकरच मोठे ‘करेक्शन’ येणार या तज्ज्ञांच्या तर्क-वितर्कावर तुमची प्रतिक्रिया काय? - आंतरराष्ट्रीय तसेच देशांतर्गत घडामोडींमुळे बाजारातील गुंतवणूकदारांवर चिंतेचे सावट गेल्या कालावधीत पहायला मिळाले. स्थानिक पातळीवर मग ती कर अनिश्चितता असो की जागतिक स्तरावर व्याजाचे दर, इंधनाच्या किंमती याबाबतची असो. गेल्या आठवडय़ातील सेन्सेक्स तसेच निफ्टीचा तेजीचा प्रवास पाहिला तरी बाजारात मोठी घसरण आता येणार नाही, असे ठामपणे म्हणताच येणार नाही. मुंबई शेअर बाजाराचेच घ्यायचे झाल्यास प्रमुख निर्देशांक त्याच्या तळापासून ३० टक्क्यांपर्यंत वर पोहोचला आहे. तेव्हा बाजारात तुम्ही म्हणता त्याप्रमाणे १० ते १५ टक्के ‘करेक्शन’ येण्याची शक्यता आहे. बाजारातील ही स्थिती येत्या काही महिन्यातच उद्भवू शकते.. * डॉइशे, स्टॅण्डर्ड चार्टर्ड, यूबीएस, एचएसबीसी अशा सर्वच जागतिक संस्थांनी त्यांचे ‘सेन्सेक्स’चे यापूर्वीचे अंदाज नेमके आताच खालावण्याची निश्चित कारण काय असावेत? खरेच की मुंबई निर्देशांक डिसेंबर २०१५ अखेपर्यंत ३१,००० चा टप्पा गाठू शकणार नाही? - संबंधित संस्थांचा अंदाज-आडाखे हे त्यांच्या अभ्यासावर आधारलेले असतात. तो कमी करण्यासारखी परिस्थिती त्यांनी लक्षात घेतली हे खरे. मात्र वर्षअखेपर्यंत बाजाराचा कल सध्याच्या टप्प्यापेक्षा अधिक राहिल, एवढे निश्चित. बाजारावर मुख्य परिणाम साधणाऱ्या विदेशी गुंतवणूकदारांसारखा घटक सध्या आश्वस्त होताना दिसत आहे. अमेरिकेच्या फेडरल रिझव्र्हकडूनही स्थिर व्याजदराचे संकेत मिळाल्याने त्यांचा उत्साह कायम राहण्याची शक्यता आहे. * अशा स्थितीत कोणत्या क्षेत्रावर तुम्ही भर द्याल? - रुळावर येत असलेली अर्थव्यवस्था पाहता ग्राहकांकडून वस्तूला असलेली मागणी पूर्ण करू शकणारे बहुपयोगी वस्तू निर्मित क्षेत्र तसेच सरकारकडून खर्च होत असलेल्या पायाभूत व त्याच्याशी निगडित क्षेत्रामध्ये गुंतवणुकीला वाव आहे, असे मला वाटते. त्याचबरोबर व्याजदराशी निगडित समभागांमध्ये रस घ्यायला हरकत नाही. मान्सून पुरेसा झाल्यास आणि दर कमी झाल्यास त्याचा अप्रत्यक्ष लाभ हा संबंधित समभागांपर्यंत पोहोचेलच. * विकास दर, तूट, महागाई हे आकडे अर्थव्यवस्थेचा आलेख मांडतात. चालू तिमाहीचे आर्थिक ताळेबंद त्याबाबतची भूमिका अधिक स्पष्ट करतीलच. पण खरोखरच अर्थव्यवस्था रुळावर आली आहे, असे तुम्हाला वाटते काय? - पायाभूत सेवा क्षेत्रात गेल्या काही दिवसांमध्ये चैतन्य निर्माण झाले आहे. महागाईचा दरही कमी होत आहे आणि औद्योगिक उत्पादनही उंचावत आहे. सरकारसाठी चिंतेच्या बाबी समजले जाणाऱ्या चालू व वित्तीय तुटीचे प्रमाणही तुलनेत सावरत आहे. ज्याप्रमाणे भीती व्यक्त केली गेली तसा मान्सून राहणार नाही, अशी चिन्हे सध्या तरी दिसत आहेत. तेव्हा रिझव्र्ह बँकेमार्फत पुन्हा एकदा त्याच प्रमाणात व्याजदर कपात केली जाऊ शकते. आणि मग मागणी वाढून उद्योग क्षेत्रातही हालचाल नोंदली जाईल. गेल्या आर्थिक वर्षांतील शेवटचे तिमाही वित्तीय निष्कर्ष अपेक्षेपेक्षा अधिक निराशेचे राहिले आहेत. माझ्या मते, चालू आर्थिक वर्षांतील पहिल्या तिमाहीतही फारसे काही हाती लागण्याची शक्यता नाही. मात्र कंपन्यांच्या ताळेबंदात पुढील दुसऱ्या व तिसऱ्या तिमाहीत वाढीव नफ्याचे आकडे पहायला मिळतील. * तुम्ही म्युच्युअल फंड क्षेत्राचे नेतृत्व करता. अनेक अस्वस्थतेनंतर हा व्यवसाय आता स्थिर झाला आहे, असे वाटते काय? - मला वाटते, गेल्या वर्षभरापूर्वीची फंड क्षेत्रातील अस्थिरता आता संपुष्टात आली आहे. आकडय़ात सांगायचे झाल्यास चालू आर्थिक वर्षांच्या पहिल्या तिमाहीत फंड उद्योगाची कामगिरी ५ टक्क्यांनी उंचावण्याची शक्यता आहे. आधीच्या वर्षांच्या तुलनेत गेल्या आर्थिक वर्षांत या उद्योगाची ३० टक्क्यांपर्यंतची वाढ नोंदली गेली आहे. फंडांमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांमध्येही आता अधिक समजुतदारपणा आला आहे. फंड व्यवसायाच्या प्रसाराबरोबरच या क्षेत्रात आलेल्या नव्या नियमांचाही हा परिणाम आहे. अर्थातच त्यासाठीचे नियामकाचे धोरण हे या व्यवसायात अधिक पारदर्शकता आणावयाचेच होते. * फंडांमार्फत होणाऱ्या बाजारातील अप्रत्यक्ष गुंतवणुकीबाबत तुम्ही गुंतवणूकदारांना काय सल्ला द्याल? - ऐंशीच्या दशकात १०० ने सुरू झाला असे मानले तरी मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक आजच्या घडीला त्या तुलनेत तब्बल २७० पट वर आहे. जोखीम विरहित गुंतवणूक प्रत्येकाला हवी असते. त्यासाठी स्थिर पर्याय निवडला जातो. मात्र सध्याच्या महागाईच्या कालावधीत दिर्घ कालावधीसाठी १५ ते १७ टक्क्यांपर्यंतचा परतावा भांडवली बाजारातून थेट अथवा निगडित गुंतवणुकीतून मिळत असेल तर जोखीम घेण्यास काय हरकत आहे? एकच उदाहरण देतो - तुम्हाला मुंबईहून दिल्लीला ट्रेनने जायचेय. पण सूरतला गाडी बिघडली म्हणून तुम्ही लगेचच थेट पायी चालायला लागता का? गुंतवणुकीचेही तेच आहे. दीर्घकालीन उद्दिष्ट असेल तर कमी परतावा मिळतोय अथवा नुकसान होत आहे म्हणून त्यापासून दूर जाण्यात काहीच अर्थ नाही. आपल्याला किती आणि नेमका कधी आर्थिक आधार हवाय, हे ओळखता यायला हवे व त्या दिशेने वाटचाल करायला हवी.