आसमंतात तेरडा फुलायला लागला की समजावं, गौरी-गणपतीचे दिवस जवळ आले. या आसमंतात तेरडय़ासारखं नाजूक फूल आहे, पालीसारखा शांत, निरुपद्रवी प्राणी आहे आणि जळवेसारखा माणसाला उपयोगी पडणारा कीटकही आहे.

मागच्या गप्पांमध्ये मी सह्य़ाद्रीत हरवलेल्या गिर्यारोहकांबद्दल लिहिलं होतं. या हरवण्याच्या जोडीला, सह्य़ाद्रीच्या जंगलात पावसाळ्यात जळवांच्या त्रासालाही या गिर्यारोहकांना सामोर जावं लागलं होतं. या मित्रांनी लिहिलंय की त्यांचं अंग जळवांनी भरलं होतं. जळू हा शब्द ऐकला की ‘जळवेसारखं चिकटून बसणं’ हा वाक्प्रचार हमखास आठवतो. जळू मानवी रक्त पिते म्हणून शरीरातील दूषित रक्त काढून टाकण्यासाठी तिचा वापर शतकानुशतकं सुरू आहे. रक्ताची गळवं, साकळलेलं रक्त शरीरातून बाहेर काढायची सोप्पी पद्धत म्हणजे त्या भागावर जळू लावणं. ही पारंपरिक उपचार पद्धती आपल्याला  माहीत असते. मात्र ‘फालिम अन्नेलिडा’ कुळातल्या या जंतासारख्या प्राण्याबद्दल आपल्याला फारशी शास्त्रीय माहिती नसते. आयुर्वेदिक उपचारांसाठी जळवा पाळणाऱ्या लोकांना, गिर्यारोहकांना आणि जंगलाजवळ राहणाऱ्या लोकांना जळू नीट माहीत असते. साधारण एक इंचापासून बारा इंचांपर्यात वाढणाऱ्या जळूला ‘लीच’ म्हणूनही ओळखलं जातं.  बहुतेक सर्व प्रकारच्या जळवा ओलसर भागात, तसंच साचलेल्या किंवा वाहत्या पाण्याच्या जवळ राहतात. आपल्याकडच्या रानात सापडणाऱ्या जळवांच्या काही जाती जिथे पालपाचोळा पडलेला असतो अशा ठिकाणी नांदतात तर काही जळवा चक्क समुद्रातही राहतात. जंगलात कशाही, कुठेही चिकटणाऱ्या रानजळवा एक ते तीन सेंमीपर्यंत वाढतात तर ‘गायजळू’ (हिरुडिनिया ग्रानुलोसा) चक्क पंधरा इंचांपर्यंत वाढते. मात्र सगळ्या जळवा रक्त पिणाऱ्या नसतात. काही जळवा रक्त पितात तर काही जळवा कृमी-कीटकांना खातात. या जळवांच्या बाबतीत मनात येणारा सरसकट विचार म्हणजे एकजात सगळ्या जळवा माणसांचंच रक्त पिणाऱ्या असतात का? तर काही जातीच्या जळवा पाण्यातल्या माशांचं, काही जळवा बेडकांचं तर काही कासवांचं रक्त पितात. काही जळवा गरम रक्ताच्या प्राण्यांचं म्हणजेच गुरं आणि माणसांचं रक्त पितात. जळवा चिकटतात आणि कळायच्या आत रक्त कशा पितात हा प्रश्न पडला असेल ना तुम्हाला? गोलसर, लांबुळकं, मऊ वाटत असलं तरी जळूचं शरीर बऱ्यापकी घट्टमुट्ट असतं. यांच्या तोंड आणि शेपटीच्या टोकांना चप्पट धरे (सकर्स) असतात. ज्याचा दुहेरी उपयोग जळू करते. पहिला उपयोग म्हणजे चालण्यासाठी शेपटीचा धरा जमिनीवर टेकवून तोंडाच्या बाजूचा भाग ताणून पुढे टेकवून मागचा धरा सोडायचा अशी क्रिया जळू करते. आपला अंगठा टेकवून वीतभर अंतर मोजताना आपण कसं करतो ना, तसच करत जळू चालते. या धऱ्यांचा दुसरा उपयोग रक्त पिण्यासाठी होतो. तोंडाच्या धऱ्याला चक्क तीनधारी जबडा असतो. शेपटीच्या धऱ्याने ज्याचं रक्त प्यायचंय त्याला धरून ठेवल्यावर जळू तोंडाच्या धऱ्यातल्या तीन धारदार पात्यांनी कातडी सप्पकन कापते. कापल्यावर तिच्या घशातल्या स्नायूंचं काम सुरू होतं नि पंपातून ओढलं जावं तसं रक्त फटाफट ओढलं जातं. त्यांच्या घशात ज्या एकपेशी ग्रंथी असतात त्यातून हिरुडिन नावाचा द्राव बाहेर येतो. या हिरुडिनमुळे आपलं रक्त गोठत नाही नि या बाई भरपूर वेळ रक्त पितात. पोटभर रक्त पिऊन झाल्यावर ही जळू आपोआप गळून पडते. अध्येमध्ये तिला ओढायचा प्रयत्न केला तर ती तुटते. जळवेच्या तोंडातल्या हिरुडिनचा प्रभाव खूप वेळ राहत असल्याने जखमेतून रक्त वाहत राहतं. आश्चर्य म्हणजे पोट टम्म् भरल्यावर महिनोन्महिने उपाशी राहूनही जळू जिवंत राहू शकते. गांडुळासारख्याच उभयिलंगी असणाऱ्या जळूची पिल्लं शरीराचा कोष टाकून जन्माला येतात. साधारणत: काळपट राखाडी रंगाच्या या जळवांचा पश्चिम घाटातल्या जंगलात, भर पावसाळ्यात अगदी बजबजाट झालेला असतो. गरम रक्ताचा वास आला की कुठूनही म्हणजे चक्क झाडांवरूनही या अंगावर धप्पाधप उडय़ा मारतात. त्या अंगाला लागू नये म्हणून खोबरेल तेलात तंबाखूची पेस्ट मिसळून शरीराच्या उघडय़ा भागांवर लावली तर थोडासा उपयोग होतो. नुकतीच मिळालेली अनुभवसिद्ध महिती म्हणजे, डेटॉलचा स्प्रे केल्यासही जळू लगेच गळून पडते. जंगलात या रक्तपिपासू सोबत्यांपासून वाचणं ‘बाए हात का खेल’ नाही हेच खरं.

bhau rangari ganpati temple fire marathi news
भाऊ रंगारी गणपती मंदिराजवळील जुन्या लाकडी वाड्याला आग
ram navami 2024 date tithi and shubh muhurat know significance of the birth anniversary of lord shri ram
Ram Navami 2024 : रामनवमीच्या दिवशी पूजेसाठी २तास ३३ मिनिटांचा शुभ मुहूर्त; जाणून घ्या तिथी, मुहूर्त वेळ व पूजा विधी
Chaitra Navratri 2024 From Gudhi Padwa Lakshmi Blessing These Four Zodiac Signs
चैत्र नवरात्रीपासून ‘या’ ४ राशींच्या कुंडलीत राहील माता लक्ष्मी; १ वर्ष चहूबाजूंनी कमावतील धन, आरोग्यही सुधारणार
14 injured in mahakal temple fire in mp
महाकाल मंदिरातील आगीत १४ जखमी

-०-०-०-

काल पोळा झाला. सृष्टीच्या पुनíनर्मितीच्या, कोडकौतुकाच्या मनभावन श्रावणाने आज भाद्रपदाला खो दिला आणि निसर्गाने हळूच कूस पालटल्याचं लक्षात आलं. भाद्रपद आला म्हणजे गौरी-गणपतीच्या आगमनासाठी घरदार सिद्ध होणार हे ओघाने आलंच. विघ्नहर्त्यां श्रींच्या आगमनासाठी साफसफाई मोहिमा राबवताना बाप्पांचं वाहन म्हणून मूषकराजांना अभय द्यायचं आणि अशुभ, विषारी म्हणत घरातल्या शांत, उपयोगी जिवांना हाकलायचं काम आपण अगदी चोख पार पाडत असतो. आज आपल्या गप्पांमध्ये असाच एक शांत आणि निरुपद्रवी जीव डोकावून जाणार आहे, जो कायम भीती अणि तिरस्काराचा धनी आहे.

मराठी भाषेत अनेक वाक्प्रचार, म्हणींमध्ये निसर्गातल्या विविध घटकांना सहज गुंफलेलं असतं. एखादी अवेळी घडलेली घटना शुभ असो की अशुभ, तिच्याशी संबंध नसला तरीही विनाकारण एखाद्या निरुपद्रवी जिवाला त्यात गोवण्यात येतं. मनात चुकचुकणारी शंकेची पाल हा त्यातलाच प्रकार! विषारी, अशुभ, अभद्र अशा विशेषणांनी बदनाम झालेला हा गरीब जीव सापासारखाच आपल्या अज्ञानाचा बळी आहे. आपल्या घरात सापडणारी पाल ही आपल्या देशात सापडणाऱ्या पालीच्या अनेक जातींपकी एक आहे. ‘हेमिडायक्टालस फ्रेनाटस’ अशा विचित्र नावाने ओळखली जाणारी पाल ‘गेकोनिडी’ कुटुंबाची सदस्य आहे. पाल गरळ ओकते, विषारी असते, तिच्यामुळे माणसांचा मृत्यू होतो अशा पालीबाबत अनेक अफवा असतात. विज्ञानाने कितीही प्रगती केली तरी एका निरुपद्रवी जिवाला अजूनही विषारी म्हणण्यात आपण धन्यता मानतो आहोत. आपल्या घरांमध्ये दिवसा क्वचितच दिसणारी पाल निशाचर सदरात मोडते. अडगळीच्या जागा, खबदाडीसारखी ‘सुरक्षित’ ठिकाणं सोडून दिवसा क्वचितच बाहेर पडणारी पाल घराच्या कोपऱ्यांतून आपल्याकडे रोखून पाहते असा एक गरसमज असतो. पालीच्या डोळ्यांना पापणी नसते व डोळ्यांवर असलेल्या पारदर्शक पडद्यामुळे ती सतत रोखून बघते असं भित्र्या मानवी मनाला वाटणं साहजिकच आहे.

घरांच्या सपाट गुळगुळीत भिंतींवरून पाल आरामात कशी धावू शकते, या प्रश्नाचं उत्तर तिच्या तळपायांच्या गादीत दडलंय. पालीच्या तळपायांना असलेल्या मऊ मऊ गिरद्यांजवळ लहान लहान खाचा असतात. पाल धावते तेव्हा या खाचा एखाद्या सक्शन कपसारखं काम करतात. याच जोडीला तिची बारीक नखं खडबडीत पृष्ठभाग पकडून ठेवण्याचं काम करतात. या सगळ्याचा परिपाक म्हणजे, पाल अगदी छतावरसुद्धा आरामात उलटी फिरू शकते.तेही खाली न पडता. वर उल्लेखल्याप्रमाणे, निशाचर पालीचा दिवस संध्याकाळी सुरू होतो.  दिव्यांजवळ जमणारे किडेमकोडे हे तिचं आवडतं खाद्य. तिच्या वैशिष्टय़पूर्ण डोळ्यांमुळे ती दिव्यांच्या प्रखर प्रकाशाकडे सहजपणे पाहू शकते. तिच्या डोळ्यांच्या उभ्या बाहुल्या हे त्यामागचं गुपित आहे. आपल्यापकी बहुतांश लोकांचं ठाम मत असतं की पाल अतिशय लिबलिबीत आणि किळसवाणी असते. वस्तुत: पाल अतिशय स्वच्छ आणि मऊ स्पर्शाची असते. वास्तविक ती घरातले किडेमकोडे खाऊन आपल्यावर अनंत उपकारच करत असते नि आपण तिला विषारी समजत असतो. किडय़ांचा कर्दनकाळ असणाऱ्या या शांत जिवाला शत्रू तसे कमीच असतात. अगदी मोजक्याच असलेल्या शत्रूंपासून वाचण्यासाठी पाल दोन प्रकारची तंत्रं अमलात आणते. यापकी पहिलं म्हणजे, स्वत:ची शेपूट तोडून टाकते नि पळ काढते. ही तोडून टाकलेली शेपूट वळवळत राहते नि शत्रू त्या वळवळणाऱ्या शेपटीकडे पाहात असताना, पाल पसार होते. बहुतांश जणांना माहीतच नसतं की या शेपटीत मणका, शिरा आणि स्नायू यांची शरीरापासून वेगळं होण्याची निसर्गत: सोय असते. पाल स्वत:चं शेपूट तोडून टाकण्यापूर्वी शेपटीची मुख्य रक्तवाहिनीच आकुंचित करून घेते ज्यायोगे तिला शेपूट तोडून टाकणं सोप्पं होतं. आपल्याला जशी नखं येत राहातात तशीच पालीने तोडून टाकलेली शेपटी पुन्हा पुन्हा येत राहते. फरक एवढाच असतो की नवीन येणाऱ्या शेपटीचा रंग शरीरापेक्षा थोडासा वेगळा असतो. या शेपूट पुराणातली अतिशय मजेशीर गोष्ट म्हणजे जेव्हा पालीला काहीच खायला मिळत नाही, तेव्हा ती बरेचदा स्वत:ची शेपटी खाते, कारण ही शेपटी कॅल्शियमयुक्त असते. स्वसंरक्षणाचा दुसरा प्रकार म्हणजे, पळून जाण्यासाठी जागा नाही हे जाणवल्यावर पाल जबडा आ वासून आतला लाल गुलाबी भाग दाखवत समोरच्याला घाबरवायचा प्रयत्न करते. पालीच्या विषाची अन्नातून बाधा होते हा गरसमज आपल्याकडे पिढय़ान्पिढय़ा आहे. मुळात ज्या प्राण्याकडे विषच नाही, त्या प्राण्यापासून विषबाधा कशी होऊ शकते हा अभ्यासाचा विषय आहे खरा. पालीची विष्ठा अन्नात पडून होण्याऱ्या जंतुसंसर्गाने लोक आजारी पडतात नि नाव पालीचं बदनाम होतं. घरात दिसणाऱ्या पालींबद्दल अजून एक मोठा गरसमज म्हणजे पालीचं चुकचुकणं अशुभ असतं. मुळात पाल चुकचुकते म्हणजे काय हेच आपल्याला माहीत नसल्याने आपण त्याला अशुभ म्हणतो. हे खरं तर चुकीचं आहे. पाल चुकचुकते म्हणजे काय तर दोन पाली या चुकचुकण्याद्वारे एकमेकींशी संभाषण करत असतात. ते आपल्याला समजत नाही, पण म्हणून ते अशुभ समजणं मुळात अयोग्य आहे. वास्तवात पाल अतिशय घाबरट असते. तिच्या आसपास कुठेही काठी आपटली तरी ती पळून जाते. म्हणून सर्वाना विनंती, कृपया पालीला मारू नकाच; पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे, तिच्याबद्दल चांगलं बोलता येत नसेल तर निदान वाईट तरी बोलू नका.

-०-०-०-

तिकडे शहराबाहेर, जंगल रेषेवर असलेल्या सह्य़पठारावर जाता श्रावण आणि येता भाद्रपद अनेक रानफुलांना फुलवत असतो. गणपतीपाठोपाठ येणाऱ्या गौराईंसाठी आणलं जाणारं पावसाळी फुलझुडुप म्हणजे तेरडा! तोच तो, ‘तेरडय़ाचे रंग तीन दिवस’मधला. ‘गार्डन बालसम’ असं मजेशीर नाव धारण केलेला तेरडा परका नाही, ते पक्कं देशी रानफूल आहे. मधमाशा, कीटक आणि लहान पक्ष्यांमार्फत प्रसार होणारं हे झुडुप माहीत नसलेली व्यक्ती विरळाच. पूजेसाठी वापरला जाणारा तेरडा आयुर्वेदिक उपचारांमध्येही वापरला जातो. ग्रामीण भागातील लोक अजूनही तेरडय़ाचा रस कापणे, भाजणे या प्रकारांवर वापरतात. लहान मुलांचं पोट साफ होण्यासाठीही तेरडय़ाचा उपयोग केला जातो. पश्चिम घाटातल्या अनेक दुर्गम भागांमध्ये, प्रचंड पावसात काहीच उपलब्ध नसेल तर तेरडय़ाच्या झुडपाचे देठ उकडून खाल्ले जातात. नुसत्या गुलाबीच नाही तर विविध रंगांमध्ये रानावनात, शेताच्या बांधावरही उगवणारा हा तेरडा फुलला म्हणजे माहेरी जायची वेळ आली असं आदिवासी महिला म्हणतात. म्हणूनच जणू हा तेरडा गौराई बनून माहेरी येत असावा, दोन दिवस राहून तिसऱ्या दिवशी परत जात असावा.  तेरडय़ाच्या जोडीला, पत्रीच्या गठ्ठय़ात, लाल पिवळं भडक रंगाचं एक फूल नजर खेचून घेत असतं. कळलावी ऊर्फ ग्लोरी लीली फूल गौराईच्या वेळी हमखास घरी आणलं जातं. लीली कुटुंबातलं हे देखणं फूल ‘ग्लोरिओसा सुपर्बा’ ह्य वनस्पतीशास्त्रीय नावाने ओळखलं जातं. सरत्या पावसाळ्याचं लक्षण समजलं जाणारं हे पाच पाकळ्यांचं, आकर्षक रंगसंगतीचं कळलावी ऊर्फ वाघनखी फूल पूर्वी विषारी समजलं जायचं. मात्र, अलीकडे झालेल्या संशोधनातून याचे औषधी उपयोग लक्षात यायला लागले आहेत. दाह, सूजसारख्या कित्येक त्रासांवर या कळलावीचा वापर केला जातोच, पण शोभेच्या पुष्पगुच्छांमधेही हे फूल दिसायला लागलंय. दोन ते तीन दिवस टवटवीत रहाणारी फुलं मिरवणारं हे पसरट वेलीवजा झुडुप कुंपणांवर आणि बांधांवर सहज उगवतं. कुठेही उगवतं म्हणूनच त्याचं सहज निभावतं. विशेष सांगायचं म्हणजे, आपल्या सपठारावर उगवणारं हे फूल तामिळनाडूचं राज्यीय आणि झिम्बाब्वे या देशाचं राष्ट्रीय फूल आहे हे आपल्यापकी बहुतेकांना माहीतच नाही.

तेरडा काय, कळलावी काय, बदलत्या ऋतूची अनेक उद्गारचिन्हं आसमंत परिसरात व्यक्त करत असतो. पोटभर गढूळ पाण्याचा ताजा बोर्नव्हिटा पिऊन सुखावलेली जमीन, सुस्तावलेली जंगलं आणि अनलिमिटेड पसरलेली हिरवाई अनुभवण्यासाठी बाहेर पडण्याची हीच वेळ आहे. तेरडय़ांनी फुललेली पठारं, पाणी भरलेली भातखाचरं, युनायटेड कलर्स ऑफ ग्रीन पाहायला, खेकडय़ा-कुरल्यांकडून अंगठे चावून घ्यायला, ओलेत्याने मलोन्मैल तंगडतोड करायला बाहेर पडण्याची हीच योग्य वेळ आहे. गोडाधोडाचं जेवून, भरल्यापोटी ‘गणपतीबाप्पा मोरया’ म्हणू या आणि आसमंतात भटकायला निघू या. सर्वाना गौरी गणपतीच्या उत्सवी शुभेच्छा.
रुपाली पारखे देशिंगकर – response.lokprabha@expressindia.com