भगतसिंगांचा क्रांतिकारक दहशतवादीअसा उल्लेख करणारे पुस्तक बिपिन चंद्र  व अन्य अभ्यासकांनी  लिहिले आहे व ते सारेच अभ्यासक जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या मुशीतील आहेत, म्हणून अलीकडेच वाद निर्माण केला गेला. दहशतवादीहा भगतसिंग आदींनी स्वतसाठी वापरलेला शब्द आता निराळय़ा संदर्भात वापरला जातो, म्हणून तो गाळण्याची मागणी बिपिन चंद्र यांनीच २००७ मध्ये केली होती..

भगतसिंगांचा ‘क्रांतिकारक दहशतवादी’ असा उल्लेख एका पुस्तकात असल्याच्या प्रकरणी जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील आम्हा लेखक व प्राध्यापकांना देशद्रोही या नावाखाली जरा जास्तच वाईट पद्धतीने दोषारोप सहन करावे लागत आहेत असे मला वाटते. अलीकडच्या काळात जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील विद्यार्थ्यांवरही देशद्रोहाचे आरोप झाले. शारीरिक हमरीतुमरीवर येणे, धमक्या देणे असेही प्रकार घडले. मुस्कटदाबी करणाऱ्या शिक्षाही दिल्या गेल्या. निवृत्त व विद्यमान प्राध्यापकांना सार्वजनिक पातळीवर मते मांडण्यापासून रोखण्यात आले. भगतसिंग यांच्या संदर्भात क्रांतिकारी दहशतवादी असा उल्लेख असलेले पुस्तक नष्ट करण्याचा व त्याची विक्री बंद करण्याचा प्रयत्न चालू आहे. प्रश्न केवळ या पुस्तकापुरता मर्यादित आहे असेही नाही, तर जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या प्राध्यापकांनी लिहिलेली इतर पुस्तकेही नष्ट करण्याचा किंवा त्यावर बंदी घालण्याचा प्रयत्न सुरू आहे. गेली कित्येक दशके ही पुस्तके वापरात होती व आता अचानक त्यांच्यावर बंदी घातली जात आहे. माझ्या मते पुस्तकांची विक्री बंद करणे किंवा त्यावर बंदी घालणे हे अयोग्य आहे.

पुस्तकांवर कुठल्या कारणासाठी टीका केली जाते आहे यापेक्षा त्याविरोधात जी हत्यारे उपसण्यात आलेली आहेत ती आश्चर्यकारक आहेत. बिपिन चंद्र, आदित्य मुखर्जी, के. एन. पण्णीकर, सुचेता महाजन व मी (आजी व माजी जेएनयू प्राध्यापक) यांनी भगतसिंगांविषयी लिहिलेल्या पुस्तकाच्या रूपाने आता नवा वाद सुरू करण्यात आला आहे. या पुस्तकात शहीद भगतसिंग यांच्याबाबत दहशतवादी या शब्दाचा उल्लेख केला असून त्यामुळे देशातील एका महान क्रांतिकारकाची ही सहेतुक मानखंडना आहे, असा आरोप या पुस्तकाच्या आधारे आमच्यावर करण्यात आला आहे. यात वस्तुस्थिती अशी की, बिपिन चंद्र यांनी या पुस्तकाची दोन प्रकरणे लिहिली तेव्हा त्यांनी भगतसिंगांविषयी आदर बाळगूनच ती लिहिली यात शंका नाही. भगतसिंगांच्या जीवनकार्याचा गांभीर्याने अभ्यास करणाऱ्यांना ही गोष्ट हे पुस्तक वाचताना जाणवल्याशिवाय राहिली नाही. या पुस्तकातील तपशिलासाठी आम्ही बरेच परिश्रम घेतले. बिपिन चंद्र यांनी तर १९७० मध्ये भगतसिंग यांचे ‘मी नास्तिक का आहे’ हा दुर्मीळ व गाजलेला लेख पत्रकाच्या रूपात पदरमोड करून प्रसिद्ध केला आणि तो विद्यार्थी व सहकाऱ्यांना कानाकोपऱ्यावर उभे राहून वितरित केला होता. त्या वेळी मी दिल्लीत पदव्युत्तर वर्गाची विद्याíथनी होते. बिपिन चंद्र यांच्या कुणाही विद्यार्थ्यांला विचारा, तो हेच सांगेल की, त्यांच्यासाठी भगतसिंग हे आदर्श नायक आहेत. विद्यार्थ्यांना भगतसिंगांच्या गोष्टी सांगण्यात ते रमत असत. भगतसिंग यांना अवघे २३ वर्षांचे आयुष्य मिळाले. ते बुद्धिमान होते, त्यांचे वाचन अफाट होते, ते चक्क खिशातून पुस्तके काढून त्यांच्या सहकाऱ्यांच्या हाती ठेवत. लोक जे काही दशकात करून दाखवू शकत नाहीत ते भगतसिंगांनी मोजक्या वर्षांत करून दाखवले, असे बिपिन चंद्र सांगतात.

भगतसिंग व त्यांचे सहकारी क्रांतिकारक हे केवळ फासावर गेलेले शूरवीरच नव्हते, तर ते द्रष्टे विचारवंत होते. ते केवळ त्यांच्या कृतींनाच नव्हे तर विचारांनाही टीकात्मक विवेचनाच्या ऐरणीवर तावूनसुलाखून घेण्यास सतत तयार होते. बिपिन चंद्र यांनी भगतसिंगांना कधीही दहशतवादी म्हटलेले नाही. भगतसिंग व त्यांचे सहकारी त्यांची विचारसरणी, कल्पना, पद्धती व धोरणे अधिक ठाशीवपणे मांडण्यासाठी स्वत:च दहशतवादी हा शब्द वापरत होते; पण भगतसिंग व त्यांच्या सहकाऱ्यांनी वापरलेला हा शब्द जसाच्या तसा न वापरता उलट त्याला क्रांतिकारक हे विशेषण जोडले. त्यातून ‘क्रांतिकारक दहशतवादी’ हा शब्द तयार झाला. त्याला भगतसिंगांच्या बाबतीत नकारात्मक अर्थ नाही. त्या वेळीही तो नव्हता, कारण दडपशाही करणाऱ्या ब्रिटिशांविरोधात त्यांनी दहशतीचा मार्ग वापरला होता. आताच्या काळात दहशतवादी हा शब्द नकारार्थी आहे, कारण निरपराध लोकांविरोधात दहशती कारवाया करणाऱ्यांना दहशतवादी म्हटले जाते, त्यामुळे नंतर बिपिन चंद्र यांनी दहशतवादी हा शब्द वापरणे सोडून दिले. २००७ मध्ये जाहीर निवेदन काढून हा शब्द पुस्तकातून वगळण्यात यावा, असे बिपिन चंद्रांनी सांगितले, पण आता ज्या पुस्तकावर टीका होते आहे ती त्यांच्या पुस्तकाची १९८८ मधील आवृत्ती आहे व त्याची सुधारित आवृत्ती काढली गेली नाही. पुस्तक जसे होते तसे पुन्हा छापण्यात आले. ज्या दिवशी या पुस्तकातील शब्दप्रयोगावरून टीका सुरू झाली त्याच दिवशी आम्ही लगेच तो शब्द बदलावा अशी भूमिका घेतली व इंग्रजी-िहदी आवृत्त्यांच्या प्रकाशकांना लिहिले. या परिस्थितीत दिल्ली विद्यापीठाने पुस्तकाच्या विक्रीवर बंदी घातली. रा. स्व. संघाचे विचारवंत दीनानाथ बत्रा यांनी पुस्तकाच्या इंग्रजी प्रती नष्ट करून लेखकांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली.

मी वर म्हटले त्याप्रमाणे पुस्तकावरील टीकेपेक्षा त्याविरोधात जे शस्त्र उपसण्यात आले त्याचे आश्चर्य वाटते आहे. जर  बिपिन चंद्र यांच्या पुस्तकावर सखोल विश्लेषणाअंती िहदू, मुस्लीम व इतर जातीयवादाचे रंग दाखवणाऱ्या तीन प्रकरणांमुळे टीका झाली असती तर त्यामागचा तर्क आम्ही समजू शकलो असतो. राजकीय विचारसरणी जर फुटीरतावादी जातीय व्यवस्थेवर आधारित असेल व तोच राष्ट्रवाद म्हणून पुढे केला जात असेल तर ते चुकीचे आहे, हे आम्ही समजू शकतो. जर एखाद्या निष्पाप वाचकाने आज टोकाची राष्ट्रवादाची भूमिका घेणाऱ्यांना स्वातंत्र्यलढय़ाच्या वेळी तुम्ही काय करीत होतात, स्वातंत्र्यलढय़ाच्या इतिहासात तुमची नावे का नाहीत, असे विचारल्याने या पुस्तकावर टीका झाली असती तरी आम्ही समजू शकतो. एखादा गोंधळलेला वाचक िहदुत्व ही राष्ट्रवादी विचारसरणी आहे असे तुम्ही का म्हणता, असे विचारता झाला तरी समजू शकते (िहदुत्ववादी राष्ट्रवाद ही संकल्पना वि. दा. सावरकर यांनी मांडली होती). िहदुत्ववादी राष्ट्रवादाची संकल्पना मांडताना ज्यांचे पूर्वज भारतात राहात होते किंवा ज्यांची घरेदारे व जमिनी या देशात होत्या तेच राष्ट्रवादी असे समजले गेले; त्यात ख्रिश्चन व मुस्लीम यांना वगळण्यात आले. ज्यांची धार्मिक स्थळे जेरुसलेम, रोम किंवा अरेबियात आहेत त्यांना बाजूला ठेवण्यात आले.

राष्ट्रवाद असा निवडक किंवा कुणाला वगळून असू शकतो का व तरी त्याला राष्ट्रवाद म्हणावे की जातीयवादाच्या बुरख्याखालील राष्ट्रवाद म्हणावे, हा प्रश्न आहे.

‘ द इंडियन एक्स्प्रेस’मध्ये ५ मे रोजी आलेल्या इंग्रजी लेखाचा हा संपादित अंश आहे.