पर्यावरणाच्या नाशामुळे आपल्या पुढल्या पिढय़ांपासून कायकाय हिरावले जाईल, याचा सविस्तर वेध घेणारं, इतिहासापासून आजवरची माहिती देणारं आणि ऱ्हासाचा वेग आपणच वाढवतो आहोत हे पटवून देणारं हे पुस्तक आहे.. मात्र, भांडवली अर्थव्यवस्थेबद्दल ठाम भूमिका नसल्यामुळे ते अपेक्षित उंची गाठत नाही..

‘आपल्या मुलांचे जगणे उद्ध्वस्त करणारी चोरी आपणच करीत आहोत,’ असा आरोप ‘स्टीलिंग फ्रॉम अवर चिल्ड्रेन’ या पुस्तकाचे शीर्षक करते आहे. अज्ञानापोटी भावी पिढय़ांच्या उपजीविकेच्या संसाधनांची चोरी होत असती, तर कदाचित आपण स्वत:ला माफ केलेही असते. परंतु स्वार्थापोटी समजून-उमजून त्यांचे जगणे कठीण करणारी चोरी आपण करीत असल्याचा आरोप अतिगंभीर आहेत. उत्तम मुद्रण, लक्षवेधी मांडणी आणि सोपी भाषा असल्याने आरोपाचे गांभीर्य नीट समजले नाही, असेही म्हणायची सोय उरलेली नाही. पुस्तकातील पाच प्रकरणांच्या ‘संदर्भ’ (कॉन्टेस्ट) या पहिल्या भागात आरोप सिद्ध करणारे प्रमुख युक्तिवाद सविस्तरपणे मांडले आहेत. अशा चोरीला सध्याची आर्थिक व्यवस्था प्रोत्साहन देते, हे दाखवून या अर्थव्यवस्थेच्या बदलाची मागणी पाच प्रकरणांचा दुसरा विभाग करतो. पर्यावरणाचा विचार अर्थकारणासह चर्चिणे भारतीय लेखकांत अपवादात्मक आहे.

‘संदर्भ’ हा पुस्तकाचा पहिला भाग विश्वनिर्मिती ते युरोपात घडलेल्या औद्योगिक क्रांतीनंतरच्या माणसाचा ‘विकास’ आणि या ‘विकासाचे’ विविध परिणाम यांची चर्चा करतो. आजच्या ज्ञानानुसार पृथ्वीचे वय सुमारे ४५० कोटी वर्षांचे, तर शहाण्या मानवाचे (होमो सेपियन्स) अस्तित्व केवळ (गेल्या) दोन लाख वर्षांचे दिसते. या काळात उल्कापातांच्या रूपाने तुरळक द्रव्य आणि सूर्याच्या ऊर्जेचा छोटा हिस्सा पृथ्वीपर्यंत पोहोचत होता. मिळालेल्या सौरऊर्जेएवढीच ऊर्जा पृथ्वी साधारणत: पुन्हा बाहेर टाकत होती. यांच्या पलीकडे येथे बाहेरून फार काही येत नव्हते. परंतु पृथ्वीच्या नित्यनूतनतेचा अनुभव कायम येत होता. दिवस-रात्र, ऋतू, पाणी, कर्ब, नत्र, प्राणिमात्रांचे जन्म-मृत्यू अशी एकमेकांना स्पर्शणारी निसर्गचक्रे सतत नवनिर्मितीचे आभास तयार करीत होती. या प्रदीर्घ काळात कुटुंबसंस्था, विवाहसंस्था, शासनसंस्था, तत्त्वज्ञान, साहित्य, कला, सौंदर्यदृष्टी अशा अंगाने मानवी संस्कृतीची वाटचाल झाली. मानवाने विज्ञान, चांगले आरोग्य, व्यापार-उदिम आणि भीषण लढायांसाठी शस्त्रे यांची साधना केली. त्याला अग्नी, भाषा, देव, धर्म, चाक, शेती, धातू, निवारा यांचे शोध लागले. त्यापैकी शेती हा संपत्तीनिर्मितीचा प्रमुख स्रोत दीर्घकाळ टिकून राहिला. एवढी प्रगती होऊनही या काळात जगभरातील सर्वसामान्य माणसाचे आयुष्य कष्टाचे आणि संकटांचे होते. परिणामी, दोन हजार वर्षांपूर्वी फक्त २० कोटींच्या आसपास जगाची लोकसंख्या होती. या काळात माणसाची सारी मदार निसर्गचक्रांवर होती. त्यामुळे भावी पिढय़ांच्या जगण्यातील बदलांची गती खूप धिमी होती. आपल्याप्रमाणेच पुढील अनेक पिढय़ांचे जीवनमान असेल, ही पृथ्वीवरील माणसांची खात्री होती. त्यातून कुवतीप्रमाणे आपण मुला-बाळांच्या जगण्याची पुरेशी तजवीज केली आहे, असा माणसाला दिलासा होता.

तीनशे वर्षांपूर्वीच्या युरोपातील औद्योगिक क्रांतीनंतर (सुमारे १७६० ते १८४०) हा दिलासा वेगाने नष्ट होऊ  लागला. शेती या प्रमुख उत्पादन स्रोताची जागा उद्योगांनी, कारखानदारीने घेतली. उद्योगांतील यंत्रांची उत्पादकता आणि कार्यक्षमता, विज्ञान-तंत्रज्ञानाचे महत्त्व, आरोग्यसेवा, नवी औषधे आणि शिक्षणसेवा या सर्व क्षेत्रांत वृद्धी होऊ  लागली. परिणामी, मृत्युदर वेगाने कमी झाला, परंतु जन्मदर मात्र फार कमी झाला नाही. साहजिकच जगाची लोकसंख्या वाढत १८३० या वर्षांत प्रथमच १०० कोटी झाली आणि पुढे केवळ दोनशे वर्षांत (सन २०१२ पर्यंत) ही संख्या ७१२ कोटी झाली. जागतिक लोकसंख्या २०५० या वर्षी ९६० कोटी होण्याचा अंदाज आहे. औद्योगिक क्रांतीनंतर लोकसंख्यावाढीसोबत जगातील सर्व व्यक्ती, कुटुंबे ते देश यांना कायम विकासाची स्वप्ने पडत आहेत. सर्वाना किमान अमेरिकेतील सरासरी जीवनमानाने सुखवस्तू/ खर्चीक आयुष्य जगण्याची इच्छा होते आहे.

वाढते जीवनमान आणि वाढती लोकसंख्या यामुळे ऊर्जा, वीज, जीवाश्म इंधनाचा (दगडी कोळसा, पेट्रोल, डिझेल, नैसर्गिक इंधनवायू, इ.) वापर, अन्न, शेतीची अवजारे आणि यंत्रे, खते (नैसर्गिक आणि रासायनिक), नानाविध यंत्रे बनविणारे कारखाने आणि सेवा देणारे उद्योग, पाणी, लोखंड, प्लास्टिक, कागद, कापड, लाकूड, अशा अगणित गोष्टींचा वापर वेगाने वाढतो आहे. शेतजमीन आणि जंगलाखालील जमीन कमी होते आहे. अन्नाची, त्यातही मांसाहारी अन्नाची मागणी वाढते आहे. साहजिकच अन्नाची उपलब्धता वाढविणे गरजेचे झाले आहे. त्यासाठी शेतीमध्ये नैसर्गिक अथवा रासायनिक खते, जास्त उत्पादन देणारे वाण, जास्त पाणी, एवढेच नव्हे तर जनुकीय-अभियांत्रिकी यांचा वापर अत्यावश्यक झाला आहे. पाण्यासाठी अनेक ठिकाणी टय़ूबवेलची खोली आत्ताच २०० फुटांपेक्षा जास्त खाली गेली आहे. खोल पाण्याचा उपसा आर्थिकदृष्टय़ा तोटय़ात जाणारा आहे. खनिज तेल आणि निसर्गइंधन वायू येत्या ५० वर्षांत संपतील, कोळसा १०० ते १२० वर्षांत संपेल, यंत्रसामग्रीसाठी लागणाऱ्या लोखंडाचे साठे पन्नासेक वर्षांत संपतील. हे साठे माणसाच्या केवळ एक-दोन नव्हे, तर सर्व भावी पिढय़ांचे आहेत. आपले प्रवास, विविधतेने नटलेली आलिशान घरे, विजेचा वाढता वापर, अनेक यंत्रांवर अवलंबून असणारी आपली जीवनशैली आणि अनेक प्रकारची चैन, यामुळे निसर्गचक्राबाहेरील संसाधनांचे मर्यादित साठे आपण एका शतकात संपवतो आहोत. भावी पिढय़ांचे जगणे हिरावून घेणारी हीच ती चोरी आहे. या चोरीतून मिळविलेली जीवाश्म इंधने वापरल्याने हवेत कार्बन, नायट्रोजन आणि गंधक यांच्या ऑक्साइड्सचे प्रमाण वाढते आहे. या वाढत्या प्रदूषणाचे माणसांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहेत. जोडीला, या हरितगृह वायूंमुळे जागतिक तापमानात वाढ होणे हे महाभयानक संकट पुढय़ात उभे ठाकले आहे. गेल्या तीनशे वर्षांत पृथ्वीचे सरासरी तापमान केवळ ०.८४ अंश सेन्टिग्रेड वाढले आहे. एवढय़ा तापमानावाढीमुळे ध्रुवीय बर्फ वितळणे, समुद्राची पातळी वाढणे, किनारपट्टीवरील माणसे निर्वासित होणे, अवकाळी पाऊस, ओले आणि कोरडे दुष्काळ, शेतीचा बोजवारा, जंगलांना आगी लागणे, असे अनेक गंभीर परिणाम नजरेत येत आहेत. त्यांचे प्रमाण प्रत्येक वर्षी वाढते आहे. ही तापमानवाढ २.०० अंश सेन्टिग्रेडच्या आतच रोखणे आवश्यक आहे. जागतिक तापमानवाढीशी संबंधित या प्रमुख घटनांचा सविस्तर वेध पुस्तकाचा पहिला शंभर पानांचा भाग उत्तम प्रकारे घेतो.

पुढच्या पिढय़ांच्या जीवनावश्यक संसाधनांच्या चोरीला सध्याची अर्थव्यवस्था कसे प्रोत्साहन देते, याचे विश्लेषण करीत नव्या अर्थव्यवस्थेची मागणी करणारा दुसरा भाग पहिल्याइतकाच महत्त्वाचा आहे. जगातील सध्याची प्रबळ अर्थव्यवस्था भांडवली आहे. इंटरनेटच्या विश्वव्यापी जाळ्याकडे ‘कॅपिटॅलिझम अ‍ॅण्ड क्लायमेट चेंज’ यावरील पुस्तकांची आणि लेखांची विचारणा केली की इंग्रजी वाङ्मयाचा धो धो पाऊस पडतो. भांडवली अर्थव्यवस्थेने लवचीकता दाखवून महाभयंकर आर्थिकमंदी, वसाहतींच्या स्वातंत्र्याचे लढे, दोन महायुद्धे या संकटांतून स्वत:ला टिकवून ठेवले आहे. त्याची दाखल घेऊन भांडवली अर्थव्यवस्था पर्यावरणीय संकटाला काबूत ठेवील अथवा भांडवली अर्थव्यवस्था स्वत:ला टिकवून पर्यावरणाच्या संकटाला बिलकूल तोंड देऊ  शकणार नाही, यापैकी एक भूमिका घेऊन प्रस्तुत पुस्तकाने जोरदारपणे आपली बाजू मांडलेली नाही. सध्याच्या अर्थव्यवस्थेतील विकास, सामाईक साधनसामग्रीची शोकांतिका (द ट्रॅजिडी ऑफ कॉमन्स), जगातील सर्व माणसांची सांपत्तिक स्थिती सुधारत असल्याचा भ्रम आणि निव्वळ वर्तमान मूल्य (द नेट प्रेझेंट व्हॅल्यू) या अर्थशास्त्राशी संबंधित असणाऱ्या संकल्पना आहेत, असे हे पुस्तक जरूर म्हणते. परंतु या संकल्पना भांडवली आणि काही अंशी समाजवादी राजवटीच्या वातावरणात तयार झाल्याचा उल्लेखही हे पुस्तक करीत नाही.

साहजिकच वरील संकल्पनांचा या पुस्तकात अधांतरी विचार होतो. ‘विकास’ म्हणजे नवनव्या गरजा रुजवून त्या पूर्ण करू शकणारी अर्थात प्रचंड ऊर्जाखाऊ आणि चंगळवादी अर्थव्यवस्था असे जगाने मान्य केले आहे. साहजिकच विकास मोजण्याचे परिमाण म्हणून सकल राष्ट्रीय उत्पादन (सराउ, इंग्रजीत ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्ट किंवा जीडीपी) अथवा दरडोई ऊर्जावापर यांना सहज मान्यता मिळते. परंतु दरडोई सराउ खूप जास्त असलेल्या तथाकथित विकसित देशांपेक्षा (उदाहरणार्थ, अमेरिका, कॅनडा) खूप कमी दरडोई सराउ असलेल्या भूतानचा हॅपिनेस इंडेक्स बराच वरचढ आहे. थोडक्यात, विकासाचे मोजमाप केवळ अर्थशास्त्रीय भाषेत करणे चुकीचे आहे. जेथे सामाईक साधनसामग्री स्वतंत्र व्यक्ती सामुदायिक हितासाठी न वापरता स्वहितासाठी वापरतात, तेथे सामाईक साधनसामग्रीची शोकांतिका अटळ ठरते आहे. साम्यवादी सोव्हिएत रशियात सुरुवातीची तीन-चार दशके गरीब-श्रीमंत यांतील दरी कमी होती. त्यामुळे सामाईक संसाधनांची शोकांतिका लांबणीवर पडली. वास्तवातील असे तपशील प्रस्तुत लेखक नजरेआड करतात. ‘निव्वळ वर्तमान मूल्य’ ही संकल्पना तर भांडवली अर्थव्यवस्थेचे अपत्य आहे. उदाहरणार्थ, जागतिक तापमानवाढ आणि तिचे अत्यंत घातक परिणामांचे उदाहरण घेऊ या. ते परिणाम ३० वर्षांनी प्रत्यक्षात येणार असतील, तर वर्तमानात थोडा कमी नफा स्वीकारून तापमानवाढ रोखण्याचा प्रयत्न करणे अमेरिकी शहाणपणाच्या व्याख्येत बसत नाही. कारण उद्याच्या जास्त फायद्यापेक्षा आजचा थोडा कमी फायदा निर्णायक असतो, हे ‘भांडवली’ सत्य आहे. ‘साम्यवादी’ सोव्हिएत रशिया अथवा चीन या देशांनीदेखील भांडवली अर्थव्यवस्थांशी स्पर्धा करण्यापायी पर्यावरणीय धोक्यांकडे १९७०च्या दशकापासून बुद्धय़ा दुर्लक्ष केले आहे. प्रत्येक काळातील अर्थशास्त्र त्या त्या काळातील प्रबळ राजकीय विचारधारेचा संदर्भ घेत स्वत:ला रचत असते. या अर्थाने ते राजकीय अर्थशास्त्र (पोलिटिकल इकॉनॉमी) असते. परंतु तो संदर्भ लक्षात न घेणारे अधांतरी अर्थशास्त्र पर्यावरणाच्या संकटाला तोंड देऊ  शकते का नाही, याचे उत्तर पुस्तक देत नाही. परिणामी नव्या आर्थिक घडीची संकल्पना धुक्यात वाट हरवून बसते.

..तरीही पर्यावरणीय परिणामांची काळजी घ्यावी लागणे अटळ असल्याचे लेखकांना उत्तम भान आहे. त्याचे प्रत्यंतर ‘द डायलेमा ऑफ ग्रोथ’ या प्रकरणाच्या सुरुवातीला असणारे अल्बर्ट आइन्स्टाइन यांचे पुढील अवतरण देते : ‘‘विश्वाचा पसारा आणि माणसाची मूढता या दोनच गोष्टी अमर्याद आहेत; पैकी विश्वाच्या अमर्यादतेबाबत मी साशंक आहे.’’ नफ्याच्या आणि स्पर्धेच्या बाजारात रथी-महारथींचे शहाणपण हरवणे स्वाभाविक असले, तरी सामायिक मूढतेचे जीवघेणे परिणाम चुकत नसतात, याची आठवण पुस्तकाचा दुसरा भाग जागवितो. एवढे यश एखाद्या पुस्तकाला रग्गड आहे!

 

  • स्टीलिंग फ्रॉम अवर चिल्ड्रेन
  • लेखिका : कोमल कोठारी व चित्रा चंद्रशेखर
  • प्रकाशक : ४२ बुक्झ
  • पृष्ठे : १९२ , किंमत : २९९ रु.

 

– प्रकाश बुरटे

 prakashburte123@gmail.com