वैद्यनाथ, संत एकनाथ हे कारखाने बंद राहणार मराठवाडय़ात या वर्षी चांगला पाऊस झाला तरी या हंगामात तातडीने ऊस गाळपासाठी येण्याची शक्यता कमी आहे. परिणामी, काही साखर कारखान्यांनी गाळपाचे परवानेच मागितलेले नाही. यात बीडचा वैद्यनाथ, पैठणचा संत एकनाथ, समृद्धी या कारखान्यांचा समावेश आहे. पैठण येथील संत एकनाथ साखर कारखान्यामध्ये उसाच्या अभावाचे कारण दिले जात असले तरी या कारखान्यात राजकारण घुसल्याने या वर्षी हे कारखाने सुरू होणार नाहीत. औरंगाबाद विभागातील १३ कारखान्यांनी गाळपासाठी अर्ज केला आहे. औरंगाबाद जिल्हय़ातील सिद्धेश्वर सहकारी साखर कारखाना तसेच छत्रपती संभाजीराजे, बारामती अॅग्रो, मुक्तेश्वर या खासगी कारखान्यांनी गाळपासाठी परवानगी मागितली आहे. मराठवाडय़ात या हंगामात ३९ हजार मेट्रिक टन ऊस उपलब्ध होईल, असा अंदाज आहे. बहुतांश ऊस बेण्यासाठी वापरला जात असल्याने दोन महिन्यांपेक्षा जास्त काळ कारखाने चालणार नाहीत, असे सांगितले जाते. औरंगाबाद विभागात गेल्या वर्षी ५६ लाख मेट्रिक टन गाळप झाले होते. या वर्षी ते अजून घटेल, अशीच आकडेवारी आहे. पाऊस चांगला झाल्याने पुढील वर्षी गाळपासाठी अधिक ऊस उपलब्ध होईल, असे सहकारी विभागातील अधिकारी सांगतात. बीड जिल्हय़ात ऊस उपलब्ध नसल्याने वैद्यनाथ साखर कारखाना सुरू होणार नाही. तसेच समृद्धी आणि जळगाव जिल्हय़ातील चोपडा हे कारखाने सुरू होणार नाहीत.