संकट आली, की ती चहू बाजूंनी येतात. तनवर कुटुंबियांच्या बाबतीत असंच काहीस घडले. मोठ्या बहिणीचा मृतदेह अंत्यसंस्कारासाठी घेऊन जाताना धाकट्या बहिणीचा तिच्या पतीसह अपघाती मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मुंबईहून मेहकरला जात असताना औरंगाबादजवळील लासूर रोडवर धाकट्या बहीणीच्या चारचाकीला अपघात झाला. या अपघातात पती- पत्नी जागीच ठार झाले. तर चारचाकीमधील दोन भाऊ देखील जखमी झाले आहेत. त्यांच्यावर घाटी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

मुंबई येथील मीरा भाईंदर येथील यास्मीन मसूद तनवर यांच्या बहिणीवर मुंबई येथे उपचार सुरू होता. उपचार दरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याने अंत्याविधीसाठी मृतदेह मुंबईहून त्यांच्या मुळगावी मेहकर येथे रूग्णवाहीकेतून आणण्यात येत होता. तर धाकटी बहीण यास्मिन तनवर, तिचा पती मकसूद तनवर, यासमीचे दोन्ही भाऊ निजाम, आणि जावेद असे चौघे होंडा सिटी कारमधून मागून येत होते. मेहकरला जात असताना औरंगाबाद जवळील लासूर रोडवर त्यांच्या कारचा अपघात झाला. या भीषण अपघातात यास्मिन आणि तिचा पती मकसुद याचा मृत्यु झाला. तर जावेद आणि निजाम हे दोघे भावंडे गंभीररित्या जखमी झाले आहेत. त्यांच्यावर घाटी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघात कसा झाला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

अपघातात मृत पावलेल्या यास्मिनचा दोन वर्षापुर्वीच मुंबई येथील मकसुदशी विवाह झाला होता. यास्मिन सध्या गर्भवती होती. त्यांचे पहिलेच अपत्य होते. दोघांचाही अशा प्रकारे दुर्दैवी मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणी दौलताबाद पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.

या दाम्पत्यासोबत माणुसकी ही मेल्याचे चित्र
तन्वर यांच्या गाडीला अपघात झाल्यानंतर चारही जण गाडीत रक्तबंबाळ अवस्थेत अडकले होते. अशा वेळी काही नागरिकांनी त्यांची मदत करण्याऐवजी त्यांच्या जवळील ३० ते ४० हजार रूपये, मोबाईल, कागदपत्र असलेली पर्स चोरली असल्याची माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली.