तज्ज्ञांअभावी यंत्रे धूळ खात पडून; नुसताच कागदी घोडय़ांचा नाच औरंगाबादच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (घाटी) अनेक महत्त्वाच्या विभागांत उपचाराची यंत्रणा आहे, पण ते चालवणारे तज्ज्ञच नाहीत. त्यासाठी थोडाथोडका नव्हे तर चार वर्षांपासून रुग्णालयाच्या प्रशासनाकडून होणाऱ्या पाठपुराव्यावर सरकारकडून त्याच कागदी पद्धतीने उत्तर देण्याचा उपचार केला जात आहे. प्रत्यक्ष पदनिर्मितीची प्रक्रियाच रखडलेली आहे. त्या पदाला मंजुरी मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला असला तरी वेतनाचा प्रश्न निर्माण होणार असल्याने पदे लवकर भरती केली जातील का, याबाबत प्रशासकीय यंत्रणेमध्येच साशंकता आहे. घाटी म्हणजे मराठवाडय़ातील रुग्णांसाठी गंभीर आजारांवरील उपचारासाठीचे मुख्य आशाकेंद्र आहे. अपघातातील गंभीर रुग्णांसह, हृदयरोग, मूत्रविकार किंवा किडनीविकार, मेंदुविकाराचे रुग्णही घाटीत येतात. मात्र, त्यातील एक तर तज्ज्ञ किंवा यंत्रतज्ज्ञ, यापैकी एकाची कमतरता घाटीत असते. मागील दोन वर्षांपासून मूत्रविकारतज्ज्ञ नाही. त्याची यंत्रणा जरी असली तरी कायमस्वरूपी तज्ज्ञ अद्याप मिळालेला नाही. मुळात रुग्णालयात मूत्रविकारतज्ज्ञाचे पदच अस्तित्वात नाही. जेव्हा यंत्रणा आली तेव्हा पदनिर्मितीसाठी रुग्णालयाकडून हालचाली सुरू झाल्या. ४ डिसेंबरपासून शासनाकडे पाठपुरावा सुरू झाला. त्यापूर्वी म्हणजे ३० जून २०१२पासून पाठपुरावा होत होता. मात्र शासनाकडूनच ३ जुलै २०१५ रोजी एक पत्र धडकले. त्यात त्यांनी स्पष्टपणे पदनिर्मितीचा प्रस्ताव पाठवू नये, असे वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालकांकडून आलेल्या पत्राद्वारे कळवले होते. त्यानंतर त्याच वर्षअखेर पुन्हा पत्रव्यवहार सुरू झाला. त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळू लागला. संचालकांकडून पत्र शासनाकडे गेले. औरंगाबादच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीतही काही पदांना मान्यता मिळाल्याची माहिती रुग्णालयातील सूत्रांकडून मिळाली. मात्र, आता जी पदे भरली जातील त्यासाठी मिळणारे वेतन आणि खासगी रुग्णालयात मिळणारे वेतन यामध्ये मोठी तफावत असल्याने ही पदे कितपत भरली जातील, याबाबत प्रशासकीय यंत्रणाच साशंक आहे. त्यासाठी कार्यालयातीलच इच्छुकांना तयार केले जावे, असा मध्यम मार्गही काढण्याचा विचार पुढे आला. हृदयरोग विभागातील एक कर्मचारी पुढे आला. मात्र त्याला मुंबईतील जे. जे. रुग्णालयात प्रशिक्षणासाठी पाठवावे लागणार. मात्र त्यातही सरकारची अनास्थाच दिसत असून त्याला मंजुरी मिळावी, यासाठी पाठपुरावा करूनही अद्याप त्याला प्रतिसाद मिळालेला नाही, असे रुग्णालयातील सूत्रांनी सांगितले. पाठपुरावा सुरू आहे.. पदनिर्मितीच्या प्रश्नावर अधिष्ठाता चंद्रकांत मस्के, वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुधीर चौधरी व इतर अधिकारीवर्गाला विचारले असता ते पाठपुरावा सुरू असल्याचे सांगतात. संबंधित विभागाचे कर्मचारी शासनाकडे पाठवलेली कागदपत्रे दाखवतात. शासनाकडून नुसताच पत्रव्यवहार केला जातो, पण प्रत्यक्ष पदांची निर्मिती होत नसल्याने सारेच घोडे अडले आहे. मूत्रपिंड प्रत्यारोपणची सुविधा हवी घाटी हे मराठवाडय़ातील गरीब, सर्वसामान्य घरातील रुग्णांसाठी आशाकेंद्र आहे. अनेक किडनीविकारग्रस्त रुग्णांसाठी डायलिसिसची व्यवस्था असली तरी किडनी प्रत्यारोपणची तज्ज्ञांअभावी सुविधा येथे नाही. राष्ट्रीय आरोग्य मिशनअंतर्गत एका तज्ज्ञाची व्यवस्था केली आहे. मात्र ही व्यवस्था तात्कालिक आहे. या पदांची निर्मिती होणार घाटीमध्ये कार्डिओलॉजिस्ट (हृदयरोगतज्ज्ञ), न्यूरॉलॉजिस्ट (मेंदुविकारतज्ज्ञ), नेफ्रॉलॉजिस्ट (किडनीविकारतज्ज्ञ) या पदांची निर्मिती करण्यात येणार आहे. त्याला औरंगाबादेतील मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यताही मिळाली आहे. त्यालाही आता दोन महिने झाले आहेत. आता प्रत्यक्ष नियुक्ती केव्हा होते, याकडे डोळे लागले आहेत. मराठवाडय़ातून येणाऱ्या रुग्णांसाठी ही पदभरती तातडीने होणे आवश्यक आहे.