'डेरा सच्चा सौदा'चे प्रमुख बाबा राम रहिम यांना बलात्काराच्या आरोपात न्यायालयाने दोषी ठरवल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी ठिकठिकाणी जाळपोळ सुरु केली आहे. यामध्ये आतापर्यंत अनेकांना जीवही गमवावा लागला. मात्र, औरंगाबाद येथील शीख सामुदयाकडून फटाके फोडून आणि मिठाईचे वाटप करीत न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत केले. बाबा राम रहिम यांच्या समर्थकांकडून हरयाणात हिंसाचार सुरु आहे. मात्र, औरंगाबाद येथिल उस्मानपुरा भागात शहरातील शीख समुदायाचे लोक एकत्र जमले होते. यावेळी त्यांनी गुरमीत राम रहिम बाबा यांच्याविरोधात न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत केले. यावेळी फटाक्यांची आतिषबाजी करत त्यांनी एकमेकांना मिठाई भरवली. न्यायालयाने दिलेल्या निर्णयामुळे भारतीय राज्य घटनेचा विजय झाला. तसेच संतांचा वेष घेऊन वाईट काम करणाऱ्यांचा चेहरा समोर आला असल्याची प्रतिक्रियाही त्यांनी यावेळी दिली. रामपाल, आसाराम यांच्यानंतर राम रहीम यांचे खर रूप समाजासमोर आले आहे. त्यामुळे त्यांच्या अनुयायांकडून जनतेला वेठीस धरण्याचे काम केले जात आहे. अशा लोकांची कृत्ये ही समाजाला एक प्रकारे लागलेली कीड असल्याचे मत मनमोहनसिंह ओबेरॉय यांनी व्यक्त केले आहे. यावेळी शीख समाजातील अनेक तरुणांची उपस्थिती होती.