आणखी दोन दिवस चणचणीचेच नोटाबंदीनंतर औरंगाबाद शहरातील ७०० एटीएमसमोर आज रोकड संपल्याचे फलक लावण्यात आले होते. काही बँकांनी तासभर केवळ २५०० रुपये प्रत्येकाला दिले. रोकड नसल्याने लांबच लांब रांगा बँकेसमोर आज होत्या. दुसरीकडे ग्रामीण भागात तर रोकडच नसल्याने व्यवहार पूर्णत: थांबले होते. दुसरीकडे सरकारी यंत्रणा एक गाव कसे कॅशलेस केले हे सांगण्यात रममाण होती. करमाडपासून ४ किलोमीटर अंतरावर असणाऱ्या जडगावमध्ये आधार कार्डाशी जोडत रोकड विरहित व्यवहार कसे करता येतील, याचे प्रात्यक्षिक केले. येत्या चार दिवसांत या गावाला व्यवहारासाठी रोकड लागणार नाही, असा दावा अधिकारी करीत आहेत. औरंगाबाद शहरातील बहुतांश बँकेचे व्यवहार आज दुपारनंतर जवळपास बंद राहिले. रोकड नसल्याने नोटांचे रेशनिंग करण्याची वेळ बँकेच्या अधिकाऱ्यांवर आली. बँक ऑफ महाराष्ट्रने प्रत्येकी २५०० रुपयेच दिले जातील, असे सांगितले. रांगेत ताटकळत उभारणारा माणूस २५०० रुपये घेऊन परत जात होता. महाराष्ट्र बँकेच्या शहरात १२ शाखा आहेत. तेथे रोकड नसल्याने अधिकारीही वैतागले आहेत. येणाऱ्या प्रत्येकाला दोन दिवसांनी रोकड आल्यावर अधिक रक्कम देऊ, अशी कर्मचाऱ्यांना विनवणी करावी लागत होती. दोन बँकांकडील रोकड संपल्याने त्यांनी प्रत्येक शाखेला १० लाख रुपये कसेबसे देऊ केले होते. त्यातून तासभराचे व्यवहार झाले. त्यानंतर बहुतेक शाखांचे काम रोकड स्वीकारण्यापर्यंतच शिल्लक होते. पैसाच मिळत नसल्याचे चित्र सर्वत्र होते. राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये पैसे शिल्लक नसताना व्यापारी बँकांमधून काही प्रमाणात का असेना रक्कम मिळत होती. विशेषत: अॅक्सिस व एचडीएफसी बँकांच्या शाखांमधून रक्कम मिळत होती. मात्र, तीदेखील पुरेशी नव्हती. काही शाखा बंद ठेवण्याशिवाय पर्याय नव्हता असे बँकेच्या क्षेत्रातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. परिस्थितीवर नजर ठेवून असणारे निवासी जिल्हाधिकारी विश्वंभर गावंडे म्हणाले, रोकड नाही, हे खरे. त्यांच्याकडे जेमतेमच पैसे आहेत. त्यामुळे इंटरनेटचा वापर करून व्यवहार करावेत. येत्या दोन दिवसांत रक्कम येण्याची शक्यता आहे. औरंगाबाद शहरातील बहुतांश बँकांमधील रक्कम संपत असल्याने नोटांचे रेशनिंग सुरू असताना ग्रामीण भागातील व्यवहार तर पूर्णत: थांबले आहेत. बहुतांश ठिकाणी रोकड नसल्याने त्याशिवाय व्यवहार कसे करावेत, याची माहिती देण्यासाठी सरकारी यंत्रणा सोमवारी करमाडजवळील जडगाव येथे पोहोचली. १६०१ लोकसंख्या असणाऱ्या गावात महाराष्ट्र ग्रामीण बँकेने १६८५ खाती काढली. स्व्ॉप मशीनचा तुटवडा असल्याने आधार कार्डाशी व्यवहार जोडून गाव कॅशलेस करता येईल का, याची चाचपणी करण्यात आली. गावातील १० दुकानदारांकडे लॅपटॉप देऊन अंगठा लावल्यानंतर त्या व्यक्तीच्या आधार कार्डाच्या आधारे कॅशलेस व्यवहार करण्याची प्रणाली विकसित करण्याचा प्रयत्न करण्यात आला. केवळ एका गावातील हा प्रयोग चांगला असला तरी अन्यत्र सर्व व्यवहार थंडावले आहेत. दिवसभर नोटांचे रेशनिंग करत औरंगाबादकरांनी सोमवारचा दिवस ढकलला. मंगळवारी रोकड उपलब्ध झाली तर बँकांचे कामकाज चालवायचे कसे, असा प्रश्न निर्माण होऊ शकतो.