शिवसेनेकडून संघटनात्मक बांधणीसाठी घेण्यात आलेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात भाजपवर सडकून टीका करण्यात आली. मात्र, नेत्यांना शिवजयंतीचा झालेला मोठा उत्सव चांगलाच खटकल्याचेही दिसून आले. तिथीनुसार शिवजयंती की शासकीय नोंदीनुसार होणारी जयंती महत्त्वाची यावर चर्चा झाली. खासदार चंद्रकांत खैरे यांनी हा प्रश्न मुख्यमंत्र्यांपर्यंत नेणार असल्याचे स्पष्ट केले. भाजपच्या नेत्यांना पदे देण्यासाठीसुद्धा आमचेच कार्यकर्ते लागतात, अशी टीकाही यावेळी करण्यात आली.
नेते आणि भाजपकडून सेनानेत्यांचा आणि कार्यकर्त्यांचा अपमान होत आहे. अनेक मुद्दय़ांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जाते. त्यात औरंगाबाद शहराच्या नामांतराचा प्रश्नही असल्याचे आवर्जून सांगण्यात आले. आमदार संजय शिरसाट म्हणाले की, सत्ता येऊनही शिवसेनेला योग्य तो सन्मान मिळत नाही. सर्वसामान्य कार्यकर्त्यांचे हाल होत आहेत. दीड वर्ष झाले तरी विविध समित्यांवर नेमणुका झाल्या नाहीत. भाजपकडून शिवसेनेचे कार्यकर्ते पळवले जात आहेत. जिल्हाप्रमुख अंबादास दानवे,  खासदार चंद्रकांत खैरे यांनी भाजपवर टीका केली. संघटना वाढीच्या बैठकीत भाजपच लक्ष्य असल्याचे मेळाव्यात दिसून आले.