पाऊस झाला मोठा; पण ‘डराँव डराँव’ हरवले धो-धो पाऊस पडतो आहे आणि रात्रीच्या किर्र्र अंधारात रातकिडय़ांसोबत एक डराँव डराँव असा आवाज आवर्जून यायचा. पावसात पायी चालताना किंवा वाहनावरून जाताना असंख्य इवल्या-इवल्याशा बेंडकुळ्या दृष्टीस पडायच्या आणि पायाखाली किंवा चाकाखाली येऊन चिरडून जायच्या. आता पाऊस तर तसाच-पूर्वीसारखाच मुसळधार पडतो आहे, पण त्यात बेंडकुळी कुठे उडय़ा मारताना दिसेनासी झाली आहे. मग ही बेंडकुळी गेली कुठे, असा प्रश्न पडत आहे. त्यांच्या प्रजननाची, अधिवासाची ठिकाणेच जर गायब होत असतील तर बेंडकुळ्या दिसतील कशा, असा प्रतिप्रश्न करून निसर्गाच्या अन्न साखळीतील बेडूक हा नामशेष होतो की काय, अशी चिंता पर्यावरण अभ्यासक व्यक्त करीत आहेत. मध्यंतरी इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झव्र्हेशन ऑफ नेचर (आययूसीएन) या संस्थेने जगातील उभयचर प्राण्यांचा सव्र्हे केला असता त्यांना ३२ टक्के प्राणी नष्ट होण्याच्या मार्गावर असल्याचे लक्षात आले. मागील १५ वर्षांत ५० पेक्षा अधिक बेडकांच्या प्रजाती नष्ट झाल्या आहेत. त्यातही १०० पेक्षा नवीन जातींचा शोध लागला. त्यात काही बेडकाच्या कुटुंब वर्गातील जाती (नासिका बेट्राकिडी) होत्या. एखाद्या प्राण्यांच्या कुटुंबातील नवीन जाती सापडणे ही पर्यावरणीयदृष्टय़ा मोठीच घटना मानली जाते. पण अनुकूल असे वातावरण मिळत नसल्याने त्या जातीही नामशेष होत आहेत, असे जालन्याचा तरुण अभ्यासक रमण उपाध्याय यांनी सांगितले. रमण याचा बेडकावर विशेष अभ्यास आहे. त्याच्या बेडकांच्या काही चित्रांचा समावेश पाकिस्तानातील एका लेखकाने त्यांच्या पुस्तकात केलेला आहे. जर्मनीतील एका प्रकाशन संस्थेने ते पुस्तक प्रकाशित केले आहे. रमण सांगतात की, बेडूक या प्राण्याला पर्यावरणाचे सूचक मानले जाते. त्याची कातडी संवेदनशील, नाजूक असते. कातडी जेवढी नाजूक तेवढाच त्यावर बाहेरील प्रदूषण, कीटकनाशक फवारणीसारख्या रासायनिक द्रव्यांचा परिणाम होतो. मुख्यत बेडकांची अधिवास असणारी पाण्याची डबकी, झाडे, पाणथळ अशा जागा नष्ट झाल्या . बेडकाचे आठ वेगवेगळ्या प्रकारे व ठिकाणी प्रजनन होते. पावसाळा हा मुख्यत: प्रजननाचा काळ असतो. एरवी सहा ते आठ महिने बेडूक हिमनिद्रावस्थेत असतात. अधिवास संपत आल्याने बेडकांचे पावसाळ्यातील प्रजनन थांबल्यासारखे आहे. शेतातील किंवा डबके आदी ठिकाणांवरील कृमी-कीटके टिपणाऱ्या बेडकाला साप मटकावतो. प्राणी साखळीतील बेडूक हा घटक सध्या दिसत नाही. तो नामशेष होतो की काय, अशी भीतीही रमण उपाध्याय यांनी व्यक्त केली आहे.