भारतीय डाकघरांची एकंदर रचनाच बदलत आहे. नवनवीन योजना आणून काळाप्रमाणे बदलण्याच्या शर्यतीत डाकघरही मागे नसून बँकिंगच्या क्षेत्रातही उतरत आहे. महाराष्ट्रातील बारा जिल्ह्य़ांच्या क्षेत्रीय कार्यालयांतर्गत पहिली इंडिया पोस्ट पेमेंट बँक (आयपीपीबी) औरंगाबादेतून सुरू होणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शासकीय योजना किंवा नवीन प्रयोग राबवण्यासाठी आवश्यक तेथे भारतीय पोस्टाची मदत घ्यावी, अशा सूचना केलेल्या आहेत. भारतात आजही हजारो खेडय़ांपर्यंत बँकेची सेवा पोहोचली नाही. अनेक राष्ट्रीयीकृत बँकांची खेडय़ापर्यंत जाण्याची उदासीनता दिसून आलेली आहे. या परिस्थितीत खेडय़ापर्यंत सरकारशी संबंधित पोस्टाची एकमेव यंत्रणा आहे. बँकिंग क्षेत्राला खेडय़ापर्यंत नेण्यासाठी नव्याने यंत्रणा उभी करायची गरज नसून तेथील डाकघरे कामी येतील, या उद्देशाने सरकारकडून इंडिया पोस्ट पेमेंट बँक सुरू करण्यात येत आहे. मागील काही महिन्यांपासून त्यावर काम सुरू

औरंगाबाद येथील पोस्टाच्या क्षेत्रीय कार्यालयांतर्गत मराठवाडय़ातील आठ व नाशिक, नंदूरबार, धुळे जळगाव हे बारा जिल्हे येतात. या बारा जिल्ह्य़ांतून औरंगाबाद शहरात बँक सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या बँकेतून कर्ज वितरण व्यवस्था सोडून बँकिंगसंदर्भातील जवळपास सर्वच व्यवहार होणार आहेत. अनबँक्ड क्षेत्रापर्यंत म्हणजे जिथे बँक पोहोचली नाही, अशा खेडय़ापर्यंत जाळे विस्तारणे, असा यामागचा उद्देश असल्याचे येथील क्षेत्रीय कार्यालयाकडून सांगण्यात आले. बँकेत १ लाखापर्यंत रक्कम डिपॉझिट करण्याची मर्यादा राहणार आहे. बँकिंग यंत्रणा उभी करण्यासाठी शेतकरी हा केंद्रबिंदू ठेवण्यात आला आहे.

अनेक शेतकऱ्यांना गावात बँक नसल्यामुळे शहर किंवा नजीकच्या मोठय़ा गावात पदरमोड करून जावे लागते. पहिली बँक सुरू झाल्यानंतर टप्प्याटप्प्याने खेडय़ापर्यंत जाळे विस्तारण्यात येणार असल्याची माहिती क्षेत्रीय कार्यालयाकडून देण्यात आली.

एटीएम एसबीआय ग्रुपमध्ये सध्या सुरू असलेल्या पोस्टाच्या सेवेतील एटीएम सुरू झालेले आहेत. मात्र ते एटीएम केवळ पोस्टात चालत होते. आता पोस्टाचे एटीएम हे स्टेट बँक ऑफ इंडियाच्या बँकांमध्येही चालू शकणार आहे. १ जानेवारीपासून ही सेवा सुरू झालेली आहे.