महायुतीत जनसुराज्यचे विनय कोरे आल्यामुळे लातूर जिल्हय़ाच्या राजकारणावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. जनसुराज्य पक्षाचा प्रभाव लिंगायतबहुल पट्टय़ात अधिक असल्याने लातूर जिल्हय़ाच्या राजकारणावर त्याचा परिणाम जाणवेल. लातूर जिल्हय़ात लिंगायत समाजाचे मतदान निर्णायक ठरणारे असते. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवराज पाटील चाकूरकर यांना लिंगायत समाजाचे मतदान हमखास होत असे. तसा ते दावाही करत. भाजप व जनसुराज्यच्या नव्या युतीमुळे हा मतदार विभागला जाईल, असे मानले जाते. कर्नाटक प्रांताच्या सीमेला लागून असलेल्या काही जिल्हय़ात लिंगायत समाजाचे प्राबल्य आहे. त्यात नांदेड, लातूर, उस्मानाबाद, सोलापूर, सांगली, कोल्हापूर या जिल्हय़ांचा समावेश होतो. या जिल्हय़ातील काही तालुक्यांत लिंगायत समाजाची संख्या सर्वच राजकीय पक्षांनी त्यांची दखल घ्यावी इतकी आहे. एकगठ्ठा मतदान करण्याची परंपरा या समाजातही मोठय़ा प्रमाणात आहे. त्या जोरावरच शिवराज पाटील चाकूरकर यांनी प्रारंभी नगराध्यक्ष, विधानसभा व नंतर लोकसभा सतत गाजवली. समाजाची ही खदखद लक्षात घेऊन सुमारे ४०० किलोमीटर अंतरावरून विनय कोरे निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यासाठी लातूर परिसरात आले. विधानसभा निवडणुकीत लातूर शहरात कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांची सभा कानडीतून झाली होती. या पाश्र्वभूमीवर क्षमतेनुसार जागा मागू, असे जनसुराज्य पक्षाचे लातूर जिल्हाध्यक्ष माधव पाटील टाकळीकर यांनी सांगितले.