कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांची घोषणा नामांतर लढय़ातील शहिदांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करणे हे सर्वाचे कर्तव्य असून, या कामी आम्ही पुढाकार घेऊ. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वतीने शहीद स्मारक उभारण्यात येईल, यासाठी एक कोटी रुपयांची तरतूद करण्यात येईल, अशी घोषणा कुलगुरू प्रो. बी. ए. चोपडे यांनी केली.डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नामविस्तार लढय़ात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या मान्यवरांचा आणि शहिदांच्या कुटुंबीयांचा सत्कार विद्यापीठ प्रशासनातर्फे शनिवारी करण्यात आला. विद्यापीठातील नाटय़गृहात आयोजित या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून माजी मंत्री गंगाधर गाडे उपस्थित होते. कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी अध्यक्षस्थान भूषवले. या वेळी कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे म्हणाले, नामांतर लढय़ातील इतिहास हा अत्यंत प्रेरणादायी आहे. त्यामुळे या लढय़ातील सहभागी कार्यकत्रे, शहीद यांच्याबद्दल आमच्या मनात कृतज्ञेची भावना आहे. ‘नामांतर लढा-शहीद स्मारक’ लवकरच निर्माण करण्यात येईल. या वेळी गंगाधर गाडे म्हणाले, लहानपणी वडिलांसोबत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भाषण ऐकण्याचा योग आला. माझ्या काळजात कोरून ठेवलेला हा क्षण आहे. अर्थात, बाबासाहेबांचे या दर्शनामुळे जीवन बदलले. यारहो, संपली नाही लढाई नामांतराची.. ‘राख सांभाळून ठेवा, राख झालेल्या घरांची.. यारहो, संपली नाही लढाई, अजुनी नामांतराची’ या शब्दांत नामांतर लढय़ातील कार्यकत्रे, शहिदांच्या कुटुंबीयांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. शहीद गौतम वाघमारे यांचे बंधू शशिकांत, शहीद पोचीराम कांबळे यांच्या पत्नी धोंडाबाई व शहीद जनार्धन मवाडे यांच्या पत्नी ताईबाई, मुलगा डॉ. विवेक यांचा हृद्य सत्कार या वेळी करण्यात आला. तसेच तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या वाहन ताफ्यासमोर जिवाची बाजी लावणाऱ्या संगीताबाई, जमुनाबाई गायकवाड (मुलगी व आई), राहीबाई जावळे (बीड) व नामांतर लढय़ात पायावर गोळी लागलेला सय्यद गफार यांचाही गौरव करण्यात आला. उपस्थितांनी उभे राहून शहीद व लढय़ातील नेत्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. प्रारंभी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा फुले यांच्या पुतळय़ाला तसेच छत्रपती शिवाजीमहाराजांच्या प्रतिमांना पुष्प अर्पण करण्यात आले. डॉ. प्रतिभा अहिरे यांनी सूत्रसंचालन केले. या वेळी नामविस्तारात महत्त्वाची कामगिरी बजावलेल्या अॅड. रमेशभाई खंडागळे, रतनकुमार पंडागळे, स. सो. खंडाळकर, बाबुराव कदम, प्राचार्य राजाराम राठोड, सुभाष लोमटे, डॉ. विवेक मवाडे यांचा सत्कार करण्यात आला.