आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांसाठी मुस्लिम समाजातील दानशूर व्यक्तीही पुढे आल्या आहेत. जिल्हय़ातील आत्महत्याग्रस्त ११  शेतकरी कुटुंबीयांना या समुदायातील दानशुरांकडून २ लाख २० हजार रुपयांची मदत वाटप करण्यात आली.
एज्युकेशनल डेव्हलपमेंट फोरमच्या वतीने पुढाकार घेऊन हा कार्यक्रम पार पडला. एखाद्या कुटुंबात पाच भावांपकी एकजण आíथक अडचणीत असेल, तर उर्वरित चार भाऊ ज्या भावनेने मदतीसाठी धावून जातात तीच भावना आत्महत्याग्रस्त कुटुंबीयांसाठी उर्वरित समाजाने दाखवली पाहिजे. मुस्लिम समाजाने एवढेच करून न थांबता आत्महत्याग्रस्त कुटुंबीयांतील मुलांना शिक्षण देण्यापर्यंत मदत करण्याची गरज अब्दुल रहेमान शेख यांनी या वेळी व्यक्त केली. सरकारी नोकरीतील मुस्लिम समाजाचा सहभाग या विषयावर अब्दुल रहेमान यांनी या प्रसंगी विस्ताराने मार्गदर्शन केले. आम्हाला वेगळी वागणूक दिली जाते, ही भावना मुस्लिम समाजात खोलवर रुजली आहे. वस्तुस्थिती मात्र एकदम भिन्न असून शासकीय नोकरीत कोणताही भेदभाव केला जात नाही हे आपण स्वानुभवाने सांगत आहोत. शासकीय, निमशासकीय, संरक्षण, पोलीस, स्पर्धा परीक्षा यात लोकसंख्येच्या तुलनेने अतिशय कमी मुस्लिम समाजाचा सहभाग आहे. नोकऱ्यांसाठी आवश्यक असणारे शिक्षण पुढील पिढीला दिले गेले पाहिजे. मशिदीचा वापर केवळ धार्मिक कार्यक्रमांसाठी न करता चेन्नईत ज्याप्रमाणे आयएएस स्पर्धा परीक्षा तयारीसाठी पुढाकार घेण्यात आला, त्याच पद्धतीने देशभर पुढाकार घेण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली. महिलांना शिक्षणाबरोबरच नोकरी करण्यासाठी समाजाने प्रोत्साहन देण्याच्या गरजेवरही त्यांनी भर दिला. लातूरचे माजी उपनगराध्यक्ष मोईज शेख, पुण्याचे विशेष पोलीस उपमहानिरीक्षक अब्दुल रहेमान, जिल्हाधिकारी पांडुरंग पोले, त्रिपुरा शिक्षण संस्थेचे उमाकांत होनराव आदी उपस्थित होते.