औरंगाबादच्या तरुणाने लिहिलेली कथा चोरल्याचा आरोप

बॉलिवूडमधील दिग्दर्शक रामगोपाल वर्माविरोधात औरंगाबाद न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट काढले आहे. वर्मा यांनी २००९ मध्ये दिग्दíशत केलेल्या अज्ञात या चित्रपटामुळे त्यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट काढले आहे. त्यांच्यावर या चित्रपटाची कथा चोरल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. त्याचप्रमाणे अज्ञात चित्रपटाचे निर्माते रॉनी स्क्रूवाला यांच्याविरोधातही न्यायालयाने अटक वॉरंट काढले आहे. औरंगाबाद मधील मुस्ताक मोहसिन नावाच्या एका व्यक्तीने २००९ मध्ये आलेल्या अज्ञात या सिनेमाची मूळ कथा आपली असल्याचा दावा केला होता. वर्मा यांनी सिनेमात नीलेश गिरकर आणि पुनीत गांधी यांना कथेचे श्रेय दिले होते. मी ही कथा राम गोपालला पाठवली होती. नंतर त्यांचे काहीच उत्तर आले नाही. पण काही दिवसांनी अज्ञात सिनेमा पाहिला तेव्हा तो संपूर्ण सिनेमा माझ्याच कथेवर असल्याचे मला समजले. त्यामुळेच मी त्यांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे, असे मोहसिनने म्हटले आहे. न्यायालयात याबाबत याचिका दाखल केली असून दोघांनाही समन्स पाठविण्यात आले आहे.