देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांवर मंगळवारी मध्यरात्री काळाने घाला घातला. अहमदनगर- औरंगाबाद मार्गावरील धनगरवाडी शिवारात बोलेरो आणि ट्रकमध्ये भीषण अपघात झाला. या अपघातात ७ भाविकांचा जागीच मृत्यू झाला. हे सर्वजण बुलढाण्याला सैलानी बाबांच्या दर्शनासाठी जात होते.

बोलेरोतील (एमएच १२ एफएफ ३३९२) सर्व प्रवासी हे पुण्याजवळील यवत येथील आहेत. हे सर्वजण बुलढाण्यातील सैलानी बाबांच्या दर्शनाला निघाले होते. नगर-औरंगाबाद रस्त्यावरील धनगरवाडी येथे आल्यानंतर बोलेरोच्या चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि रस्त्याच्या बाजुला असलेल्या दुभाजकाला धडकून पुन्हा समोरून येणाऱ्या ट्रकवर (एमएच २०. ४६५०) जाऊन धडकली. अपघात इतका भीषण होता की, बोलेरोचा चक्काचूर झाला. यामध्ये बोलेरोतील ७ प्रवासी जागीच ठार झाली. जखमींना जवळच्याच रूग्णालयात दाखल करण्यात आले. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

मृतांची नावे अशी..

मनोहर रामभाऊ गायकवाड (वय ४५)

अंकुश दिनकर नेमाणे (वय ४५)

मुबारक अब्बास तांबोळी (वय ३५)

बाळू किसन चव्हाण (वय ५०)

स्वप्नील बाळू चव्हाण (वय १७)

गोकुळ रामभाऊ गायकवाड (वय ४०)

अरूण पांडुरंग शिंदे (वय ५०) हे सर्वजण यवत (ता. दौंड, जि. पुणे) येथील आहेत.