बीड जिल्ह्यात वीज अंगावर पडून पाच जणांचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी घडली. धारूर तालुक्यातील चारदरी भागात पाऊस पडत असल्यामुळे काही जण झाडाच्या आडोशाला उभी राहिली होती. यावेळी झाडावर वीज कोसळली. या घटनेत पाच जणांचा जागीच मृत्यू झाला असून पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आसाराम रघुनाथ आघाव (वय २८), उषा आसाराम आघाव (२५), दिपाली मच्छिंद्र घोळवे (वय २१), शिवशाला विठ्ल मुंडे(वय २१) आणि वैशाली संतोष मुंडे (वय२५) यांचा मृत्यू झाला. तर सुमन भगवान तिडके (वय २५), रुक्मिणी बाबासाहेब घोळवे (वय ५२), कुसाबाई नामदेव घोळवे (वय ४५), सीताबाई दादासाहेब घोळवे (वय २५), सुरेखा आबासाहेब आघाव (वय १७) हे पाच जण जखमी झाले आहेत. जखमींवर धारूर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दुसऱ्या एका घटनेत माजलगावमध्ये शेतात काम करत असताना एका महिलेचा अंगावर वीज पडून मृत्यू झाला.